साहित्यविश्वात राष्ट्रीय पातळीवर ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च मानला जातो; तशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर बुकर पुरस्काराला अत्यंत मानाचे स्थान आहे. यंदा लेखिका गीतांजली श्री यांच्या “टॉम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी हिंदीमध्ये “रेत समाधी’ या नावाने प्रकाशित झाली होती, त्याचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे कोणत्याही भारतीय भाषेतील हे पहिलं पुस्तक ठरलं आहे. या सन्मानाने संपूर्ण भारतीय उपखंडातील वाचकविश्व रोमांचित झाले आहे. हा सन्मान केवळ हिंदी या भाषेचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्याचाच सन्मान असल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील हिंदीच्या नामांकित कादंबरीकार, कथाकार गीतांजली श्री यांची कादंबरी इंग्रजीतील अनुवादित “टूम ऑफ सॅंड’ म्हणजेच “रेत समाधी’ याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला. लेखिकेला पुरस्काराच्या रूपातून 50 हजार पौंड देण्यात आले. या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद डेजी रॉकवेल यांनी केला आहे तसेच बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या जगातील 13 नामांकित पुस्तकांच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे. डेजी रॉकवेल या एक चित्रकार आणि लेखिका आहेत. त्या अमेरिकेत राहतात. त्यांनी यापूर्वीही हिंदी आणि उर्दूसह अनेक साहित्यांचा अनुवाद केला आहे.
“रेत समाधी’ कादंबरीला भारताची पार्श्वभूमी आहे. एका 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेचे जीवन सांगणारी ही कथा आहे. ही महिला पाकिस्तानला जाते आणि फाळणीच्या वेळी आपल्या वेदनांची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करते. एक आई, मुलगी, महिला आणि महिलावादी असण्याचे काय संदर्भ असू शकतात, याचे पुस्तकात मूल्यांकन करण्यात आले आहे. गीतांजली श्री यांनी अतिशय मार्मिक आणि संवेदनशील शब्दांत या महिलेची मन:स्थिती मांडली आहे. डेजी रॉकवेल यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद अतिशय चपखलरित्या करताना त्याच्या मूळ गाभ्याला धक्काही लावलेला नाही. हे हिंदी भाषेतील पहिले “फिक्शन’ आहे जे नामांकित साहित्यिक पुरस्काराच्या शर्यतीत होते.
“रेत समाधी’ला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाल्याने भारतीय भाषेचा आणि साहित्याचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. आपल्या सर्वांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. बुकर पुरस्कार मिळवणारे “रेत समाधी’ हे भारतीय भाषेतील पहिले पुस्तक ठरले आहे. या पुरस्काराने एक गोष्ट सिद्ध झाली की, आपल्याकडे समृद्ध साहित्य आहे आणि त्याच्यात जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळण्याची क्षमता आहे. बुकर पुरस्कार मिळाल्याने हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल आणि लोकांना भारतीय साहित्याबाबत अधिक रुची वाढेल. भारतीय साहित्यिक विश्वासाठी ही एक मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. गीतांजली श्री यांच्या यशाने भारतीय साहित्यासाठी आणखी कवाडे उघडले जातील आणि जागतिक साहित्य देखील समृद्ध होईल.
गीतांजली श्री यांची कादंबरी “रेत समाधी’ने जगातील वाचकांचे, लेखकांचे, प्रकाशकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. एवढेच नाही तर कादंबरी विश्वात भारतीय साहित्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. “रेत समाधी’ मध्ये वृद्धावस्था, मातृत्व, एकटेपणा, स्त्री पुरुष संबंध, भारत पाकिस्तानची फाळणी आदी मुद्द्यांना हाताळत जीवनातील चढउतार मांडण्यात आला आहे. गीतांजली श्री म्हणतात की, ही नातेसंबंधांची कादंबरी आहे. अनेक प्रकारच्या नात्यांची गुंतागुंत यात आहे. यामध्ये आनंद आहे आणि दु:खही आहे. समाज, इतिहास, माणसाचे भाग्य, स्वभावाचे चित्रणही या कादंबरीत असून ते त्याभोवती नकळतपणे गुरफटले जातात. एकप्रकारे जीवनाचे अजब रसायनच त्यांनी मांडले आहे. बुकरच्या निवडकर्त्यांनी रेत समाधीचे “आनंदमय अस्वस्थता’ आणि एक उत्तम कथा अशा शब्दांत वर्णन केले आहे.
गीतांजली श्री या गेल्या तीस वर्षांपासून लेखन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांची “माई’ ही पहिली कादंबरी 1990 च्या दशकात प्रकाशित झाली होती. यानंतर त्यांच्या “हमारा शहर उस बरस’, “तिरोहित’, आणि “खाली जगह’ ही पुस्तकेही आली. यानंतर गीतांजली यांचे काही कथा संग्रहसुद्धा प्रकाशित झाले. यात अनुगूंज, वैराग्य, मार्च, मॉं और साकुरा, यहॉं हाथी रहते थे या कथासंग्रहाचा समावेश आहे. त्यांच्या अनेक कथांचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, कोरियन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या इंग्रजीत आल्या आहेत.
ही गोष्ट भारतीय आणि संपूर्ण भारतीय वर्षासाठी गौरवास्पद आहे. आज भारतीय साहित्य सातत्याने जागतिक पातळीवर उच्च दर्जा मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. साहित्यविश्वासाठी ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. आतापर्यंत जागतिक स्तरावर भारतीय भाषांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. भारतीय भाषांमध्ये जागतिक दर्जाच्या तोडीच्या कथा नसतात किंवा अन्य साहित्यकृतींसमोर त्यांचा निभाव लागत नाही, असे बोलले जायचे. पण गीतांजली श्री याच्या कादंबरीला बुकर मिळाल्याने लोकांच्या मनातील भारतीय भाषांविषयी असलेला भ्रम दूर झाला आहे. भारतीय भाषा या समृद्ध आहेत. हिंदीचा विचार करता या भाषेत जे लिखाण झाले आहे तेवढे लिखाण जगात अन्य भाषेत क्वचितच झाले असेल.
बुकर पुरस्कार हा एक साहित्य वर्तुळातील नामांकित पुरस्कार ओळखला जातो. तो दरवर्षी इंग्रजीत अनुवादित केलेल्या साहित्याला आणि ब्रिटन किंवा आयर्लंड येथे प्रकाशित झालेल्या पुस्तकाला दिला जातो. हा एक उच्च मानांकित साहित्यिक पुरस्कार आहे. याचाच अर्थ जगातील अन्य भाषांप्रमाणेच भारतीय साहित्य समृद्ध आहे. या कादंबरीला अनुवादित केलेले असले तरी भारतीय भाषांचे जागतिक पातळीवरचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
आज सोशल मीडियापासून सिनेमा, व्यापार विश्व, कॉर्पोरेट वर्ल्ड, शिक्षण, आरोग्यासह अनेक क्षेत्रात भारतीय भाषांचा वापर केला जात आहे. कोणतेच क्षेत्र यापासून अपवाद राहिलेले नाही. भारतीय भाषांचा प्रभाव अमेरिकेपासून फ्रान्स, जर्मनी, चीन, इटली, जपानपासून संयुक्त राष्ट्रापंर्यंत वाढला आहे. बुकरसारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर “रेत समाधी’चे जगातील अन्य भाषांत देखील अनुवाद होईल. या सन्मानाने संपूर्ण भारतीय उपखंडातील वाचकविश्व रोमांचित झाले आहे. हा सन्मान केवळ हिंदी या भाषेचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्याचाच सन्मान असल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
– सुचित्रा दिवाकर