मराठीतील सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांची 1 जून रोजी 150 वी जयंती झाली. त्यानिमित्त…
आधुनिक मराठी काव्यगगनात अनेक स्वयंप्रकाशित तारे आपल्या लीलया लेखणीने अजरामर झाले. त्यापैकी एक म्हणजे कवी बी 1 जून 1872 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांचा जन्म झाला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील मुरलीधरबाजी हे व्यवसायाने वकील होते. त्यांनी सन 1851 मध्ये वऱ्हाड प्रांतात स्थलांतर केले. राजुताई ऊर्फ अन्नपूर्णाबाई या त्यांच्या मातोश्री. कवी बी यांचे शालेय शिक्षण यवतमाळ व अमरावती येथे झाले. वयाच्या 18-19 व्या वर्षी त्यांनी काव्याच्या श्रीगणेशा केला. कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या “करमणूक’ पत्रात त्यांची “प्रणय पत्रिका’ ही पहिली कविता 14 सप्टेंबर 1891 रोजी प्रसिद्ध झाली व याद्वारे साहित्य शारदेच्या दरबारात त्यांनी आपले दमदार पाऊल टाकले.
मुख्य म्हणजे आपटे यांना ती कविता फार आवडली व या कवितेस मधुकर नामक एका तत्कालीन कवीने काव्यमय अभिप्राय दिला. यानंतर सन 1911 मध्ये त्यांची “वेडगाणे’ ही आणखी एक कविता का. र. मित्र यांच्या “मनोरंजन’ या मासिकात प्रसिद्ध झाली. ते सुरुवातीस नारायण मुरलीधर गुप्ते या नावाने काव्य प्रसिद्ध करीत असत. पण त्यांचे मित्र शंकर विठ्ठल दीक्षित यांनी त्यांना “बी’ (म्हणजे मधमाशी) हे टोपणनाव सुचवले व तेव्हापासून नारायण मुरलीधर गुप्ते “कवी बी’ झाले. त्यांचे विविध विषयांवरील लेख “वऱ्हाड समाचार’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असत. त्यांचा संस्कृत, इंग्रजी भाषा व प्राचीन मराठी काव्याचा गाढा अभ्यास होता.
संत ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर या प्राचीन कवींच्या ग्रंथांवर त्यांनी विस्तृत टीकात्मक लेखन केले होते. त्यांचा योगासनावर सखोल अभ्यास होता. त्यांनी प्रत्येक आसनावर विस्तृतपणे लिखाण केले होते. ते प्रसिद्धी परान्मुख तसेच मितभाषी होते. त्यांचा स्वभाव एकांतप्रिय होता. “फुलांची ओंजळ’ हा कवी बी यांचा काव्यसंग्रह 10 जुलै 1934 रोजी प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहास आचार्य अत्रे यांची उद्बोधक प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत आचार्य अत्रे त्यांच्याबद्दल लिहितात, नावाने ते जरी कवी बी असले, तरी त्यांच्या कविता ए वन दर्जाच्या आहेत. त्यांच्या एकूण 49 कवितांचा हा संग्रह म्हणजे जणू मराठी काव्यावर चढवलेला एक सुवर्ण अलंकारच आहे. त्यांची “कविवंदन’ ही कविता त्यांच्या काव्यप्रतिभेची जणू कमान उंचावते.
मृगजळ पाणी भरून रांजणी पढीका फुंजू दे
सौंदर्याच्या फुंजी आम्हां रुंजी घालू दे
“माझी कन्या’ ही कविता त्यांचा आयुष्यात घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. कवितेतील कन्या ही त्यांची कन्या कमळा आहे. त्यामागील एक आठवण अशी की, एकदा कमळा तिच्या मैत्रिणीसह खेळत असताना, कोणी तरी तिला तिच्या पोशाखावरून भिकारीण म्हटले. यामुळे तिला वाईट वाटले व ती रडत रडत घरी आली आणि वडिलांना घडलेली सर्व हकीकत तिने सांगितली. यावर तिच्या वडिलांनी तिची योग्य ती समजूत घातली व तिला शांत केले. त्या प्रसंगावर आधारित सुमारे 25 कडव्यांचे काव्य साकारले.
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?
का गं गंगायमुनाही या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?
त्यांची “चाफा’ ही कविता म्हणजे शुद्ध व नितांत सुंदर सुक्तच असून, त्यांचा स्त्री प्रेमविषयक कल्पनांचे, उदात्त, विशुद्ध व ओजस्वी स्वरूप या कवितेतून प्रकट झाले आहे.
चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या बोलेना
संगीतकार वसंत प्रभू यांचा संगीताचा साज व लताबाईंचा मधुर व कोमल स्वरसाज म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. कवी बी यांचे नाव ज्या कवितेमुळे महाराष्ट्रात अजरामर झाले व त्यांच्या काव्यकीर्तीच्या कळसावर पताका चढवली गेली, ती कविता म्हणजे “कमळा’. थोरातांच्या पाककुळी जन्माला आलेल्या कमळेच्या तेजस्वी जीवनाची कवी बी यांनी रसाळ रसवंतीणे रंगवलेली काव्यरूपी कहाणी वाचून ज्यांच्या अंतःकरणाला पाझर फुटला नाही असा माणूस उभ्या महाराष्ट्रात सापडणे कठीण.
नभ : शिलेवर कोर चमकते चढत्या चंद्राची
निकषांवरची जशी ठळकशी रेषा सोन्याची
30 ऑगस्ट 1947 रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील बरारीपुरा भागात त्यांच्या ज्येष्ठ कन्या वत्सला खंडेराव प्रधान यांच्या घरी कवी बी या स्वयंप्रकाशित ताऱ्याचा अस्त झाला. आजच्या अनेक कवींना स्फूर्ती पुरवण्याइतके तेज व सामर्थ्य त्यांचा कवितेत भरलेले आहे. त्यांचा “चाफा’ हा भविष्यातही काव्यरूपी दरवळत राहील.
– अमेय गुप्ते