परवा सहजच माहेरी गेले होते. हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याशा उबऱ्यांचं टिचकंसं गाव ते! संध्याकाळची वेळ होती. सूर्य उताराला लागला होता. गावाकडची संध्याकाळ खरंच वेगळी असते. अगदी लाघवी बालकासारखी. तेव्हाही शाळेत गेलेली कच्ची-बच्ची दंगाधूडगूस करत घरी परत येत होती.
दिवसभराच्या अंगमेहनतीने घामेजलेल्या, उन्हाने रापलेल्या बाया-बाप्ये शेतकीची अवजारं, लाकूडफाटा घेऊन घरची वाट धरत होते. घरचं काम ओढणाऱ्या बायका कोंबड्यांना डालग्याखाली कोंडीत होत्या. कुणी दुधाच्या किटल्या घेऊन दुग्धालयाकडे निघत होतं.
एकूणच कामाच्या रगाड्यात हरवून गेलेली दुपार टळली होती. आता काही काळ तरी माणसं निवांतपण अनुभवणार होती. संध्याकाळची ती शोभा पाहत मी काहीवेळ दारातच रेंगाळले. तसा हसत-खेळत-चेष्टामस्करी करत घरी निघालेल्या बायकांचा जथ्थाच माझ्याजवळून जाताना माझ्या नजरेला पडला. त्या बायका दमलेल्या असल्या तरी हास्याच्या आवर्तनांनी त्यांचे चेहरे खुलले होते.
चालता चालता मधेच आमच्या घरासमोरच्या कट्ट्यावरच त्या सख्यांची ऐसपैस बैठक पडली. ओझी-बुट्ट्या डोक्यावरून खाली जमिनीवर आल्या. कुणा एकीच्या डोक्यावरच्या बुट्टीतून पाण्याचा भलामोठा तांब्या बाहेर पडला. सगळ्याजणी घटाघटा पाणी प्यायल्या. दमलेले-धपापलेले श्वास हळूहळू विसावू लागले. त्यांनी मोजक्या शब्दांत पण तरीही भरभरून माझी विचारपूस केली. मीही छान रमले गप्पांमध्ये! बोलणं संपल्यावर पाचेक मिनिटांत मी माझ्या घरी शिरले पण तरीही खिडकीतून त्यांच्या गप्पा ऐकण्याचा स्त्री मोह काही मला आवरला नाही. त्यांना कुण्या इतरांच्या असण्यानसण्यानं, ऐकण्यापाहण्यानं फरक पडणार नव्हता! त्या त्यांच्याच कैफात होत्या.
त्यांच्या विशेष गप्पांना उधाण आलं होतं. हसता-हसता त्यांच्या गप्पा हळूहळू एकमेकींच्या आयुष्यात डोकावू लागल्या. त्यातल्या कुण्या एकीचा नवरा रोज दारू पिऊन तिला मारहाण करत होता. ती बाई तिची व्यथा सांगता सांगता गहिवरत होती. बाकीच्या साऱ्या तिचं बोलणं मनापासून ऐकत होत्या. तिला सुचवत होत्या… तू धीर सोडू नको. तुझ्या लेकरांवर चांगले संस्कार करायला तू घट्ट पाहिजेस! आणि अडीनडीला आम्ही आहेच की! नुसती हाक मार… पोहोचलोच बघ तुझ्या दारी. या उद्गारांनी ती रडणारी बाई थोडीशी शांत झाली.
दुसऱ्या एकीच्या नवऱ्याला कुठल्याशा असाध्य रोगाची लक्षणं होती. ती बाई मनात असूनही पैशांअभावी नवऱ्यावर उपचार करू शकत नव्हती. तिला अपराधी वाटत होतं. तिनं आपलं दुःख त्या सगळ्यांसमोर मोकळं केलं. बाकीच्या तिची समजूत घालू लागल्या. जरा वेळानं तीही बाई डोळे पुसत हसू लागली. तोवर त्यातली एक म्हातारी मुसमुसू लागली. तिचा मुलगा कुठेतरी दूर शहरात स्थायिक झाला होता. म्हाताऱ्या आई-बापाची विचारपूस करायला एखादा फोन करण्याचंही भान नव्हतं त्याला. ती म्हातारी भडाभडा बोलून मोकळी झाली. मग पदरानं स्वतःचे अश्रू स्वतःच निपटले आणि घाईघाईने ती बाकीच्या बायकांना उठवू लागली. चला गं पोरींनो! अंधार पडायला लागला बघा.
