आई (किंवा बाबा), आता सुट्टी लागल्येय. तेव्हा मित्रांबरोबर (किंवा मैत्रिणींबरोबर) सिनेमाला जाऊ का?’ असा प्रश्न साठ-सत्तर वर्षांपूर्वी घरोघरी विचारला जात असे. अर्थात् विचारणारी व्यक्ती मुलगा असेल तर मित्रांबरोबर आणि मुलगी असल्यास मैत्रिणींबरोबर अशीच योजना असे-विकल्पाला थारा नव्हता!
“छे, छे. अजिबात जायचं नाही सिनेमाला. वाईट परिणाम होतो मनावर. शिवाय डोळे बिघडतात-चश्मा लागतो!’ हा त्या प्रश्नाला प्रतिसाद असायचा. पण फारच कटकट किंवा रडारड आणि वेळप्रसंगी सत्याग्रह केला तर परवानगी मिळायची. पण सिनेमा कुठला तर “सती अनसूया’ किंवा “गजगौरी’ या चित्रपटांसाठी-“जंगली’ किंवा “जिद्दी’ नव्हे! अशी दुधाची तहान ताकावर भागवण्याची वेळ येत असे. का असावं असं सिनेमाचं गारूड? आजही चित्रपट भले चित्रपटगृहांऐवजी ओटीटी किंवा इतर माध्यमांद्वारे पाहिले जात असतील; पण मोहिनी तशीच आहे. करमणुकीची अनेक साधनं उपलब्ध आहेत; पण यात चित्रपटाचा नंबर अव्वल आहे. मुळात स्थिर दृश्यापेक्षा चलच्चित्र हे अधिक आकर्षण निर्माण करणारं आहे.
पाळण्यातलं मूल असतं तेही स्थिर वस्तूंपेक्षा हालचाल करणाऱ्या खेळण्यांकडे अधिक आकर्षित होतं. त्यातून ते रंगीबेरंगी आणि कर्णमधुर आवाज करीत असेल तर? तर मग सोन्याहून पिवळं! या अनुभवांचा पगडा आयुष्यभर राहतो आणि खेळण्यांची जागा चलच्चित्रं घेतात. चित्रपटांची उत्क्रांतीही याच मार्गानं झाली. पूर्वी एक खेळणं मिळत असे किंवा घरीच बनवलं जात असे. पुठ्ठ्याच्या चकतीवर एका बाजूला पोपटाचं आणि दुसऱ्या बाजूला पिंजऱ्याचं चित्र असायचं. चकतीच्या दोन्ही टोकांना भोक पाडून त्यातून रबर बॅंड ओवला जायचा. दोन बोटात ते रबर बॅंड धरून पीळ दिला आणि सोडून दिला की पिंजऱ्यात पोपट बसलाय् असं चित्र दिसायचं. बस्स, हीच चित्रपटाची सुरुवात. याचं शास्त्रीय तत्त्व पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजे दृश्यसातत्य हे आहे. पहिल्या चित्राची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या दृश्यपटलावर उमटून नाहीशी होण्याआधी दुसरं चित्र उमटल्यास सातत्याचा भास होऊन हालचाल पाहिल्याची भावना होते.
यानंतर फेनॅकिस्टिस्कोप, फॅंटॅस्कोप अशी विविध स्थित्यंतरं होत आधुनिक सिनेमा जन्माला आला. आज डिजिटल सिनेमॅटोग्राफी आणि प्रोजेक्शन यामुळे सुस्पष्ट आणि अखंडित चलच्चित्राचा अनुभव घेता येतो. अत्याधुनिक आभासी वास्तव तंत्रानं स्पर्श, तुषार इत्यादी भावनांचा अनुभव प्रेक्षकांना घेणं शक्य झालं आहे. सर्वांना तरुणपणात चित्रपटाच्या ग्लॅमरनं भुरळ घातली आहे. विलोभनीय सौंदर्य असलेल्या तारका, नादमधुर गीतं या सगळ्यांची भुरळ मनावर पडली नाही तरच नवल. पालकांना चकवून किंवा चुकवून, शाळा-कॉलेजला दांडी मारून अनेकांनी चित्रपटसुख अनुभवलं असेल.
तथापि चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन आहे असं नव्हे, तर ते एक शक्तिशाली माध्यम आहे, ज्ञानाचा स्रोतही आहे. विविध मर्यादांमुळे जगातील उत्तमोत्तम ठिकाणांना भेट देता येत नसणाऱ्यांना तो आनंद चित्रपटांनी दिलेला आहे. वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज् आणि “ऍन ईव्हनिंग इन पॅरिस’ यासारख्या चित्रपटांपासून अनेक हॉलिवुडपटांनी आपली पर्यटनाची तहान भागवली आहे. बिमल रॉय, राज कपूर, गुरू दत्त, तसंच डेव्हिड लीन, फ्रेडेरिको फेलिनी, चार्ली चॅप्लिन, इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी विचार करायला लावलं नाही तर आश्चर्यच.
ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, रोमॅंटिक, विज्ञानकाल्पनिका, फॅंटसी, परीकथा, कार्टून, विनोदी असा प्रचंड मोठा वर्णपट चित्रपटांना लाभला आहे. त्यामुळे समाजातील कुठल्याही घटकाला त्याच्या चवी-रुचीनुसार चित्रपटांचा आनंद लुटता येतो. आता तर शुल्काधारित प्रसारणाच्या साह्यानं कुठलाही चित्रपट केव्हाही आपल्या टीव्हीवर, लॅपटॉपवर किंवा मोबाइलवरही पाहण्याची सुविधा निर्माण झालेली आहे.
मोठी धडपड करून, पैशांची जुळवाजुळव करून, कधी चोरून तरी उघड अशी चित्रपटाला जाण्याची केविलवाणी अवस्था आता नाहीशी झाली आहे. अर्थात् नवीन पिढीला असलं काही माहीतच नाही. ते चित्रपट बघून आल्यावर आपल्याला कळतं. दिलेल्या पॉकेटमनीमधून, उधारी करून केलेल्या कामाबद्दल मिळालेले पैसे जमवून अशा विविध मार्गांनी चित्रपट पाहणं त्यांना शक्य होतं. त्यामुळे सुट्टी लागल्येय. आम्ही मित्र-मित्र सिनेमाला जाऊ का? असा प्रश्न आता ऐकू येणं अशक्य आहे!
– श्रीनिवास शारंगपाणी