सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात आश्विन प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र बसते. त्यामध्ये “घटस्थापना’ हा महत्त्वाचा विधी होय. प्राचीन वैदिक काळापासून “पूर्णकलश’ (भरलेला) हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच त्यात पावित्र्य आणि त्याच्या वास्तव्याने येणारे ऐश्वर्य याचेही ते प्रतीक आहे. दुर्गापूजेचा उत्सव निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील उल्लेखावरून आणि जुन्या नाण्यावरील मिळालेल्या मुद्रावरून हा उत्सव इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापासून पाळण्यात येतो, अशी माहिती मिळते. आसाम-बंगालमध्ये सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव अभूतपूर्व असा लोकप्रिय महोत्सव मानला गेला आहे. महाराष्ट्र-गुजरात-सौराष्ट्रातही घटस्थापनेला व नवरात्रोत्सवाला महत्त्व आहे.
नवरात्र अथवा दुर्गा-उत्सव आश्विन प्रतिपदा ते नवमीपर्यंत सर्व भारतभर साजरा केला जातो; काही जुन्या ग्रंथात हा चैत्र शुद्ध पक्षात ही साजरा करावा, असे म्हटले आहे. आजच्या चैत्रगौरीचे व्रत त्यातले असावे, हा उत्सव मोठ्या स्वरूपात घरोघर असा बिहार-बंगाल-आसाम या प्रांतात अधिक दिसून येतो. महाराष्ट्रात नवरात्र घरोघर बसते, देवीच्या मंदिरातून महोत्सव चालतो. पण आता सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सवासारखा “नवरात्रोत्सव’ साजरा होऊ लागला आहे. अर्थात, या सार्वत्रिक उत्सवात धार्मिकता कमी असते, हे लक्षात येऊ लागले आहे.
तिथीतत्त्व या संस्कृत ग्रंथात दुर्गाउत्सव केव्हा करावा याचे 7/8 पर्याय दिले आहेत. दुर्गापूजेच्या विधीची सविस्तर माहिती, पूजाविधी, उपासना, त्यामागचे तत्त्वे, याचे सविस्तर विवेचन संस्कृत ग्रंथ शुलपाणीकृत “दुर्गोत्सवविवेक’, रघुनंदन कृत “दुर्गार्चन पद्धती’, विद्यापति कृत “दुर्गाभक्तिरंगिणी’ या सारखे विशेष ग्रंथ आहेत. मार्कंडेय पुराणातील सप्तशती अथवा देवीमाहात्म्य, कालिका पुराण, बृहत् नंदीपुराण आणि देवीपुराण यामध्ये नवरात्रीतील धार्मिक विधीबद्दल सविस्तर माहिती आहे.
नवरात्रातील दुर्गापूजा नित्य स्वरूपाची आहे. न करणाऱ्यांवर देवीचा कोप होतो, अशी उपासकांची धारणा आहे. शिवाय हा उत्सव नैमित्तिक म्हणजे “काम्य’ स्वरूपाचाही आहे. कारण, मनात धरलेली इच्छा, नवस, शुभफले याची प्राप्ती या पूजेने होते असे म्हणतात. ही पूजा सार्वजनिक स्वरूपाची आहे. योग्य-अयोग्याचा विचार यात नाही. कोणत्याही गरीब-श्रीमंत, जातीच्या-पंथाच्या स्त्री-पुरुषाला या पूजेचा अधिकार आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक स्वरूपाच्या उत्सवात अन्य धर्मीयांना भाग घेऊन आपली इच्छा व्यक्त करता येते. (पां. वा. काणे : धर्मशास्त्राचा इतिहास ग्रंथ पहावा) पूजेचे स्वरूप तीन प्रकारचे आहे. “सात्विकी’मध्ये शोङषोपचार पूजा जप-जाप्य-सात्विक नैवेद्यादि विधी करून करता येते. “राजसी’ पूजेत थाटामाटात पूजा आणि बली चढविला जातो.
“तामसी’ पूजेत मद्य-मांसाचा नैवेद्य चढविला जातो. त्यामध्ये मंत्रविधी नसतात. आपल्याकडे सात्विकी पूजाच प्रामुख्याने केली जाते. (पहा काणे यांचे धर्मशास्त्राचा इतिहास खंड दोन) दुर्गादेवी इतर देवतांप्रमाणे आषाढ शुद्ध अष्टमीला निद्रिस्त होते चार महिन्यांसाठी. तिला जागी करण्याचा विधी ज्याला “बोधन’ म्हणतात तो केला जातो. तो विधी कोणत्या तिथीला करावयाचा त्याचे शास्त्र देवीच्या मूर्तीच्या हाताच्या संख्येवर अवलंबून असते. (तिथीतत्त्व)
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात आश्विन प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र बसते. त्यामध्ये “घटस्थापना’ हा महत्त्वाचा विधी होय. प्राचीन वैदिक काळापासून “पूर्णकलश’ (भरलेला) हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच त्यात पावित्र्य आणि त्याच्या वास्तव्याने येणारे ऐश्वर्य याचेही ते प्रतीक आहे. (ऋग्वेद: आपूर्णो अस्य कलश) बंगाल एवढी मोठ्या प्रमाणात दुर्गा पूजा महाराष्ट्रात नसली तरी महाराष्ट्र, गुजरात आणि सौराष्ट्रात घटस्थापनेला महत्त्व आहे. याच्या विधी निर्णयसिंधु या संस्कृत ग्रंथात सांगितला आहे.
