विजय शेंडगे
करोना आला. लॉकडाऊन झालं. माणसाला घरात बसून राहावं लागलं. कुठलीतरी अदृश्य शक्ती घड्याळाचे काटे मागे ओढत असावी असं वाटत होतं. वेळ पुढे सरकत नव्हती. टीव्हीच्या खुंटीला किती वेळ डोळे अडकवून ठेवणार? पण स्वस्थ बसणे हा कलावंतांचा स्वभाव नाही. लेखक, कवी तर नाहीच स्वस्थ बसू शकत. जाणवत नसली तरी हवा सतत वाहत असते तसंच कवीच्या मेंदूत सतत काहीतरी वैचारिक क्रिया सुरू असतात. करोना काळात तर अनेक कवी, लेखकांच्या लेखणीला उधाण आलं. कादंबऱ्या, कथा, कविता प्रसवल्या गेल्या. आशिष निनगुरकर यांचा कुलूपबंद हा कवितासंग्रह त्याच कुलूपबंद काळाची देणगी आहे.
“कुलूपबंद’ हे शीर्षक वाचल्यावर काही क्षण “देऊळबंद’ या सिनेमाची आठवण झाली. निनगुरकर कवी असले तरी सिनेक्षेत्राविषयी त्यांना अधिक ओढ आहे. काही टेलिफिल्म, शॉर्ट फिल्म त्यांनी बनवल्या आहेत. त्यासाठी लेखन केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या काव्यसंग्रहासाठी शीर्षक निवडताना त्यांनाही देऊळबंदची आठवण झाली असेल, तर त्यात नवल वाटावं असं काही नाही.
काव्यसंग्रहाचं शीर्षक आणि कवीच्या मनोगतातील “करोनाकाळातील आत्मपरीक्षण आणि समाज निरीक्षण यांची पार्श्वभूमी या लेखनाला आहे’, अशी कवीची कबुली लक्षात घेतल्यानंतर या संग्रहातील कविता करोनाभोवती फेर धरत असाव्यात असा समज होतो. पण त्याच मनोगतात कवी म्हणतो, “हा कवितासंग्रह
अंतःकरणातील संवेदना सांगणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.’ कविता वाचताना त्याची प्रचिती येत राहते.
करोनाने माणसाला एक वेगळीच भीती दिली, नको ते आजार दिले, गडद झालेली मृत्यूची सावली दिली, बैलांना मुसक्या असाव्यात तसे नाकावर मास्क दिले, माणसाने माणसाशी अंतर राखून वागावं हे शिकलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवघेणा एकांत दिला. अशा एकांताची माणसाला सवय नव्हती. त्यामुळे ज्यांना एकांतात सुख असेल असं वाटायचं त्यांचा भ्रम करोनाने दूर केला. त्याविषयी कवी म्हणतो –
जगणं कुलूपबंद झालं तरी
वेळ कुणासाठी थांबत नाही
एकांतात राहायचं ठरवलं
म्हणून सुख मिळत नाही
कुलूपबंदसह करोना काळाची, लॉकडाऊनची सावली पडलेल्या आणखी कविता या काव्यसंग्रहात आहेत. परंतु बऱ्याचशा कविता आदर्शवादाची पेरणी करताना, आशावादाची पखरण करताना दिसतात.
चढ उतार सुरू असतात म्हणून थांबायचं नसतं आभाळाला आपलं म्हणायचं असेल तर आपला आपल्या पंखावर विश्वास असावा लागतो. परंतु करोना काळात काही माणसांनी आपल्या पंखावरील विश्वास गमावला. पण अनेकजण करोनाने गडद केलेल्या त्या अंधारमय काळातही आशेचा किरण शोधत राहिले. माणसाचा हा आशावाद त्याला भविष्याच्या दिशेने नक्कीच घेऊन जाईल, असं सांगण्याचा प्रयत्न कुलूपबंद हा कवितासंग्रह करतो.
प्रकाशक : सृजन संवाद पृष्ठे : 88 मूल्य : 175 रुपये