नगर – भाजप सरकारने एनआरसी, सीएए सारखा काळा कायदा आणून देशात जातीय विषमता पसरविण्याचे काम सुरु केले आहे. भाजप सरकारने दोन्ही सभागृहात संमत केलेला नागरिकत्व हा कायदा संविधान विरोधात असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा याला विरोध असल्याचे राष्ट्रीय नेते डॉ.राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई नगर शहरात आले असता पत्रकारांची संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गवई पुढे म्हणाले की, या संघर्षात साथ देणाऱ्यांच्या मागे मुस्लिम समाज देखील भक्कमपणे उभा राहणार असून, संविधान विरोधी हा कायदा बहुजनांना ही मान्य नाही.
सुधारित नागरिकत्व कायदा व भीमा-कोरेगाव दंगलमध्ये समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी राज्याभर दौरे चालू असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात मुस्लिम समाजासह इतर भटके, विमुक्त जाती-जमाती तसेच इतर धर्मिय देखील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आहे. हा कायदा रद्द होण्यासाठी जनआंदोलन उभे राहिले असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या आंदोलनास पाठबळ दिले आहे.
यावेळी मुस्लिम समाज व एनआरसी, एनपीआर विरोधी सर्वधर्मिय कृती समितीच्या वतीने गवई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृती समितीचे मन्सूर शेख, आमीर सय्यद, असद इराणी, तन्वीर शेख, सज्जू जहागीरदार, नईम सरदार, सरफराज कुरेशी, अज्जू शेख, समीर बेग, आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, अल्ताफ कुरेशी, राजमोहंमद नूरी, वाहिद शेख, फैजान कुरेशी, अफरोझ शेख, मोहसीन शेख, मुदस्सर शेख, आफताब शेख आदींसह समाजबांधव उपस्थित होते.