देशाला स्वातंत्र्य मिळत होते त्याच वेळी महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सामाजिक समतेसाठीचा लढा साने गुरुजी लढत होते. सर्वांना समान अधिकार मिळाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नव्हता. म्हणूनच पंढरपूरमधील मंदिर प्रवेशाला सामाजिक लढ्यांच्या इतिहासात वेगळे महत्त्व आहे. या लढ्याला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली. मात्र, त्या लढाईचे स्मरणच वर्तमानात होऊ नये याला काय म्हणावे? तसेच या मंदिर प्रवेशाच्या लढाईत गुरुजी जिंकले; पण वर्तमानात त्यांनी पेरलेला विचार पराभूत तर होत नाहीत ना?
यारे यारे यान थोर, अवघ्या जातीचे नारी नर
असं म्हणत ज्या चंद्रभागेच्या वाळवंटावर संतांनी समतेचा उद्घोष करत माणूसपणाची पाऊलवाट निर्माण केली. पंढरपूर हे संत विचारांचे आद्यपीठ आहे. संतांनी समतेचा विचार प्रतिपादन केला असला तरी तो स्वीकारण्यास समाजाला बराच मोठा काळ जावा लागला. अनेक विचारवंत, समाजधुरिणांना त्यासाठी संघर्षाची मोठी वाट चालावी लागली आहे. महाराष्ट्रात दीनदलितांना जगण्याचे अधिकार मिळावेत, यासाठी लढे लढले गेले होते. स्वातंत्र्य मिळत असताना समतेचा विचार सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाचा होता. मात्र संतांनी प्रतिपादन केलेले समतेचे विचार समाजमनात रुजण्यासाठी शेकडो वर्षे प्रतीक्षा करावी लागली. जेथे समतेच्या विचारांची भूमिका मांडली गेली त्या पंढरपूरचे लोकदैवत असलेल्या विठोबाच्या मंदिरातच दलितांना प्रवेश मिळत नव्हता. एकीकडे स्वातंत्र्य मिळत होते आणि त्याचवेळी सामाजिक समतेसाठीचा हा लढा साने गुरुजी लढत होते.
सर्वांना समान अधिकार मिळाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नव्हता. म्हणूनच पंढरपूरमधील मंदिर प्रवेशाला सामाजिक लढ्यांच्या इतिहासात वेगळे महत्त्व आहे. या लढ्याला 10 मे रोजी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. साने गुरुजी हे मातृहृदयी होते, ती माऊली होती. पण प्रत्येक माऊलीच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करावे, असे होता कामा नये.
भारताला स्वातंत्र्य मिळत होते. मात्र त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामाजिक जीवनातही प्रतिबिंबित व्हायला हवा होता. अस्पृश्यता हा येथील सामाजिक जीवनात कलंक होता. धर्म व जातीच्या आधारे कोणत्याही प्रकारचे भेद होता कामा नये, दलितांना जगण्याचे सवर्णांइतकेच अधिकार आहेत आणि माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दलितांना मिळायला हवेत ही धारणा मनी ठेवून साने गुरुजी यांनी महाराष्ट्रातील मंदिर प्रवेशाचे आंदोलन उभे केले होते.
या आंदोलनापूर्वी राज्यात संत चोखा यांची समाधी विठोबाच्या पायाशी बांधणे असेल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन, 1929 चे एस. एम. जोशी, काकासाहेब गाडगीळ व इतर सहकारी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन आणि 1930 चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन असेल या सर्व आंदोलनांनी सामाजिक लढाईचे रूप धारण केले होते. मुळात विठ्ठल ही या राज्यातील सामान्यातील सामान्य असलेल्या माणसाची लोकदेवता आहे. बहुजनांची लोकदेवता असल्याने मंदिर प्रवेशाच्या या लढ्याला महत्त्व होते. साने गुरुजींच्या आयुष्यातील एकूण लढ्यांमधील ही एक महत्त्वाची लढाई होती. समतेच्या लढाईत देखील या लढाईचे मोल अधिक होते.
