आज पाऊस नाहीये… असायचं कारणही नाहीये. पण उगाचच एक अदृश्य लकेर कानावर आली मावळत्या संध्याकाळी, “मेघा छाये आधी रात.. बैरन बन गयी निंदीया। बता दे मैं का करूँ… मेघा छाये…’ मन आर्त आर्त झालं एकदम. ही संध्याकाळ अशीच हुरहूर लावून जाते कायम… ही आर्तता, ही हुरहूर आणि तिचे मनावर आलेलं मळभ हवंहवंस आणि नको नकोसंही. आरशासमोर उभी राहून केस विंचरताना अचानक अलवारशी झुळूक बटांवरून फिरते, मनाचे सारे बंध टवकारले जातात. क्षणभर डोळे मिटताना लावलेल्या काजळाची रेघही ओली होते. दाटून आलेला हुंदका आवरताना त्या मेघाला साद घातली जाते. मेघा रे… मेघा रे… मत परदेस जा रे… आणि परदेशी गेलेला कोणीतरी आठवतो.
आरसा ताटकळत राहतो प्रतिबिंबात. जणू कोणी म्हणावं जैसी हो वैसीही आ जाओ… सिंगार को रैने दो… आणि त्या प्रतिबिंबाने धावत जावं संध्याकाळच्या क्षणांना पणतीत पकडण्यासाठी. तिन्हीसांजा झाल्यात, सांजशृंगारही झालाय पण येत नाहीये तो, तो… मन त्याच्या वाटेवर डोळे लावून बसलेलं. झाल्या तिन्हीसांजा, करून शिणगार साजा… ते वाट पाहणं त्या प्रत्येक वळणापाशी थबकतं जिथून गेलेले असतात सुस्त पावलांचे शांत रस्ते, चौक आणि त्याच्या सोबतीच्या लगबगीच्या वाटा, इस मोड से जाते हैं… अशावेळी आरशातील प्रतिबिंबाला सांगावसं वाटतं,
तुझ्या कविता माझ्या स्वप्नात येतात, फिकट सोनेरी रंगाच्या पाकळ्या होऊन… तेव्हा मी अलगद त्यांना ओंजळीत भरून घेते तर त्या लाजून गुलबटतात. तेच गुलबटलेपण मीही गालावर फिरवते पफ फिरवावा तसे आणि त्याचा सुगंध श्वासात भरून घेते. म्हणतात, मातीचेही अत्तर असते. तसेच मनाचेही अत्तर असते तर? तर मी घेतला असता त्यांचा गंध श्वासभरून, शब्दांचा, स्पर्शांचा कोवळा गंध…
जो तुझ्या असण्याचे भान देतो, मग मी मनाची उमललेली एकेक पाकळी वाऱ्यावर सोडून देते वाऱ्याच्या कुशीत लहरण्यासाठी तर तिला फुटतात इवलाले पंख अन् उमलून येते प्रत्येक पाकळी. आतून स्वयंप्रकाशी होत होत.. अन् मग साऱ्या पाकळ्या फिरू लागतात, माझ्याभोवती रिंगणात वाऱ्याच्या झुळकी माखून. त्यावेळी मी सांजेतून उजळलेलं,
काजव्याचं झाड झालेली असते. तेरे बिना जिंदगी भी लेकीन… जिंदगी तो नहीं… मला आमच्या कोल्हापूरच्या रंकाळ्यावरचा सूर्यास्त आठवतो. पाण्याच्या उबदार कुशीत पहुडलेलं निवांतपण उचलून नेताना बदल्यात तो सूर्य स्वतःची काही किरणं एक्स्चेंज ऑफर देऊन जातो आणि मग ती तापलेली किरणं पाण्याच्या कुशीत शांत होत राहतात दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत. ही पाण्याची ऊब त्या किरणांना ऊर्जा देते, पुन्हा उगवण्याची. किनाऱ्यावरची माडांची झाडं वारा पांघरून घेतात त्यावेळी आणि पाण्यावरच्या बदकांच्या होड्या किनाऱ्याकडे डुलत डुलत पोचायला लागतात. त्यांची कलकल आभाळाला जागं करते. ये अन् भेट सांजेला. जब दिप जले आना… जब शाम ढले आना… आभाळ मग काहूरलेलं मळभ झाडून टाकतं आणि सायंरंगाचा सडा शिंपून चांदण्यांची रांगोळी रेखायला सुरू करतं… संध्याकाळ येते.
ही ढळलेली सांज… पक्ष्यांची परत फिरतानाची कलकल आणि कुणाच्यातरी विरहाचे डोळ्यांत दाटलेले किरण, रात्रीच्या प्रहराकडे झुकतात. तो/ती सोबत असेल तर ही शाम मस्तानी होत जाते. कधी कविता वाचताना पानात लपवलेला चाफा अचानक समोर येतो. थकलेल्या मनाने घरी परतताना, घरी परतण्याची उभारी देतो. ओरखाडा दिलेल्या वास्तवाच्या जखमेलाही चाफ्याची फुंकर हवीहवीशी वाटते. अन् झुळकेच्या स्पर्शाने मिटलेले डोळे वास्तवात येतात. शाम ढले गगन तले हम कितने… एकाकी…
तरीही, येणारी रात्र सोबतीचे स्वप्न घेऊन येते. ए ट्री ऑफ ड्रीम्स. प्रत्येकाने रुजवावा मनात. कारण स्वप्नं सदाहरीत असतात. पतझड, सावन, बसंत-बहार… वैशाखाच्या येण्याची चाहूल लागलेली सृष्टी विरह असतानाच वैशाखानंतर येणाऱ्या मल्हाराच्या स्वप्नांत दंग असते. वैशाख संपणारच आहे आणि मल्हार येणारच आहे. बरसणारच आहे… बरसो रे मेघा मेघा…
मानसी चिटणीस