महिला सक्षमीकरण ही एक व्यापक संकल्पना व प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात व्यापक बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी समाजाची सखोल चिकित्सा होणे अपेक्षित असते. भारतात महिला व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तत्कालीन व ऐतिहासिक परिस्थितीची जाण असणे आवशक आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी, भारताच्या वर्तमान परिस्थितीसोबतच भूतकाळाचाही विचार झाला पाहिजे. भारतात सामाजिक परिवर्तनाची गती पाश्चात्य देशांच्या मानाने मंद आहे. याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे, भारतीयांवर असलेल्या रुढी व परंपरांचा पगडा आणि गेल्या बाराशे वर्षांचे पारतंत्र्य. या काळात अनेक अनिष्ठ रुढी परंपरा या समाजात रुजल्या, या विरोधात अनेक महा-मानवांनी संघर्ष केला. त्यापैकी एक म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय सामाजिक सुधारणेत अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु जाणता-अजाणता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त विशिष्ट एका जातीचे नेते, दलितांचे नेते किंवा हिंदू विरोधी असे प्रस्तृत केले जाते. परंतु ते पूर्णपणे अयोग्य आहे. कारण बाबासाहेबांचे विचार समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वावर आधारित आहे. त्यात कोणत्याही जातींचा, धर्मांचा व समूहाचा विरोध नसून फक्त विषमता व अन्यायाचा विरोध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार विशेषतः महिलांसंदर्भातील विचार लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान महिला सक्षमीकरणाबाबत मोलाचे आहे.
बाबासाहेब हे फार थोड्या नेत्यांमध्ये होते ज्यांनी सामाजिक चळवळीत महिला सहभागाबाबत विचार केला. त्यांच्या मते सामाजिक विषमता, शोषण दूर करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्याच्या परिणाम स्वरूप, काळाराम मंदिर सत्याग्रह व महाडच्या सत्याग्रहात महिलांचा फार मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता. त्यांनी आपल्या भाषणासोबतच आपल्या लेखणीचा वापर महिला जागृतीसाठी केला. मूकनायक व बहिष्कृत भारत या त्यांच्या वर्तमानपत्रांद्वारे त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. त्याचाच परिणाम म्हणून तुळशीबाई बनसोडे या महिलेने “चोखामेळा’ हे वर्तमानपत्र सुरू केले व समाजातील कुप्रथांवर घाला घालण्याचे काम केले. त्याचप्रमाणे मुंबईतील कामाठीपुरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा मध्यस्थी/दलाल म्हणून काम करणारा व्यक्ती बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तो व्यवसाय सोडून त्या महिलांच्या विकासासाठी/मुक्तीसाठी काम करू लागला.
बाबासाहेबांचे महिला शिक्षणाबाबत स्पष्ट असे विचार आहेत, त्यांच्या मते मुलगा शिकला तर फक्त त्याचा एकट्याचाच विकास होतो; परंतु मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. मुली जर शिकल्या तर विषमता व सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतील. बाबासाहेबांचे महिला सक्षमीकरणबाबतचे काम फक्त जनजागृतीपर्यंत मर्यादित नव्हते, तर त्यांनी प्रत्यक्ष कायदे निर्मितीत पण महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. हिंदू समाजातील महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संसदेत आणलेले हिंदू कोड बिल हा त्याचाच एक भाग, त्यासाठी त्यांनी बऱ्याच नेत्यांशी संघर्ष केला. परंतु त्यावेळच्या राजकारणी व समाजकारण्यांनी त्यांना सहकार्य केले नाही. बिल पास न झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
तसेच कायदे मंत्री असताना त्यांनी महिलांच्या हक्काचा विचार करून अनेक कायदे अस्तित्वात आणले. बऱ्याचदा त्यांच्यावर हिंदुविरोधी म्हणून टीका झाल्यात, परंतु त्यांचा विचार फक्त एका समूहापर्यंत मर्यादित नसून तो संपूर्ण मानव जातीसाठी उपयोगी आहे. त्यांनी हिंदूंसोबत मुस्लीम महिलांच्याही हक्कांबाबत आपले विचार मांडले. मुस्लीम महिलांवरील अन्याय व अनिष्ट रुढी संदर्भात त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी मुस्लीम समाजात असलेल्या पडदा पद्धतीवर जोरदार टीका केलेली आहे. त्यासोबत त्यांनी समान नागरी कायद्यासाठीही प्रयत्न केले. बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील विषमता आधारित कुप्रथांना विरोध करून हिंदू धर्माची समानतेवर आधारित पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना बराच रोष पत्करावा लागला.
बाबासाहेबांच्या मते स्त्रीला विवाहाचा, जोडीदार निवडण्याचा, घटस्फोटाचा व पोटगीचा अधिकार असावा. त्यासोबतच वडिलोपार्जित संपतीत महिलांना समान वाटा मिळावा असं त्यांचं मत होतं. यासोबतच मजूर मंत्री असताना त्यानी महिलांना पुरुषांप्रमाणे वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच काम करणाऱ्या व नोकरदार महिलांना प्रसूतीनंतर विश्रांती व बालसंगोपनासाठी रजा मंजूर करून महिला विकासाबाबत आपली कटिबद्धता दर्शवली. महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे प्रजनन व संतती नियमन. यातही बाबासाहेबांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, प्रजनन वृद्धीमुळे माता व बालक दोघांच्याही आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
प्रजननबाबतचा निर्णय महिलांकडे असावा असे त्यांचे मत होते. त्यामुळे संतती नियमन/कुटुंब नियोजन हे महिलांसाठी वरदान आहे, असे त्यांचे मत होते. तसेच लोकसंख्या वाढ हे भारतातील दारिद्य्रतेचे प्रमुख कारण आहे. म्हणून संतती नियमन हाच लोकसंख्या वाढीच्या समस्येला योग्य उपाय आहे. परंतु तत्कालीन नेत्यांनी ब्रह्मचर्यपालन व स्वयं नियंत्रण हे पर्याय सुचवले होते. त्याच्या विरोधात त्यांनी म्हटले होते की, सामान्य माणसासाठी भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्यामुळे वरील दोन्ही पर्याय व्यावहारिक नाहीत.
त्यांच्या मते, शासनाने जनतेला कुटुंब नियोजनाची साधने उपलब्ध करून देणे व त्यांची जनजागृती करणे हे शासनाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. यासोबतच त्यांनी संतती नियोजनासाठी जनजागृती व काम करणारे महर्षी कर्वे यांना त्यांच्या आंदोलनात कायदेशीर मदत करून महिला सक्षमीकरणात मोलाचे योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.
तुषार सावरकर