नुकताच पावसाळा संपला होता तेव्हाची गोष्ट. सारा परिसर, झाडेपेडे, शेतीभाती, घरेदारे सारी न्हाऊन नटून जणू नव्या नवतीचा हिरव्यागार पाचूचं लेणं ल्याली होती. थंडगार वातावरणातही येणारी मंदशी झुळूक जीवाला सुखावित होती. हातात होती ती एक छोटीशी हालकी बॅग. रमत गमत भोवतीच्या सृष्टीचा सोहळा डोळे भरून पाहत चाललो होतो. गावाबाहेरंची नव्यानं झालेली वसाहत आणि जवळच असणारे बसस्थानक. शिवाय खिशात आरक्षणाचे तिकीट. एक जवळच्या गावाला व्याख्यानाला व्याख्याता म्हणून मी चाललो होतो.
निवृत्ती नंतरचा हा माझा समाजभिमुख छंद म्हणजे आयुष्याचे सुखद उत्तरायण अनुभवण्या कारण ठरले होते. एरवी माझ्या अनेक निवृत्त मित्रांच्या तन मनाचे हाल मी पाहिले आहेत. मी स्थानकावर पोहोचलो. एका बाकावर विसावलो. बायाबापड्यांचा कलकलाट, तावातावाने बाप्यांची चाललेली बाचाबाची, मराठी, कानडी, तेलगू भाषांचा जणू एकसुरी कलकलाट मी अनुभवित ऐकत निवांत बसलो होतो. मधूनच भज्यांचा खमंग वास, तर कुठून बिडी काडीचा जीवघेणा गंध, मधूनच गटारच्या घाणीतला दुर्गंध. हा सारा गर्दी सोहळा निवांत अनुभविण्यातही एक अनोखे सुख असते.
तेवढ्यात माझ्या शेजारी कोणीसे येऊन बसले. अंगावर फाटके मळकत कपडे, दाढीखुंट म्हणावी अशी वाढलेली. डोळे निस्तेज. नजर जणू हरवल्यासारखी, काही तरी शोधत असलेला. चटकन पुढे होऊन माझ्या खांद्यावर थोपटल्या सारखे करीत म्हणाला, “काटारे, ओळखले नाहीस मला, अरे मी तो अमुकत तमुक तुझ्या गल्लीतला शेजारी रे. एकेकाळचे आपण जानी दोस्तना? काय गावाला चाललायस काय, तू तर आता मोठा माणूस झालायंस. बरं एक काम कर वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय.
येताना पैसे आणायचे विसरलो बघ गडबडीत पाचशे रुपये दे.’ मी अवाक् होऊन पाहत होतो. ओळख पटली. हा शेजारी राहणारा रघू. एकेकाळचे त्याचे वैभव, संपन्न, घर भला मोठा वाडाच. घरात नोकर चाकारांचा राबता. हाही एकेकाळचा हुशार विद्यार्थी. वर्गात नेहमी पहिला. मग ह्याचा आज असा अवतार का? चटकन लक्षात आले तो त्याच्या तोंडचा दारूचा भपका. तरीही मन म्हणाले, एकेकाळी आपल्या सारख्या गरिबाला किती मदत केलीयं. मग हा आज असा कसा आणि तोही दारूच्या नशेत. शेवटी न राहवून पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले. आभारही न मानता हा विजयीमुद्रेने तरातरा निघूनही गेला.
तेवढ्यात कोणी ओळखीचा माणूस जवळ येऊन बसला. गप्पा सुरू झाल्या. शेवटी त्यानेच विचारले, “दिले नाहीत ना त्या रघ्याला पैसे. अहो एक नंबरचा हा बेवडा, अशी काही कारणे सांगतो की समोरचा माणूस भुलतो, पैसे देतो. त्याची दिवसाची दारूची सोय होते. एकेकाळचं नांदत खेळत श्रीमंत घर ह्याच्या व्यसनाने उद्ध्वस्त झालंय हो. आईबाप धक्क्याने गेले. बायको सोडून गेलीयं. हा असाच दिवस दिवस दारू पिऊन गटारच्याकडेला विसावतो.’ तेवढ्यात बस आली. निरोप घेऊन मी बसमध्ये बसलो. प्रवासभर मनात थैमान चालू होते, “हे असे का होते. उत्तर काय?’
-महादेव साने