दहशतवादाने जेव्हा अक्राळरूप धारण केले होते त्यावेळी 1990 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सिनेमा हॉल बंद झाले होते. आता काश्मीर खोऱ्यात नव्याने सिनेमा हॉल सुरू होत आहे, ही काश्मीरसाठी नक्कीच चांगली वार्ता आहे.
जम्मू-काश्मीर खोऱ्यात सिनेमा, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होणार असल्याने ही सुखद आणि स्वागतार्ह बाब आहे. या केद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं आणि पुलवामा जिल्ह्यांत बहुउद्देशीय सिनेमा हॉलचे उद्घाटन करून एक नवीन आश्वासक सुरुवात केली आहे.
यामुळे आगामी कालावधीत काश्मीरमध्ये सकारात्मक रूपात बदल आणि आनंदी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. यानंतर लगेच श्रीनगरमध्येही मल्टिप्लेक्सची सुरुवात होणार आहे. या आश्वासक सुरुवातीला येणाऱ्या हिवाळा या ऋतूत चांगला प्रतिसाद मिळेल. देशातील या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या क्षेत्राने मात्र अनेक वर्षांपासून केवळ दुःखाचा डोंगर पाहिला आहे. त्यामुळे आता सर्वच चांगल्या बदलाची वाट पाहात आहेत.
1980च्या दशकात काश्मीर खोऱ्यात एकूण 15 सिनेमा हॉल सुरू होते. त्यापैकी नऊ श्रीनगरमध्ये होते. आताच्या नव्या पिढीला हे माहीतही नसेल की एकेकाळी श्रीनगरमध्ये ब्रॉडवे सिनेमा, रिगल सिनेमा, नीलम सिनेमा आणि पॅलेडियम सिनेमा हॉल होते. नंतर अनेक थिएटर सुरक्षा दलांच्या शिबिरांमध्ये परावर्तित करण्यात आले. दहशतवादाने काश्मीरला खोलवर जखम केली आहे. दहशतवादाने जे अधिक नुकसान केले आहे त्यामध्ये मनोरंजन उद्योग आणि लोकांच्या मनोरंजनाच्या अधिकारावर गदा, याचाही समावेश आहे.
1999 मध्ये खोऱ्यात सिनेमा हॉल सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पहिल्याच शो दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा सिनेमा हॉल सुरू करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. आता कलम 370 हटवल्यानंतर खोऱ्यातील तणावपूर्ण वातावरण निवळत चालले आहे. लोकांच्या भावनादेखील हेच सांगतात की, देशातील बाकी पिढीसाठी सिनेमा जर एक महत्त्वाची बाब असेल तर ती खोऱ्यातील मुलांसाठी का नाही?
सिनेमा हॉलचे उद्घाटन केल्यानंतर उपराज्यपालांनी म्हटले की, लवकरच जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल सुरू करण्यात येईल. श्रीनगरमध्ये पहिला आयनॉक्स मल्टिप्लेक्स सुरू होत आहे. त्याची आसनक्षमता 520 इतकी आहे. मनोरंजन आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. मनोरंजनामुळे समाधानाची भावना आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रेरित करते. सामाजिक वातावरण खेळीमेळीचे राहण्यातही सिनेमा महत्त्वाची भूमिका बजावतो.
आता सिनेमा हॉल सुरू झाला आहे तर सरकारची जबाबदारी आहे की सिनेमा हॉलला सुरक्षितता देण्यास प्राधान्य दिले जावे. त्याचबरोबर लोकांनी न घाबरता सिनेमा हॉलमध्ये जाणेही महत्त्वाचे आहे. लोकांच्या मनातील भीती घालवण्याचे कामसुद्धा सरकारलाच करावे लागणार आहे. सध्या तरी त्या ठिकाणी अशाच चित्रपटांना प्राधान्य दिले जावे ज्या चित्रपटातून राष्ट्रीय एकता आणि एकात्मितेचा संदेश दिलेला असेल.
काश्मीरमध्ये सध्या खेळीमेळीचे वातावरण रुजण्यास सुरुवात होत आहे. मात्र याठिकाणी हे लक्षात घ्यावे की, काश्मिरी पंडितांची हत्या आणि पलायन यासंबंधी करण्यात आलेल्या याचिकेवर चर्चा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दर्शवला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याबाबतीत योग्य उपाययोजना करण्याबाबत विचारणा केली आहे. काश्मीरमध्ये हत्या करण्यात आलेल्या टीका लाल टपलू या व्यक्तीचा मुलगा आशुतोष टपलू याने ही याचिका दाखल केली आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे काश्मिरी पंडितांची हत्या आणि पलायनाबाबत चौकशीची मागणी केली आहे.
खरे तर जुन्या फाइल उघडून त्यापासून फायदा होणार की नुकसान याचाही विचार केला जावा. जवळपास 30 वर्षांनंतर एखादा खटला चालवण्यासाठी आता ठोस पुरावे उपलब्ध असतील का? कोणत्या यंत्रणेला याकामी नियुक्त केले जाईल आणि त्याचा खरोखरच फायदा होणार का? या चौकशीमुळे समाजात सुसंवाद आणि समन्वय वाढणार की कमी होणार? ही मात्र शक्यता अधिक आहे की आज काश्मीरचे वातावरण सुस्थितीत येत असताना लोकांच्या जुन्या जखमाही हळूहळू बऱ्या होतील. लोकांच्या मनातून जुन्या आठवणी कमी होऊन त्यांच्या मनातील दुःखाची जागा हळूहळू आनंद घेईल.
– व्ही. के. कौर