आतासारख्या टीआरपीसाठी पहिल्यांदा ब्रेकिंग न्यूज देण्याची होड सुरू असलेल्या वृत्तवाहिन्यांचा गलबला सुरू होण्यापूर्वी दूरदर्शन हेच एकमेव इलेक्ट्रॉनिक वृत्तमाध्यम होते. तेव्हा छोट्या पडद्यावरच्या चेहऱ्यांना आजच्यापेक्षाही अधिक ग्लॅमर होते. त्यावेळी दूरदर्शनवरून बातम्या देणारे भक्ती बर्वे, स्मिता पाटील, स्मिता तळवलकर, ज्योत्स्ना किरपेकर आणि प्रदीप भिडे हे मराठी माणसांचे आवडते आवाज व चेहरे होते.
प्रदीप भिडे यांचा मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आताच्या “सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे “नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज ऐकण्यासाठी लोक उत्सुक असत. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपटांचा “आवाज’ प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने
7 जून, 2022 रोजी मुंबईत निधन झालं आणि विविध वाहिन्यांवर आजच्या ठळक बातम्यांमध्ये ही बातमी पाहायला आणि ऐकायला मिळाली.
1974 ते 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. त्यांच्या मागे पत्नी सुजाता, मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आठवणींनी धामणी गाव हळहळले. प्रदीप जगन्नाथ भिडे यांचे वडील जगन्नाथ भिडेसर व आई शुभलक्ष्मी रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करत. हडपसर व मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधून त्यांची बदली धामणी येथे 1965 साली झाली. या भिडे दाम्पत्याला प्रदीप, दिलीप, स्वरूप आणि सीमा ही चार मुले. या चारही जणांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धामणीच्या जीवन शिक्षण मंदिर धामणी व श्री शिवाजी विद्यालय या शाळेत झाले.
आईवडिलांची विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. सन 1969 साली जुन्या अकरावी एसएससी परीक्षेत प्रदीप मंचर केंद्रात प्रथम आले. त्यांना त्यावेळी 80.4 टक्के गुण मिळाले. प्रदीप यांचे बंधू दिलीप हेसुद्धा 1972 साली एसएससी परीक्षेत मंचर केंद्रात प्रथम आले होते. यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठ्य पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच. भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठ्या आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. विष्णुसहस्रनामही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि “आवाज’ घडायला त्युांना मोलाची मदत झाली.
2017 मध्ये एका मुलाखतीत प्रदीप भिडे यांनी, मुंबई दूरदर्शन केंद्रावर “वृत्तनिवेदक’ म्हणून झालेल्या प्रवेशाच्या आठवणी सांगितल्या होत्या. “आकाशवाणी किंवा दूरदर्शनकडे माझा ओढा होताच, तिथे आपण काम करावे असे वाटत होते. “रानडे’मध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत असताना मुंबई दूरदर्शन केंद्रावर उपसंचालक असलेले ल. गो. भागवत हे आम्हाला “दूरदर्शन’ हा विषय शिकवायला यायचे. आमच्यापैकी कोणाला दूरदर्शन केंद्रावर काम करायची इच्छा असेल तर त्यांनी जरूर येऊन भेटावे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार मी भागवत यांना भेटलो. दूरदर्शनवर माझी सुरुवात प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक म्हणून झाली. हे काम करत असतानाच्या काळात मुंबई दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक शास्त्री यांनी माझा आवाज ऐकून तू बातम्या का वाचत नाही? अशी विचारणा केली.
माझ्यासाठी ती संधी होती. वृत्तनिवेदक पदासाठी रीतसर ऑडिशन दिली आणि या पदासाठी माझी निवड झाली. मुंबई दूरदर्शन केंद्र 1972 मध्ये सुरू झाले आणि 1974 च्या डिसेंबर महिन्यात मी वृत्तनिवेदक म्हणून माझे पहिले बातमीपपत्र वाचले. पहिले बातमीपत्र जेव्हा वाचले तेव्हा सुरुवातीला मला अक्षरश: घाम फुटला होता. आपण बातम्या नीट वाचू की नाही अशीही मनात भीती वाटत होती. पण सुरुवातीच्या काही मिनिटांनतर दडपण दूर झाले आणि मी बातमीपत्र सादर केले. आता नेमक्या कोणत्या बातम्या वाचल्या ते आठवत नाही. पण पहिलेच बातमीपत्र छान आणि व्यवस्थित सादर झाले, अशी पावती मला मिळाली’, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस त्यांनी दाखवले. भिडे यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना “आवाज’ दिला असून सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले. “पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले. “पुणे फेस्टिव्हल’चा “उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला. शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा 1995 मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेही काही जाहीर कार्यक्रम आणि अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भिडे यांनी केले.
आवाजाच्या क्षेत्रात ते अमिन सयानी यांना गुरूस्थानी मानायचे. सयानी यांचा “बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम ते लहानपणापासून सातत्याने ऐकत आले. त्यानी स्वत:ची कंपनी व स्टुडिओ उभारला आणि लेखनही केले. या यशस्वी प्रवासात आपले पाय जमिनीवरच ठेवले आणि स्वभावातला मोकळेपणाही जपला. दिलीप चावरे, प्रदीप भिडे आणि राजीव दोंदे या तीन मित्रांनी स्थापन केलेल्या “सीबीडी फाउंडेशन’ या संस्थेने अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांपैकी अटलबिहारी वाजपेयी यांना “भारतरत्न’ हा बहुमान मिळाल्यानंतर सादर झालेला “अटलरत्न’ हा या कार्यक्रमांपैकी एक संस्मरणीय कार्यक्रम आहे. आपले लेखन कौशल्य दाखवीत “कवडसे संचिताचे’ या पुस्तकात भिडे यांनी फार रसाळ शैलीत व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. आपल्या यशस्वी आयुष्यात निकोपता आणि प्रसन्न सुसंस्कृतपणा त्यांनी अखेरपर्यंत जपला. प्रदीपजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
– विलास पंढरी