अहमदाबाद :- परंपरागत प्रतिस्पर्धी यजमान भारत व पाकिस्तान यांच्यात आज (शनिवार) येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वात चर्चिला जात असलेला सामना रंगणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असले तरीही आजवर विश्वकरंडक स्पर्धेचा इतिहास भारताच्या बाजूने असल्याने त्यांचेच पारडे जड राहणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान
वेळ – दुपारी 2 पासून
ठिकाण – अहमदाबाद
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या लढतींत भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. हा सामना केवळ नेतृत्वाचा नसून जागतिक किर्तीची फलंदाजी व गोलंदाजी यांच्यात रंगणार आहे. पाकिस्तानबाबत बोलायचे तर ज्या शाहीन शाह आफ्रीदीचे कौतुक ते करत होते, त्याची या स्पर्धेत आतापर्यंतची कामगिरी फारशी सरस राहीलेली नाही. उलट त्यांचा हसन अली जास्त धोकादायक वाटतो.
लेगस्पीन गोलंदाज शादाब खान व ऑफस्पीनर इफ्तेखार अहमदही चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या फलंदाजीचे चित्र पाहीले तर कीतीही प्रौढी मिरवत असला तरीही बाबर आझम त्या भरात नाही. त्यांची संपूर्ण फलंदाजी महंमद रिझवान, अब्दुल्ला शफिक, सौद शकिल, इफ्तेखार अहमद हेच सध्या भरात आहेत. भारताच्या जसप्रीत बूमराह आणि कंपनीने या चार जणांना लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तर भारतासाठी हा सामना सोपा ठरेल.
पाकिस्तानविरुद्धचा प्रत्येक सामना माध्यमांमुळे जास्त चर्चेत येतो, तसाच आताही आहे. मात्र, आम्ही कोणत्याही दडपणाखाली नसून स्पर्धेतील अन्य संघाप्रमाणेच या सामन्यात खेळ करु. आमच्या संघात वरिष्ठ व नवोदित यांच्यात सुरेश ताळमेळ आहे व घरच्या मैदानावर खेळण्याचाही लाभ होइल.
– रोहित शर्मा, कर्णधार भारत
पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचे वेळ आली तर हे सुत्र यशस्वी ठरले पाहीजे. पहिल्यांदा फलंदाजी मिळाली तर धावसंख्या 350-380 अशी उभारण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा राहिला पाहीजे. पाकिस्तानचा संघ अन्य कोणत्याही संघाविरुद्ध जसा खेळतो त्यापेक्षा कीतीतरी गांभीर्याने व जोशाने भारताविरुद्ध खेळतो. त्यामुळे केवळ फलंदाजी व गोलंदाजीतच लक्ष ठेवून चालणार नाही तर क्षेत्ररक्षणावरही कमालीचे लक्ष ठेवावे लागणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी खेळला होता, त्यामुळे त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे.
नैसर्गिक खेळ ही पाकिस्तानची सर्वात मोठी ताकद आहे. सुरुवातीला जरी आम्ही बळी गमावले तरीही मोठे लक्ष्य गाठू शकतो हे आम्ही अनेकदा सिद्ध केले आहे. भारताची फलंदाजी जर सर्वात भक्कम मानली जाते तर आमची गोलंदाजी जागतिक स्तरावरची सर्वात भेदक गोलंदाजी ठरते.
– बाबर आझम, कर्णधार पाकिस्तान
अर्थात हा सामना जिंकायचा असेल तर भारताच्या पहिल्या चारही फलंदाजांना मोठी खेळी करावी लागेल. हार्दिक पंड्या व रवीद्र जडेजा यांची कामगिरी बोनस असेल. गोलंदाजीत जडेजासह फिरकीची संधी कुलदीप यादवला मिळेल असेच सध्या तरी चित्र आहे. महंमद सिराजच्या जागी महंमद शमीला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी रवीचंद्रन अश्विन किंवा सूर्यकुमार यादवलाही संधी मिळू शकते. या सामन्यात पाकिस्तानच्या संघातील गोलंदाजांचे सक्षम पर्याय पाहता भारतीय संघ खोलवर फलंदाजी ठेवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल.
