कोणत्याही प्रकारचं वादळ भीतीदायक असतं. पूर्वी हवामानविषयक संशोधन होत नव्हतं. त्यामुळे याचा संबंध आत्मा, भूत याच्याशी जोडला जायचा. पण हवामानशास्त्र प्रगत झालं आणि याबाबतचे अंदाज बांधता येऊ लागले. या भौतिक वादळांना वेगवेगळी नावे दिली जाऊ लागली.
वादळं आली की धुवांधार पाऊस पडतो. पण तोही कुठल्या भागात पडणार आहे, हेही तज्ज्ञांना कळतं. यातून ते लोकांना सावध करायचा प्रयत्न करतात. काय काळजी घ्यावी लागते हे सांगतात.
मुळातच वादळ का तयार होतं हे जाणून घेऊ. जिथे तापमान जास्त असते तिथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो आणि तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून जाते तिथे वादळे तयार होतात.
वादळे फक्त भौतिक नसतात तर मानसिकही असतात. विशेषतः पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांचे मानसिक परिणाम होतात. हे परिमाण मानसिक, भावनिक होतात. स्वभावात सुक्ष्म बदल होतात. कधी कधी मोठ्यांच्या लक्षात येत नाही यामुळे चिडचिड होते. वादळामुळे पाऊस पडतो, वीजा कडाडतात, ढग मोकळे होतात तसंच मन मोकळे केले पाहिजे.
मध्यम वयात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या गेल्या नाहीत, तर मनात अपराधी भावनेने वादळे निर्माण होतात आणि ती आयुष्यात शेवटापर्यंत पुरतात. काही प्रसंगी वादळापूर्वीची शांतता असते. प्रत्यक्ष वादळ झेपत नाही. जंगलातील वादळे भीतीदायक असतात. मानवी वस्तीतील वादळे माणसांचं आयुष्य काही क्षणात बदलून टाकतात.
एखादं मानसिक वादळ माणसाचं आयुष्य बदलून टाकते. काही या वादळाला तोंड देतात काही त्यात उद्ध्वस्त होतात. काही जण वादळ येऊ नये याची खबरदारी घेतात आणि त्यापासून दूर रहातात.
– डॉ. नीलम ताटके