गेल्या काही दिवसांपासून महादेवराव प्रचंड तणावात होते. चिंतेचं भयान सावट त्यांच्या माथ्यावर स्पष्ट जाणवत होतं. कुठला तरी गंभीर विचार त्यांना मनातल्या मनात सारखा सतावत होता. निर्मलाबाईंच्या हे लक्षात आलंच होतं. मध्यंतरी निर्मलाबाईंनी महादेवरावांना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असलेल्या चिंतेचे कारणही विचारले होते. परंतु काही नाही गं, असचं आपलं वैयक्तिक काहीतरी… असं म्हणून महादेवरावांनी पत्नीच्या मनात सुरू झालेल्या शंकेला पूर्णविराम लावला. त्यामुळेच कदाचित त्यांनी पतीच्या या तणावग्रस्त जगण्याचा फारसा गांभीर्याने विचार केला नाही.
महादेवराव एका साधारण गरीब शेतकरी कुटुंबातून होते. त्यांचे वडील शेतीचे काम करायचे. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. जमीन काळी आणि कसदार असल्यामुळे दरवर्षी चांगलं उत्पन्न व्हायचं. वडील वारकरी संप्रदायाशी निगडित असल्यामुळे नेहमीच विठ्ठल भक्तीत रमलेले असायचे. पंढरीच्या विठ्ठलावर त्यांचे खूप प्रेम होते. त्यामुळे घरीही वातावरण भक्तिमयच असायचे. दरवर्षी न चुकता वडिलांची वारी ठरलेलीच असायची. तेच संस्कार महादेवरावांमध्ये सुद्धा उतरले होते. वडिलांसोबत लहानपणी त्यांनी पंढरपूरच्या दोन तीन वाऱ्या देखील केल्या होत्या. पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर महादेवरावांनी त्यांचं पंढरीच्या वारीला जाण्याचं कार्य असंच अखंडपणे सुरू ठेवलं होतं. पत्नी निर्मलाबाई देखील आपल्या पतीला तेवढ्याच तन्मयतेने तत्पर राहून साथ द्यायच्या. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या निर्मलाबाईंनी कधीही कुठल्याही बाबतीत केव्हाच नाराजी व्यक्त केली नाही किंवा आपला मोठेपणाही व्यक्त केला नाही. उलट त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या पतीच्या पाठीशी राहून त्यांना सदैव मोलाची साथ दिली.
आज अचानक दिनकररावांचा फोन आला. दिनकरराव म्हणजे महादेवरावांचा बालमित्र, सोबतच शिकलेले. मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण दोघांनीही एकाच शाळेतून पूर्ण केलं होतं. दोघेही वर्गात सारखेच हुशार होते. मॅट्रिकची परीक्षा दोघांनीही प्रथम श्रेणीत पास केली होती. दिनकररावांचे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांना आपल्या मुलाच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता असल्यामुळे त्यांनी दिनकररावांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्याला पाठविले होते. मात्र जेमतेम परिस्थितीमुळे महादेवराव फार तर बारावीपर्यंतचं शिक्षण घेऊ शकले होते. त्यानंतर वडिलांना मदत म्हणून शेतातच स्वतः राबू लागले.
वडिलांचं वार्धक्य आणि आईचं आजारपण सांभाळत कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली होती. अशातच त्यांचं लग्न निर्मलाबाईंशी झालं. निर्मलाबाई प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या असल्याने त्यांनीही महादेवराव आणि त्यांच्या कुटुंबाला मुलीच्या मायेने जपलं. पुढे मुलांचं शिक्षण, त्यांचं भवितव्य आणि कुटुंबाची जबाबदारी यातून महादेवरावांना स्वतःसाठी कधी वेळच देता आला नाही. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मुलांचं उज्ज्वल भवितव्य आणि पत्नीचं सुख या दोनच गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर होत्या. या दरम्यान दिनकरराव डॉक्टर होऊन पुण्यात स्थायिक झाले होते. अधूनमधून दिनकरराव आपल्या या बालमित्राच्या संपर्कात असायचे.
