मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वाधिक शतकांच्या कामगिरीला विराट कोहलीकडून धोका निर्माण झाला. कोहलीने 48 वे एकदिवसीय शतक साकार केले व सचिनचाही विक्रम आवाक्यात आला. मात्र, तरीही त्यांची तुलना होऊ शकत नाही कारण कोहली केवळ एक क्रिकेटपटू आहे तर सचिन ही भावना.
1989 साली वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा या शाळेतल्या मुलाला का घेऊन आलात असा सवाल पाकिस्तानचा इम्रान खान याने कपिल देवला विचारला होता. मात्र, सचिनने वकार युनूस, वासीम अक्रम, इम्रान खान व अब्दुल कादीर यांचा ज्या पद्धतीने सामन केला तसेच एका सामन्यात नाकाला चंडू लागल्यानंतरही मै खेलेगा, असे छातीठोकपणे सांगणारा हाच मुला पुढे जाऊन जागतिक क्रिकेटचा देव बनेल अशी भविष्यवाणी अब्दुल कादीरने केली होती व घडलेही तसेच. 1989 सालानंतर 2013 सालापर्यंत हा माणूस सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत बनून राहीला होता.
आता टीकाकार हणतात की कोहलीने सचिनपेक्षा निम्मे सामने कमी खेळत 48 वे शतक साकार केले आहे. पण कोहली व सचिन काही समकालीन नव्हे, त्यामुळे तुलना इथे येऊच शकत नाही. मात्र, काही गोष्टींचे खुलासे करणे अत्यत आवश्यक आहे. कल्पना करा साल 1998, सचिन खेळत आहे. घरात वडील आणि मुलगा टीव्हीवर साना पाहात आहेत. भारताला जिंकण्यासाठी 250 वगैरे धावांची गरज आहे. इतक्यात सचिन बाद होतो. त्याचवेळी टीव्ही बंद होतो व वडील आणि मुलगा अन्य कामे करण्यसाठी व्यस्त होतात. आता कल्पना करा भारताला 250 धावांच हव्या आहेत व कोहली बाद झालाय. पण टीव्ही बंद होत नव्हते कारण तळात महेंद्रसिंह धोनी किंवा हार्दीक पंड्या व रवींद्र जडेजा आहेत सामना जिंकून देण्यासाठी. मग टीव्ही सुरुच राहतात. कोहली बाद झाला की टीव्ही बंद होत नाहीत पण सचिन बाद झाल्यावर होत होते. कारण पुन्हा तेच कोहली खेळाडू आहे व सचिन ही भावना.
गोलंदाजीतही फरक
सचिन ज्या वेळी खेळत होता किंवा त्याचे पदार्पण झाले तेव्हाचे गोलंदाज वेगळे होते, आज त्यांच्या पासंगालाही यणार नाहीत इतका गोलंदाजीचा दर्जा खालावला आहे. पॅनी डीवीलियर्स, लान्स क्लुसनर, शॉन पोलॉक, ऍलन डोनाल्ड, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, क्रेग मॅक्टडरमॉट, इम्रान खान, वासीम अक्रम, वकार युनुस, सकलेन मुश्ताक, चमिंडा वाझ, मुथय्या मुरलीधरन, डॅनी मॉरीसन, ख्रिस केर्न्स, डॅरेन गॉफ, जेम्स अँडरसन, ऍशले जाइल्स, कर्टली अँब्रोस, कोर्टनी वॉल्श हे व असे कीतीतरी अफलातून गोलंदाज त्यावेळी जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत होते व त्यांच्यासमोर सचिन एकटा संपूर्ण सामना फिरवायचा. आजची गोलंदाजी वेगवान आहे मात्र, त्या दर्जाची निश्चितच नाही. आजही अनेक संघांकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत पण कोहलीला ज्यांचा सामना करावा लागत आहे त्यांचा दर्जा काय आणि सचिन ज्यांनासामोरा जायचा त्यांचा दर्जा काय याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो.
सलामीवीर म्हणून उशिरा उदय
सचिनने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तेव्हा संघात जम बसलेले कित्येक वरिष्ठ खेळाडू होते. त्यातच जवळपास तीन ते चार वर्षांनंतर सचिनला न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात सलामीला फलंदाजीसाठी संधी मिळाली. त्याचे त्याने सोने केले व भारताला जगातील सर्वात धडाकेबाज फलंदाज पाहायला मिळाला. जेव्ह सचिनने सलामीला फलंदाजीसाठी यायला सुरुवात केली त्याकाळी पहिल्या 15 षटकांत 60-70 धावा झाल्या की खूप भारी वाटायचे. नंतरची 25 षटके सावकाश खेळून काढायची व अखेरच्या 10 षटकांत पुन्हा आक्रमक फलंदाजी असे एकदिवसीय सामन्याचे गणित होते. कोहली सलामीला फलंदाजीला येत नाही हे मान्य परंतु रोहित शर्मा किंवा इशान किशन व शुभमन गिल हे डावाची सुरूवात करतात व त्यांच्यातील एकाची विकेट लवकर पडते व कोहली खेळपट्टीवर येतो. त्यामुळे त्याला षटके पुरेशी खेळायला मिळतात. सचिन संघात असताना अन्य कोणत्याही फलंदाजाकडून कोणीही फारशा अपेक्षा ठेवत नव्हते. सचिनच्या खांद्यावर सर्व जबाबदारी असायची. आज ते चित्र नाही. कोहली अपयशी ठरला तरीही लोकेश राहुलसह अन्य असे अनेक फलंदाज आहेत की ज्यांच्यावर चाहत्यांची अपेक्षा असते.
