गुढीपाडवा अथवा वर्ष प्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे त्यास एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील विविध भागात नवं वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे करण्यात येत असले तरी या सर्वांची तिथी मार्च-एप्रिल दरम्यान येते. तसेच संपूर्ण भारतात नव संवत्सर चैत्र महिन्यातच साजरी करण्याची परंपरा आहे. नव वर्ष भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
जसे गुढीपाडवा, वर्ष प्रतिपदा, होला- मोहल्ला, उगाडी, युगादी, विशु, वैशाख, काश्मिरी, नव रेह, चेटी चंड, चीत्रेय तरुविजा इत्यादी परकीय शकावर शालिवाहनांनी विजय मिळविला तो दिवस म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो, तर याच दिवशी शालिवाहन शक नावाने कालगणना सुरू झाली. चैत्र म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभी करण्याची पद्धत रूढ झाली. फार पूर्वी कुठल्याही फार मोठ्या यशप्राप्तीनंतर गुढी उभी केली जाऊ लागली. गुढी हा शब्द स्त्रीलिंगी असून कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतीक म्हणून पुजले जाते.
जगभरात लोक स्थानिक परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने नव वर्ष साजरे करत असले तरी या सर्वांमध्ये एक साम्य म्हणजे महिन्यांची संख्या बाराच आहे. इंग्रजी वर्ष- जानेवारी, आर्थिक वर्ष- एप्रिल, व्यापारी वर्ष- कार्तिक, शैक्षणिक वर्ष-जूनपासून सुरू होते. एका वर्षात बारा महिने असले पाहिजे, अशी संकल्पना जगात पहिल्यांदा भारतीयांनी मांडली असा पुरावा भारताच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यानंतर इतर संस्कृतींनी ते अंगीकारलं असावं. भारतात नव संवत्सरास अनन्य साधारण महत्त्व आहे. याचा उल्लेख इतिहासात व पुराणात उपलब्ध आहे.
भारतीयांच्या दृष्टीने याचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, शास्त्रीय महत्त्व आहे. भारतीयांच्या मते, याच दिवशी भगवान ब्रह्माने, सृष्टीची निर्मिती केली आहे व याच दिवसापासून सत्युगाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी वाली व रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त करून अयोध्येत पुनरागमन केले होते. याच दिवशी, भगवान विष्णूने मत्स्यावतार धारण केला होता. प्रभुरामचंद्र व महाराज युधिष्ठीर यांचा राज्याभिषेक झाला तो हाच दिवस. प्राचीनकाळी भारतावर उत्तर-पश्मिम, व उत्तरेकडून परकीय आक्रमण व अनन्य अत्याचार झाले. त्याच दरम्यान महेंद्रादित्या व मलयवति यांचा पुत्र विक्रमादित्याने भारतीयांचे संघटन व नेतृत्व करून परकीय आक्रमंकांचा युद्धात पराभव केला. त्यामुळे विक्रमादित्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणून विक्रम संवत/नव संवत असे नामकरण झाले.
त्याच बरोबर या दिवसाचे शास्त्रीय कारण म्हणजे, पाडव्याच्या दरम्यान सूर्य वसंत संपतावर येतो. या काळात वातावरणात बदल होतो व समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हादायक वारा सुरू होतो. याच काळात रात्र लहान व दिवस मोठा होत जातो. या पावन दिवशी, भारतीय आपल्या घरावर गुढी किंवा ध्वज लावतात. यास ब्रह्मध्वज किंवा विजय ध्वज असे म्हणतात. त्यामुळे वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा फक्त एक इव्हेंट नसून त्यास शास्त्रीय, आध्यात्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.