एक महिन्यापूर्वी महादेवराव असेच शेतात काम करताना चक्कर येऊन पडले होते. तेव्हापासून त्यांचं डोकं नेहमीच भनानत होतं. डोक्यात तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांची अस्वस्थता कमालीची वाढली होती.आपल्याला काय होतंय हे त्यांना कळतच नव्हतं. आज अचानक दिनकररावांचा फोन आल्यामुळे महादेवरावांना मनातून थोडंसं हायसं वाटलं. परंतु दिनकररावांना मात्र महादेवरावांच्या मनातील आणि बोलण्यातील अस्वस्थता लगेच कळली होती. “”महादेव, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस मित्रा!’ तुझ्या बोलण्यातून मला तसं स्पष्टचं जाणवत आहे म्हणून विचारलं रे, काय झालंय ते सांग ना.” दिनकरराव विचारत होते. “”काही नाही रे… असंच आपलं डोकं दुखतंय बस्स!” महादेवरावांनी पुन्हा प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र दिनकररावांची खात्रीच पटली.
“”महादेव, अरे मी अनोळखी आहे का तुझ्यासाठी? आपण जिवलग मित्र आहोत ना? बालपणी सारेच सुख दुःख आपण सारखेच वाटून घेतले ना, मग आताच हा परकेपणा का?” दिनकरराव भावूक होऊन बोलत होते. बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या होत्या. महादेवरावांचे सुद्धा डोळे पाणावले होते. “”गेल्या एक महिन्यापासून माझं सारखं डोकं दुखतंय मित्रा, तीव्र वेदना अन् अस्वस्थता पण खूप जाणवत आहे, काय करावं काहीच सुचत नाही? निर्मलाला आणि मुलांनासुद्धा अजून माहीत केलेलं नाहीये” महादेवराव आता खुलून बोलत होते. “”डॉक्टरांकडे गेला होतास का, काय म्हणाले ते?” दिनकरराव बोलले. “”नाही गेलोच नाही अजून?” महादेवराव सांगू लागले.””स्वतःला जप जरा, काळजी घे आणि हो उद्याच जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घे, मी उद्या फोन करतोच तुला” असे बोलून दिनकररावांनी फोन ठेवला.
दुसऱ्या दिवशी महादेवरावांनी न्यूरॉलॉजिस्टकडे जाऊन, गेल्या काही दिवसांपासून त्यांना होत असलेल्या डोक्याच्या दुखण्याबद्दल डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी त्यांना सिटी स्कॅन आणि त्यानंतर एमआरआय टेस्ट करावयास सांगितले. दोन्ही रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होते म्हणून डॉक्टरांनी महादेवरावांना संध्याकाळीच रिपोर्ट घेऊन हॉस्पिटलमध्ये बोलविले होते. सांगितलेल्या वेळेवर महादेवराव रिपोर्ट घेऊन दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी रिपोर्ट बघितला आणि ते महादेवरावांकडे बघू लागले. “”काय झालंय डॉक्टरसाहेब मला?” महादेवरावांनी लगेच प्रश्न केला. “”महादेवराव, तुमच्या मेंदूच्या डाव्या बाजूला ट्युमर झालायं… “ब्रेन ट्युमर’…! ऑपरेशन करावे लागेल. दहा ते वीस लाख रुपये एवढा खर्च येऊ शकतो.” डॉक्टर सांगत होते. त्यांच हे वाक्य ऐकताच महादेवरावांना धक्काच बसला. काहीही न बोलता महादेवराव घरी परतले. त्यांचा चेहरा एका अनाहूत भीतीने निस्तेज झाला होता.
आयुष्याचा डाव आता मोडणार या भीतीने महादेवराव सुन्न झाले होते. त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते. आषाढी एकादशी जवळ आली होती. सर्व वारकऱ्यांना पंढरीचे आणि विठू दर्शनाचे वेध लागले होते. महादेवरावांचे सर्व वारकरी मित्र या वर्षी पंढरीच्या पायी वारीसाठी सज्ज होते. महादेवरावांना मात्र आता आपली वारी यावर्षी होऊ शकणार नाही याचे अतीव दुःख झाले होते. मात्र पत्नी आणि मुलांना ही बाब माहिती पडू नये असे त्यांनी मनात ठरविलेच होते. कारण कुटुंबावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. याच विचारचक्रात असताना फोनची रिंग वाजली. कुणाचा फोन असेल म्हणून फोन उचलताच, “”हल्लो, महादेव मी दिनकर बोलतोय; गेला होतास का डॉक्टरांकडे? काय म्हणतायेत तुझे रिपोर्टस?” एक नाही तर अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.