प्रतिपदेच्या दिवशी प्रात:काळी हा विधी करावयाचा असतो. देवघराजवळ पवित्र अशा स्थानावरून माती आणून तिचा ओटा तयार करावयाचा त्यामध्ये यव-गहू यांचे दाणे पेरतात. सुवर्ण-चांदी अथवा मातीचा घट स्थापन करतात. त्यामध्ये पाणी भरून त्यावर चंदनाचे गंध, दुर्वा, सर्वाषधी आणि आंबा आदि पाच वृक्षाची पाने खोवतात. त्याभोवती वस्त्र गुंडाळून त्यावर तांदळांनी भरलेले पात्र ठेवतात. त्या पात्रावर वरुण देवतेची पूजा करतात. दुर्गेचे ध्यान करून प्रतिमेची स्थापना करून आवाहन करण्यात येते. मराठी माणसे रोज एक फुलांची माळ त्यावर चढवून नवरात्र साजरे करतात. या काळ्या मातीत उगवलेले धान्य दसऱ्या दिवशी मस्तकावर धारण करून सीमोल्लंघनाला जातात.
बंगालमध्ये सर्वतोभद्र मंडल काढून त्यावर नऊ घट बसवतात. ते गुलालाने भरलेले असतात. त्याच्यावर रंगीबेरंगी निशाणे लावतात.
दुर्गापूजेचा खरा उत्सव षष्ठीला सुरू करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये बेलाच्या झाडाजवळ घटस्थापना करतात. त्या वृक्षाचीच दुर्गा म्हणून पूजा करतात; सौभाग्य वाणे, आरसा-निरांजनादि देवीला देतात नंतर दुर्गेचे आवाहन करतात. केळ, डाळींब, कोथिंबीर, हळद, बेल, अशोक इत्यादि नऊ वृक्षांच्या छोट्या फांद्या अथवा पाने अपराजिता वेलीने एकत्र बांधून जुडगा करतात. त्या जुडग्याची व दुर्गेची एकत्र पूजा करावी. देवीला बेलाच्या झाडाखाली वास्तव्य करण्याची प्रार्थना करावी असे तिथीतत्त्वात सांगितले आहे.
षष्ठी प्रमाणे, सप्तमी-अष्टमी-नवमी या दिवसांचे वेगवेगळे विधी सांगितले आहे. अष्टमीच्या दिवशी आठ कुमारीकांचा शक्य नसल्यास प्रतिदिवशी एक कुमारीकेचा याप्रमाणे सत्कार करीत जावे. कुमारीका कशा असाव्यात; सत्काराचे स्वरूप काय असावे. याची सविस्तर माहिती दुर्गार्चन पद्धती या संस्कृत ग्रंथात दिला आहे.
नवरात्रात नऊ दिवस व्रतकर्त्याने वेदपारायण ऐकावे. (अलीकडे पुण्यामध्ये वैदिक संशोधन मंडळातर्फे, गीताधर्म मंडळात वेदांचे विषयी व्याख्याने आयोजली जातात) दररोज चंडीपाठ (देवीमाहात्म्य) चढत्या क्रमाने (प्रतिपदेला एकवेळा, द्वितीयेला दोनवेळा या पद्धतीने) करावा. या पाठाचे शतचंडी-सहस्रचंडी असेही प्रकार आहेत त्यानुसार हवनही करता येते. काही ठिकाणी देवीला बली द्यायची प्रथा आहे. आता हा बली प्रत्यक्ष पशू-पक्ष्यांचा नसून पिष्टमय करून देतात. क्वचित् कोहळा हे फळ बळीसाठी वापरतात. (बळीसंबंधी अधिक चर्चा विधीकालिका पुराणात अधिक केली आहे.)
दुर्गापूजेतील महत्त्वाचा विषय देवीची प्रतिमा कशी असावी. देवीच्या प्रतिमेत देवीसह सिंह-महिषासूर एवढेच असावे. सध्याच्या काळात देवीच्या शेजारी लक्ष्मी-गणेश-सरस्वती-कार्तिकस्वामी यांच्या प्रतिमा असतात. देवीची प्रतिमा मुख्यत्वे सुवर्ण-रूपे-चांदी या धातूंची अथवा पाषाण-मृत्तिका यांची केली तरी चालते. पूजेला प्रतिमाच लागते असे नाही. देवीची पूजा एखाद्या लिंगावर, स्थंडीलावर, लाकडी अथवा दगडांच्या पादुकावर, चित्रावर, अथवा देवीच्या आयुधावर (त्रिशूल वगैरे) अथवा उदक पात्रावर करावी. पूजा प्रात:काळीच शुचिर्भूत होऊन करावी निर्णय सिंधु ग्रंथात रात्री करावी सांगितले आहे. काही धर्मग्रंथातून पूजा त्रिकाळ म्हणजे प्रात:काळ, माध्यान्ह, आणि सायंकाळी करावी असे सांगितले आहे. विशिष्ट इच्छित फलासाठी म्हणजेच विशिष्ट नवसासाठी विशिष्ट नक्षत्रावर – तिथीवर – वेळेवरच पूजा बांधावी, असे काही ग्रंथकार सांगतात.
दुर्गापूजेच्या काळात (नवरात्रात) ज्यांच्याकडे घोडे असतील त्यांनी द्वितीया ते नवमी घोड्यांची पूजा बांधावी. (हेमाद्रि/व्रतकोश) त्याच्या विधीही त्या ग्रंथात दिला आहे. दुर्गापूजेचा उत्सव निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील उल्लेखावरून आणि जुन्या नाण्यावरील मिळालेल्या मुद्रावरून हा उत्सव इसवी सनाच्या पहिल्या – दुसऱ्या शतकापासून पाळण्यात येतो अशी माहिती मिळते. आसाम-बंगालमध्ये सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव अभूतपूर्व असा लोकप्रिय महोत्सव मानला गेला आहे.
– डॉ. वा. ल. मंजूळ