विठोबाचे मंदिर दलितांना खुले व्हावे त्याकरिता करत असलेल्या उपोषणासाठी साने गुरूजींनी 1 मे 1947 हा दिनांक निश्चित केला होता. समाजमन तयार करण्याच्या दृष्टीने गुरुजींनी राज्यभर जागृती सभा घेण्याचे जाहीर केले होते. 7 जानेवारीला मुंबईतील दादर येथून सभेला आरंभ करण्यात झाला. येथील सभेला सुमारे 32 विविध सामाजिक संस्थानी पाठिंबा देत सहभाग नोंदविला होता. या सभेला सुमारे 20 हजार लोक उपस्थित होते. त्यानंतर गुरुजी पायाला भिंगरी लावून फिरले. 110 दिवसांत त्यांनी राज्यातील 11 जिल्ह्यांत विविध ठिकाणी सुमारे 400 सभा घेतल्या होत्या. या सभांना सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता.
गुरुजींसमोर जितके लोक असतील तितक्या लोकांसमोर अत्यंत तन्मयतेने आणि तितक्याच प्रखर शब्दांच्या माध्यमातून लोकांच्या समोर विचार मांडत होते. लोक विचार ऐकून प्रभावित होत होते. अनेक जणांनी या लढ्याला पाठिंबा दिला होता. अखेर उपोषणाचा दिवस उजाडला. गुरुजी व सेनापती बापट यांनी भीमेत स्नान करत सभेला जाण्याची तयारी केली होती. सभेला हजारो लोक उपस्थित होते. त्या सभेत साने गुरुजींना विरोध करणारी मंडळी देखील जमली होती. विरोधक घोषणा देत होते “जावो साने सीमापार, नहीं खुलेगा मंदिरद्वार.’ स्वातंत्र्य मिळत असताना देखील लोकमन मंदिरात दलितांना प्रवेश देण्यास तयार नव्हते, त्याचा हा पुरावा होता.
वाळवंटावर सभा सुरू झाली होती. गुरुजी उपोषणामागील भूमिका मांडत होते. गुरुजींच्या अंतःकरणातील जातीभेदाविरोधातील संताप अत्यंत संयमाने व्यक्त होत होता. गुरुजींची भूमिका जनसमूहावर राज्य करत होती; मात्र मध्येच गोंधळही होत होता. काही विरोधक गुरुजींना प्रश्न विचारू पाहात होते. साने गुरुजी शांत झाले. वाणीला अर्धविराम दिला. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी त्या सनातन्यांना घेरण्यास सुरुवात केली. गोंधळ झाला. अखेर व्यासपीठावरील सेनापती बापट यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले. लोक शांत होण्याचे नाव घेत नव्हते. अखेर बापट व्यासपीठावरून उतरून लोकांमध्ये आले. जे प्रश्न विचारू पाहात होते त्यांना सोबत घेऊन व्यासपीठावर नेऊन त्यांची भूमिका, मुद्दे मांडण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पुन्हा गुरुजी उभे राहिले. विरोधकांनी मांडलेले मुद्दे त्यांनी तत्त्वज्ञानाच्या आणि मानवी हक्काच्या दृष्टीने मांडणी करत खोडून काढले. त्यांनी केलेली मांडणी लोकांना भावली. लोकांनी गुरुजींच्या मुद्द्यांना टाळ्या वाजवत पाठिंबा दर्शविला.
पंढरपूर येथे उपोषणाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न झाले होते. मात्र, तनपुरे महाराजांचा मठ उपलब्ध झाला होता. पुरोगामित्वाचा आणि समतेचा विचार रुजविणारी मठाची विचारधारा होती. संत गाडगेबाबांची वाट ते चालत होते. जागा मिळाल्याने मठातच 1 मे 1947 रोजी उपोषण सुरू झाले. आता राज्यभरातून पाठिंबा मिळत होता. सेनापती बापट, संत तुकडोजी महाराज, आचार्य अत्रे, हरीभाऊ फाटक, रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, सहजानंद भारती, सुमतीबाई गोरे हे सक्रियतेने सोबत होते. उपोषण सुरू झाले. मार्ग निघत नव्हता. गुरुजी हे महात्मा गांधींचे निस्सीम भक्त होते. त्यांची निष्ठा त्यांच्या विचारावर होती. त्यामुळे गुरुजींनी उपोषण मागे घ्यावे व दलितांना मंदिर प्रवेश मिळू नये म्हणून विरोधक गांधीजींना चुकीची माहिती देत होते. गांधीजींची दिशाभूल करण्यात त्यांना आरंभी काहीसे यश आले होते. त्या माहितीच्या आधारे गांधीजींनी तत्काळ तार करत उपोषण मागे घेण्याचे आदेश दिले. मात्र, साने गुरुजी यांनी अत्यंत विनम्रतेने नकार देत गांधींना पत्र पाठवत उपोषण मागे घेणार नसल्याचे कळविले. खरेतर हे पत्र अत्यंत विनम्रतेचे आणि तितकेच परखड होते.
त्यांनी म्हटले की, “जोपर्यंत दुसऱ्याचे युक्तिवाद व निर्णय मला, माझ्या मनोदेवतेला पटत नाहीत तोपर्यंत माझ्याशी मी सत्यनिष्ठ राहिलेच पाहिजे. दुसऱ्याने मला चुकीचे म्हटले तरी चालेल. थोरामोठ्यांनी मला चूक म्हटल्यास मला दुःख होईल. पण माझ्या मनाने मला चूक म्हणणे हे सर्वात वाईट. थोरामोठ्यांचे ऐकून मी माझ्या मनाचे ऐकून बसणार असेल, त्याची नेहमी मनाला रूखरूख लागणार असेल तर त्यात काय अर्थ?’ अशा आशयाचा एक उतारा गांधीजींना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे. साने गुरुजी या प्रश्नावर किती भक्कम निर्धार करून बसले होते हे सहजतेने लक्षात येईल. आपण जे करतो आहोत ते गांधीजींच्या विचाराला पुढे घेऊन जाणे आहे याची त्यांना पूर्णतः जाणीव होती. त्यामुळे आतल्या आवाजावर विश्वास ठेवून त्यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्टपणे नकार कळविला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. विरोधकांनी गांधीजींनी केलेल्या तारेचे भांडवल करत उपोषणाची हवा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.
उपोषण दिवस वाढत असल्याने अनेकांना चिंता वाटत होती. क्रांतिसिंह नाना पाटील हेदेखील चिंता व्यक्त करत होते. साने गुरुजींच्या जीवाला काही झाले तर? असं म्हणत त्यांनी विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पत्री सरकारच्या फौजा पंढरपूरमधून फिरविल्या. अनेकांनी आवाहने केली. मात्र, उपोषण लांबत होते. वर्तमानपत्रांची रकाने भरून येत होती. राज्यकर्त्यांना देखील चिंता लागली होती. त्या दरम्यान, वाढता लोकदबाव लक्षात घेऊन विठ्ठल मंदिर पंचकमेटीने देखील प्रवेशासाठीची तयारी दर्शवली. त्यांनी जिल्हा न्यायालयाने तसे लेखी निवेदन देऊन होकार कळविला. त्यासाठी लागणारी सारी कागदपत्रे दिली. अखेर त्यादिवशी सायंकाळी दलितांना प्रवेश देण्याचा निर्णय झाला. प्रवेश मिळाला आणि गुरुजींनी उपोषण सोडण्याचा निर्णय झाला. उपोषण सुटले. हा प्रवेश महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनातील महत्त्वाची घटना होती.
आज त्यांचे स्मरण करत जातीभेदाचे व विषमतेचे वाजणारे भोंगे थांबविण्याची गरज आहे. तेव्हा गुरुजी जिंकले; पण वर्तमानात त्यांनी पेरलेला विचार पराभूत तर होत नाही ना? याची शंका येते. वर्तमान समाजातील जातीय आणि धार्मिक संघर्ष थांबविण्यासाठी पुन्हा “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा विचार दृढ करणाऱ्या चळवळींची गरज आहे.
– संदीप वाकचौरे