“”रिपोर्टस पॉझिटिव्ह आहेत; ब्रेन ट्युमर झालाय मला, ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर म्हणत होते. दहा ते वीस लाख रुपये खर्च येऊ शकतो. उगीचच घरच्यांना त्रास नको म्हणून अजून तरी घरी कुणाला माहीत केलेलं नाही.” महादेवराव सांगू लागले. “”पुढे काय ठरवलसं तू” दिनकररावांनी विचारले.””नाही, अजून तरी काही ठरवलेलं नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळाच्या सावटाखाली जगतोय. शेतीचं उत्पन्न खूप कमी झालंय. शिवाय मुलाची नोकरी, लग्न, मुलीचे लग्न आणि लहान मुलाच्या शिक्षणाचा खर्च हे सर्व कसं पेललंय ते माझं मलाचं ठाऊक; त्यात डोईवर वाढलेला कर्जाचा भार, खूप मोठा डोंगर समोर उभा आहे. मुलांना हे सर्व नाही सांगू शकत. आता कुठे मुलांच्या आयुष्याला उभारी मिळाली. त्यांना दडपणाखाली आणून त्यांचा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही रे दिनकर, बघू काहीतरी. आषाढ वारी जवळ आली आहे.
माझं सर्व लक्ष तिकडेच आहे. यंदा जायला मिळेल की नाही यात शंकाच आहे” असे बोलून महादेवराव भावूक झाले होते. “”महादेव, अरे काळजी नको करूस तुझा मित्र आहे ना, सर्व ठीक होईल पहिल्यासारखेच.तुझ्या डॉक्टरांचा नंबर दे मला, मी बोलतोय त्यांच्याशी. होईल सर्व ठीक.” असं बोलून दिनकररावांनी फोन ठेवला. निर्मलाबाईंनी महादेवराव व दिनकररावांचं हे बोलणं ऐकलं आणि त्यांना एकाएकी खूप मोठा धक्काच बसला. आपल्या माघारी एवढं सगळं घडतंय आणि आपल्याला माहिती का नसावं? त्या स्वतःलाच कोसू लागल्या. आपल्याला सर्व कळून चुकलंय हे निर्मलाबाईंनी सुद्धा महादेवरावांना कळू दिलं नाही. महादेवराव फोन ठेवताच बाहेर पडले. महादेवराव बाहेर गेल्याचे निमित्त साधून निर्मलाबाईंनी दिनकररावांना फोन करून महादेवरावांना नक्की काय झालंय याबद्दल विचारपूस केली. परंतु दिनकररावांनी त्यांना काहीही सांगण्यास टाळाटाळ केली. तेव्हा निर्मलाबाईंनी मला सर्व कळून चुकलंय भावजी, तुम्हीच काही तरी करा आता. असे बोलून त्यांनी आसवांना वाट मोकळी करून दिली.
दिनकररावही क्षणभर भावूक झाले होते. वहिनी तुम्ही डॉक्टरांचा मोबाइल नंबर द्या मला ताबडतोब, महादेव नाहीच ऐकणार माझं, असं बोलून त्यांनी निर्मलाबाईंना महादेवरावांच्या नकळत सर्व रिपोर्टस शोधावयास लावले. निर्मलाबाईंनी सर्व रिपोर्टस शोधून त्यावरून डॉक्टरांचा मोबाइल नंबर शोधला आणि दिनकररावांना कळवला.
महादेवरावांना काय करावं काहीच सुचत नव्हतं. मन अस्थिर झालं होतं. विचारांचं वादळ एकसारखं मनात पिंगा घालत होतं. विठू नामाचे सूर कानावर आदळत होते आणि डोळ्यांसमोर फक्त वारीच दिसत होती.डॉक्टरांनी एक महिन्याच्या आत ऑपरेशन व्हायलाच हवं असे सांगितले होते. दिवस भराभर निघून जात होते परंतु अद्यापही महादेवराव आपला ठोस निर्णय घेऊ शकले नव्हते. असेच विचारात असताना एके दिवशी महादेवरावांना डॉक्टरांचा फोन आला; त्यांनी ताबडतोब दवाखान्यात उपस्थित राहण्यास सांगितले होते. डॉक्टरांनी आपल्याला दवाखान्यात कशाला बोलाविले असेल असे एक ना अनेक प्रश्न महादेवरावांच्या मनात उपस्थित झाले होते. डॉक्टरांनी बोलाविले तर जावेच लागेल असा विचार करून ते घराबाहेर पडले. जाताना त्यांनी शेतीच्या कामानिमित्त बॅंकेत जात असल्याचे निर्मलाबाईंना कळविले होते. दवाखान्यात जाताच ऑपरेशनची सर्व व्यवस्था झाली होती.