सामन्यांची संख्याही वाढली
सचिनने 1989 ते 2013 या कालावधीत चारशेपेक्षा जास्त सामने खेळले. आज भारतीय संघ जीतका व्यस्त आहे ते पाहता जवळपास प्रत्येक तीन किंवा चार दिवसांनी आपण सामने खेळतो त्यामुळे जास्त सामने अत्यंत कमी कालावधीत खेळायला मिळतात व त्यामुळे संधीही जास्त मिळते. एकूणच सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या वारेमाप वाढली आहे. इंग्लंडचा संघ वगळता बहुतेक सर्व संघ एकाच मोसमात किमान 30-40 एकदिवसीय सामने खेळतात. भारतीय संघाचे वेळापत्रक पाहीले की हे स्पष्टपणे दिसून येते. यंदाही भारतातच एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत असून त्यानंतर लगेचच भारताचे पुढील संपूर्ण मोसमाचे वेळापत्रक तयार आहे. घाण्याला जुंपल्याप्रमाणे खेळाडू सातत्याने खेळत आहेत. याला कारणीभूत बीसीसीआय असले तरीही खेळाडूंनाही लाखो रुपये मिळत असल्याने व आपण बाहेर बसलो तर दुसरा खेळाडू आपली जागा गेइल ही भीती असतेच. सचिनची जागा घेणारा दुसरा पर्याय त्यावेळी संपूर्ण देशात नव्हता हे देखील चाहते मान्य करतील.
पंचांचे निर्णयही विरोधात गेले
वेस्ट इंडीजचे स्टीव्ह बकनर, ऑस्ट्रेलियाचे डॅरेल हेअर, डॅरेल हार्पर यांच्यासह त्यावळी कार्यरत असलेल्या आंतररष्ट्रीय पंचांनीही सचिनला कित्येकदा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याची उदाहरणे तर कोणीही सांगेल. 90 ते 100 या धावांच्या अंतरात सचिनला जर या पंचांनी चुकीचे बाद दिले नसलते तर एक ढोबळ आकडेवारीनुसार सचिनची किमान 70 कसोटी शतके व 138 एकदिवसीय शतका साकार झाली असतील. म्हणजेच सचिनच्या निवृत्तीच्या वेळी त्याच्या नावावर शंभर नव्हे तर शतकांचे द्विशतक झाले असते. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात सचिनला सर्वाधिक वेळा अशा पद्धतीने बाद दिले गेले आहे. बकनर यांनी स्वतः जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा त्यांनी सचिनबाबत लिहीलेल्या एका प्रकरणात याबाबत कबुली दिली आहे. पंच हा देखील एक माणूसच असतो तो देखील चुकू शकतो असे म्हटले जाते मात्र, या चुकीच्या निर्णयांमुळे सचिनची जवळपास 100 शतके हुकली असतील ते अनावधानाने नव्हे तर जाणून बुजून घडले असल्याचे लक्षात येते.
टेनिसएल्बोमुळेही फटका
शारजामधील त्या डेझर्ट स्ट्रॉम शतकी खेळ्यांनंतर सचिनला टेनिसएल्बोची दुखापत झाली व त्याच्या चौफेर टोलेबाजीवर नियंत्रण आले. त्याने स्वतः त्याच्या प्रसिद्ध लॉफ्टेड ड्राइव्हवर अंकूश लावला. खरेतर टेनिसएल्बो अशी काही दुखापत असते हेच तोपर्यंत चाहत्यांना माहिती नव्हते. त्यातच नावातच टेनिस असल्याने ही दुखापत केवळ टेनिसपटूंनाच होत असावी असा भाबडा विचारही चाहत्यांच्या मनात आला होता. यातून बाहेर येत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेलू शकू असे खुद्द सचिनलाही वाटले नव्हते. आता खेळाडूंना दुखापती होऊ नयेत म्हणून कोहलीसह अनेक खेळाडूंना बीसीसीआय सातत्याने विश्रांती देत आहे. सचिनच्या काळात इतकी मिजास बडदास्त नव्हती.
संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणजे कोहलीसह रोहित शर्मा कंवा काही गोलंदाज यांना गेल्या दोन वर्षात जीतकी विश्रांती दिली गेली तसे लाड सचिनच्या काळी नव्हते. खरेतर सचिनला विश्रांती दणे ही कल्पनाच कोणाच्या डोक्यात येणे शक्य नव्हते कारण सचिनच संघात नसेल तर धावा करणार कोण हाच मुख्य प्रश्न असायचा पण आज ते चित्र नाही. असो, तर सांगायची गोष्ट हीच की टीकाकारांनो किंवा समिक्षकांनो सचिन व कोहली यांच्यात तुलना होऊ शकत नाही. दोघेही महान आहेत परंतू सॉफ्टकॉर्नर सचिनच्याच बाबतीत राहणार कारण कोहली मोडतोय ते विक्रम सचिननेच उभे केले आहेत. म्हणूनच जो व्यक्ती एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो त्याचेच कौतुक होते व माहनता मान्य केली जाते. आता येत्या काळात कोहलीने सचिनचे सर्व विक्रम मोडले तरीही कोहलीचे नाव टी-शर्टवरच राहील पण मनामनात कोरले गेलेले सचिनचे नाव तसेच राहणार. कारण पुन्हा तेच कोहली एक खेळाडू आहे तर सचिन ही भावना.
अमित डोंगरे