इतिहास भारताच्या बाजूने..
एकदिवीसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत इतिहासात डोकावले तर भारताचेच वर्चस्व राहीलेले आहे. आजवर या दोन संघात झालेले सातही सामने भारताने जिंकले आहेत. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा अपवाद वगळता एकदिवसीय विश्वकरंडकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून कधीही पराभव पत्करावा लागलेला नाही. आता ही नकोषी कामगिरी पाकिस्तानचा संघ बदलणार का भारताचेच 8-0 असे वर्चस्व कायम राहणार याची उत्कंठा लागली आहे.
शाहीनला जबाबदारीने हाताळावे लागेल..
भारतीय फलंदाजांची कमकुवत बाब म्हणजे डावखुरे वोगवान गोलंदाज. त्यांच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेला शाहीन शाह आफ्रीदी अनेकदा भारताच्या पहिल्या चार फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित, विराट कोहली, इशान किशन किंवा फीट ठरला तर शुभमन गिल व लोकेश राहुल यांना अत्यंत सावध फलंदाजी करावी लागणार आहे. शाहीनकडे जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्याची हतोटी नाही त्यामुळे त्याचा पहिलाच नव्या चेंडूवरचा सहा षटकांचा स्पेल या सामन्याचे चित्र निश्चित करु शकतो.
गिलबाबत संभ्रम…
भारताचा नवोदित सलामीवीर शुभमन गिल हा या सामन्यात खेळणार का याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. त्याला डेंग्यु झाला होता, त्यामुळे त्यातून बरा झाल्यावर सरावही केला असला तरीही तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळेल का याबाबत संघ व्यवस्थापनाने काहीही जाहीर केलेले नाही. गिल जर उपलब्ध झाला तर भारतीय संघाच्या मानेवरचे खूप मोठे ओझे दूर होणार आहे.
लक्षवेधी
– विश्वकरंडक इतिहासातील या दोन संघातील हा 8 वा सामना
– भारताचे सात विजय, तर पाकला अद्याप विजय गवसलेला नाही
– यंदाच्या स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची दोन्ही संघांना संधी
– एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात पाकिस्तान सरस
– भारतात भारताविरुद्ध 30 पैकी 19 सामन्यांत विजय
– भारताचे 11 विजय
– विश्वकरंडकात भारतात भारतच पाकपेक्षा सरस
कुलदीपविरुद्ध बाबर…
पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज व कर्णधार बाबर आझम अनेकदा भारतीय संघासाठी त्रासदायक ठरला आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्याला अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. भारतीय संघातीलच नव्हे अन्य संघातील डावखुरे चायनामन गोलंदाज बाबरविरुद्ध सातत्याने यशस्वी ठरले आहेत, त्यामुळे या सामन्यात बाबर विरुद्ध कुलदीप हा सामना चांगलाच रंगतदार ठरेल अशी शक्यता आहे.
कोहली विरुद्ध बाबर नव्हे रिझवान
जागतिक स्तरावर बाबर आझम व विराट कोहली यांच्यात महान कोण ही चर्चा सातत्याने रंगते. मात्र, बाबरची सध्याची कामगिरी पाहता या सामन्यात खरी चुरस बाबर व कोहली यांच्यात नसून रिझवान व कोहली यांच्यात रंगेल अशी अपेक्षा आहे. रिझवानच्या खेळाचे जेवढे कौतुक व्हायला हवे होते तेवढे झालेले नाही परंतू त्याच्याकडे अफाट क्षमता आहे. त्यामुळे या लढतीत त्याला लवकर बाद केले तर भारताला व कोहलीला लवकर बाद केले तर पाकिस्तानला लाभ होणार आहे.