मुंबईवरून खास न्यूरॉलॉजिस्ट सर्जनची एक टीम उपस्थित झाली होती. “”या महादेवराव आज, आता थोड्या अवधीत आपलं मेंदूचं ऑपरेशन होणार. घाबरण्याचं काहीही कारण नाही. मुंबईहून चिकित्सकांची खास चमू येथे दाखल झाली आहे.आता कुठलाही किंतु परंतु चालणार नाही.” डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून महादेवराव अवाक झाले. आपल्या बाबत हे अचानक काय घडत आहे हे महादेवरावांच्या समजण्याच्या पलीकडे होतं. पुढे काहीही बोलण्याच्या अगोदर डॉक्टरांनी लगेच त्यांना ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतले.निर्मलाबाईंनाही फोन लावून दवाखान्यात बोलावून घेण्यात आले. निर्मलाबाईंनी आपली मुलगी, जावई आणि दोन्ही मुलांना ताबडतोब दवाखान्यात उपस्थित राहण्यास सांगितले.
पाहता पाहता संपूर्ण गावात आणि नातेवाईकांमध्ये महादेवरावांच्या ऑपरेशनची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दवाखान्याभोवती महादेवरावांच्या सर्व हितचिंतकांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वजण महादेवरावांच्या यशस्वी ऑपरेशनसाठी ईश्वराकडे प्रार्थना करीत होते. अचानक घडलेला हा सर्व घटनाक्रम पाहून महादेवरावांची मुलेही अचंबित झाली होती. आमच्या माघारी एवढं सगळं घडलंय आणि आम्हाला काहीच माहिती नाही. असं बोलून मुलांनी आपल्या संवेदनशील भावना आई निर्मलाबाईंकडे व्यक्त केल्या.निर्मलाबाईंनी आतापर्यंत घडलेली संपूर्ण हकिकत मुलांना सांगितली.थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन कक्षातून बाहेर आले ते शुभवार्ता घेऊनच.
महादेवरावांचं ऑपरेशन यशस्वी झाल्याने निर्मलाबाई आणि मुलांना अगणित आनंद झाला होता, परंतु ऑपरेशनचा खर्च कुणी केला हे अजूनही गुलदस्त्यातच होते. सर्वांना उत्सुकता लागली होती त्या महान व्यक्तीचे नाव ऐकण्याची ज्यांच्यामुळे महादेवरावांना नवजीवन मिळालं होतं. निर्मलाबाईंनी आणि मुलांनी ऑपरेशनचा खर्च कुणी आणि कसा केला याबाबत डॉक्टरांना विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या मागे घडलेला हा सर्व प्रकार त्यांना सांगितला आणि खरी मेहनत डॉक्टर दिनकररावांची आहे. त्यांच्यामुळेच हे सर्व यशस्वीरित्या पार पडलं. सर्व खर्च आणि ऑपरेशनच नियोजन त्यांच होतं. त्यांनीच मला फोन करून हे सर्व जुळवून आणलं असे आवर्जून सांगण्यास डॉक्टर विसरले नाही.
महादेवरावांना हे ऐकून खूप गहिवरून आलं. आपल्या जिवलग मित्राचे उपकार कसे फेडावे हेच त्यांना कळत नव्हतं. तेवढ्यात दिनकररावांचा फोन आला. मित्र प्रेमाचा गहिवर दोघांच्याही मनात दाटून आला होता. मित्राचे खूप खूप आभार मानून महादेवरावांनी फोन ठेवला. बाहेर त्यांना भेटणाऱ्यांची रीघ लागली होती. डोळ्यासमोर दिनकरराव विठ्ठलाच्या वेशात असल्याचा भास होत होता आणि भेटणारे सर्व जिवलग वारकरी असल्याचे भासत होते. पंढरीची वारी आणि अख्ख पंढरपूर महादेवरावांच्या डोळ्यापुढे उभं ठाकलं होतं आणि आता विठूनामाच्या गजरात महादेवराव तल्लीन झाले होते.
– विशाल कन्हेरकर