गेल्या आठवड्यात कराडला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. सोबत पुण्याचे न्यायाधीश वेदपाठक आणि सुरसे नावाचे निवृत्त प्राध्यापक होते. आम्ही तिघेही साहित्य क्षेत्रातील होतो. साहजिकच साहित्यिक गप्पा रंगल्या होत्या. कराडच्या कार्यक्रमात पोलीस खात्यातून उपायुक्त पदावरूननिवृत्त झाल्यावर त्यांच्या मूळ गावी स्थायिक झालेले जाधव नावाचे साहित्यिक मित्र भेटले. कराडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले हजारमाची हे त्यांचे गाव. कार्यक्रम संपल्यावर आग्रह करून ते आम्हाला त्यांच्या गावी घेऊन गेले.
साधारणपणे तीनशे उंबरा असलेल्या त्या गावात त्यांचा टुमदार बंगला होता. बंगला अत्यंत नीटनेटका होता. बंगल्याच्या दर्शनी आवारात एक दगडी तोफ दिसत होती. सभोवताली भरपूर वृक्ष आणि लतावेली होत्या. तळमजल्यावर त्यांच्या सुनेचा होमिओपॅथी दवाखाना होता. दवाखान्याच्या बाहेर गावकऱ्यांसाठी ठळक अक्षरात एक सूचना लिहिली होती. उपचारासाठी पैसे नसले तरीही उपचार केले जातील. मला या गोष्टीचे अप्रूप वाटत होते. जाधव साहेबांनी खुलासा केला. म्हणाले, गावात अजूनही दारिद्य्र रेषेखालील लोक आहेत. त्यांना पैशाअभावी अडचण येऊ नये म्हणून हा प्रपंच.
पहिल्या मजल्यावर जाधवांचे राहते घर होते. घराचा दरवाजा वेगवेगळ्या विशिष्ट आकृत्यांनी मढविलेला होता. एका बाजूला भले थोरले ग्रंथ दालन होते. विविध विषयांवरील पुस्तके दालनात ठासून भरलेली दिसत होती. दर्शनी भागात अनेक जंगली प्राण्यांच्या तसेच पशु-पक्ष्यांच्या अगदी जिवंत वाटणाऱ्या प्रतिकृती होत्या. भिंतीवर काही विशिष्ट आकाराच्या बंदुका लटकाविलेल्या होत्या. तुमच्या घरामुळे शिवकालीन वाड्याची याद आली, मी जाधवांना म्हणालो. खरं आहे तुमचे, पण त्या काळातले घरपण नाहीसे झाले आहे. घरात माणसांचा वावर कमी झालायं. पोरे, नातवंडे कधीतरी अभावाने इथे येतात, त्यांनी उत्तर दिले. त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही पुण्याला परतण्यासाठी निघालो. गावाच्या वेशीपर्यंत ते आम्हाला सोडायला आले. म्हणाले, आमचा गाव आता पुर्वीसारखा राहिला नाही. दगड विटांच्या घरांच्या जागी आता सिमेंटच्या कैक इमारती उभ्या राहिल्यात. त्या सिमेंटच्या जंगलातून वाट काढीत आम्ही बाहेरच्या डांबरी रस्त्याला लागलो. पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावरच हजारमाची गावापासून माझे मसूर नावाचे जन्मगाव साधारणपणे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.
अर्ध्या तासात आमची गाडी मसूर जवळ आली होती. गावाबाहेर वाघेश्वर या नावाने नव्याने वस्ती झाली आहे. त्या वस्तीजवळ पोहोचल्यावर मला माझ्या लाला नावाच्या बालमित्राची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी त्याची भेट झाली होती. तो शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून निवृत्त झाला होता. स्वत: चांगला कथालेखक होता. मधुमेहाशी झुंजत होता. मध्यंतरी पायाला जखम झाल्यामुळे त्याला कराडच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, असे समजले होते. हमरस्त्यापासून त्याचे घर हाकेच्या अंतरावर होते. मागच्या वेळी मी त्याच्याकडे गेलो होतो तेव्हा गाडी रस्त्याकडेला उभी करून एका छोट्याशा पाऊलवाटेने त्याच्या घरी गेलो होतो. या वेळेला मात्र त्याचे घर काही केल्या सापडत नव्हते. मी त्याला फोन लावला. सुदैवाने फोन लागला. तुम्ही जेथे आहात तेथेच थांबा, नातवाला गाडीजवळ पाठवितो ,असे तो म्हणाला. पाच सात मिनिटांत त्याचा नातू आला आणि आम्हाला घरी घेऊन गेला.
एखाद्या भोपळ्यासारखा झालेला पाय सांभाळीत लाला डोळ्यात प्राण आणून आमची वाट पाहत थांबला होता. माझ्या सोबत आलेले न्यायमूर्तीही त्याला ओळखत होते. भेटल्याबरोबर तो आधी माझ्या आणि नंतर न्यायाधीशांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडायला लागला. वातावरण अतिशय सुन्न झाले होते. सोबत आलेल्या सुरसे सरांच्या बोलण्याने ते निवळले. आम्ही त्याला धीर दिला. चहा घेतला आणि त्याचा निरोप घेऊन पुण्याच्या रस्त्याला लागलो.
हजारमाची गावाप्रमाणेच माझ्या मसूर गावाचीही अवस्था झाल्याचे मला जाणवत होते. जुन्या काळाची दगड मातीची कौलारू घरे कुठेच दिसत नव्हती. मोठ्ठाले वाडे नाहीसे झाले होते. सर्वत्र चाळी निर्माण झाल्या होत्या. सगळीकडे सिमेंटचे साम्राज्य पसरले होते. ज्या मातीच्या रस्त्यांवर लहानपणी आम्ही गोवऱ्या थापण्यासाठी शेण गोळा करायला धावायचो त्या रस्त्यांचे रुपांतर आता सिमेंटमध्ये झाले होते.
गाडीने वेग घेतला होता. झाडे मागे मागे पळत होती. माझ्या मनातले विचारही सुसाट वेगाने धावत होते. अंतर्मनाशी संवाद साधताना एकमेकाशी बोलत होते, काळानुसार होणाऱ्या बदलाचे आव्हान स्वीकारणे क्रमप्राप्त आहे हे खरे आहे, परंतु प्रत्येक गाव गावपण हरवत चालला आहे, त्याचे काय?
– बबन पोतदार