पोटापाण्याचं बघायला पाहिजे.एकमेकींच्या सुख-दुखाच्या गोष्टी बोलून-सवरून दहा-पंधरा मिनिटांत त्या बायका हसतखेळत तिथून निघाल्याही. त्या निघू लागल्या तशी मी उठून त्यांना निरोप द्यायला गेले. बोलता-बोलता म्हटलंही त्यांना, “छान गप्पा झाल्या तुमच्या. मोकळ्या हवेवर बसून!’ तशी त्यातली एक बाई सहजच बोलून गेली. “ताई, नुसती हवा मोकळी असून भागत नाही. मन पण मोकळंच राहायला पाहिजे. दुःख, खदखद, सल फार काळ मनात ठेवू नये. मेंदूच्या तब्येतीला वाईटच ते. तोंडावाटे बाहेर पडलं की माणसाची घुसमट होत नाही. म्हणून सणवार असूदे, कामाचा राबता असूदे, दिवसाची ही पंधरा मिनिटं आम्ही राखूनच ठेवली आहेत. आम्ही बोलून मोकळ्या होतो. चला… आता निघतो आम्ही. उद्या भेटशीलच की या वेळेला’. त्या गेल्या खऱ्या, पण जाता जाता लाखमोलाचं जीवनज्ञान देऊन गेल्या.
गरीब-श्रीमंत, यशस्वी-अयशस्वी, अतिव्यस्त-रिकामे, लहान मुलांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सर्वांना ताण येऊ शकतो-येतो. “टेन्शन, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन’ हे शब्द आता मराठीत मिसळून गेले आहेत. आपल्या परवलीचे झाले आहेत. त्याचं कारणच हे आहे. मृत माणसाला जाळणारी ती चिता आणि जिवंत माणसाला जाळते ती चिंता असं काही उगाच म्हणत नाहीत! प्रेशर कुकर त्याच्या आतल्या वाफेचा दाब वाढला की शिट्टीद्वारे वाफ बाहेर टाकून रिकामा होतो. रोपटी लावण्याच्या कुंड्यांमध्ये अतिरिक्त पाणी साचून रोपांची वाढ खुंटू नये म्हणून तळाशी चार-सहा छिद्रे असतातच! अचेतन गोष्टींकडे ही सुविधा असेल तर क्षणाक्षणाला श्वासोच्छ्वास करणाऱ्या सचेतन मनुष्य प्राण्याकडेही हा पर्याय उपलब्ध असायलाच हवा, नाही का! आउटलेट्स असायलाच हवेत.
आपल्या काळजाच्या तळाशी टोचणारे काटे ज्यांना निःसंकोचपणे दाखवता येतील अशी चार-दोन माणसं आपल्या आयुष्यात असायलाच हवीत. त्या आपल्या आउटलेट्स असतात. क्रोध, मोह, मत्सर, ताणतणाव, भीती, दुःख, चिंता या सगळ्यांना आपल्या मन-मेंदूतून बाहेर काढणाऱ्या आउटलेट्स! आपली रोजनिशी, आपले छंद हे पर्यायही आउटलेट्स म्हणून अतिशय चपखल आहेत. योग-ध्यानधारणेनेही माणूस अंतर्बाह्य मोकळा होतो असं म्हणतात. एकूण काय, बोलून मोकळं व्हायला हवं. ऐकणारा माणूस तुमच्यासाठी-तुमच्या समस्यांसाठी दवा करेलच! त्याच्याकडून उपाययोजना करणं शक्य नसेल तर तो किमान दुवा तरी करेलच पण मुळात कोणासमोर तरी मोकळं होणं ताणतणावाच्या व्यवस्थापनाचं खरं सूत्र आहे. गावगाड्यात ताणतणाव, टेन्शन्स हे शब्द प्रचलित नाहीत. आउटलेट्स वगैरे संकल्पनांना तिथे वावच नाही; पण तरीही तिथे जिवंत आउटलेट्स आहेत. एकमेकांसमोर येऊन सुसंवाद साधणाऱ्या. चांगला श्रोता बनून समोरच्या माणसाला मोकळं होण्यासाठी आपला खांदा देऊ करणाऱ्या.
आपल्या समस्यांवरची उत्तरं-पर्याय स्वतःला शोधता येत नसतील तर आपल्या माणसांची मदत घेण्याची वृत्ती वाढवायला हवी. महागड्या गिफ्ट्सपेक्षा एकमेकांना वेळ देणं, एकमेकांबद्दल विश्वास-आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असण्याची वृत्ती वाढवायला हवी. तरच प्रत्येक लहानथोराकडे त्याचं स्वतःचं-हक्काचं आउटलेट असेल आणि जपानच्या “इकिगाई’ सारखा आपलं हक्काचं असं एखादं आनंदाचं सूत्र जगन्मान्य होईल. तेही आपल्याच हातात आहे. पाडगावकरांच्या कवितेसारखं,
तुम्हीच ठरवा, जगायचं कसं?
हसत-हसत! कुढत-कुढत!
की गाणं गुणगुणत!
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी