आपण विचार करण्याचा वेग जर चांगला राखू शकलो तर आपल्याला भराभर कामे मार्गी लावता येतात, तसेच वेळीच घेतलेले निर्णय भविष्यात फायद्याचे ठरू शकतात. आपण स्वतःला ओळखून आपली विचार करण्याची गती कशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जर चांगली असेल तर ती अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करावा आणि जर कमी असेल तर तो वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
आपल्या अंगी शिस्त हवीच. आपण काम करत असताना एखादी वस्तू जसे शिक्का, कात्री वगैरे हे शोधावे लागता कामा नये. आपण कामाचा महत्त्वाचा वेळ जर किरकोळ वस्तू शोधण्यात घालविला तर मुख्य काम करण्यासाठी कमी वेळ मिळतो आणि काही घाईगडबडीत आपल्याला निर्णय घ्यावा लागतो, परिणामी आपण चुकीचेही निर्णय घेतो. आपण वेळ पाळणे, नियम पाळणे, आळस न करणे, नोंदी-टिपणे वगैरे वेळच्या वेळी अद्ययावत ठेवणे या व अशा आणखीही बऱ्याच शिस्त जर स्वतःला लावल्या तर आपल्या कामाचा दर्जा सुधारतो. आपल्याला जास्तीत जास्त वेळ विचार करायला मिळतो. विचार करायला वेळ मिळाला की अचूकता वाढते. एखादा निर्णय घेण्यास वेळ आहे म्हणून गाफील राहू नये.
आपण आपल्या कामाचे नियोजन आधीच करून ठेवणे आवश्यक असते. नियोजन केल्यामुळे संभाव्य अचडणींचा अंदाज आपल्याला आधीच येऊ शकतो व उपायही आधीच शोधून ठेवता येतो. आपण आपल्या कामाचे नियोजन जितके चांगले करू, जेवढे आधी करू तेवढा जास्त वेळ आपल्याला विचार करायला मिळतो. जसे दर वर्षी दुकानदार गणपतीत उकडीचे मोदक तयार करून विकतात. गणपतीचे दिवस संपल्यानंतर एक आठवडा विश्रांती घेऊन पुन्हा पुढच्या वर्षीची तयारी सुरू करावयाची.
आता येथे पुढच्या वर्षी लागणारे नारळ आताच घेऊन ठेवणे ही पूर्वतयारी होऊच शकत नाही. जर नवीन ग्राहक मिळाले तर ते का मिळाले, जर आधीचे ग्राहक कमी झाले तर ते कमी झाले याचा विचार डोक्यात लगेच सुरू झालाच पाहिजे. या व अशा इतरही अनेक बाबींचा विचार डोक्यात सुरू झाला पाहिजे. अशा प्रकारे वैचारिकदृष्ट्या तयारी सुरू केली म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत समस्येचे निराकरण करावयाला पुरेसा वेळ मिळतो. म्हणजेच आपली विचार करण्याची गती जरी कमी असली तर आपण पुरेसा वेळ देऊन ऐन कामाच्या वेळी पुढच्या गणपतीत पूर्ण तयारीनिशी सुरुवात केलेली असते.
निर्णय घेण्यासाठी आपली शारीरिक व बौद्धिक क्षमताही वाढविली पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. शरीराला काही व्याधी विकार होतील अशा सवयी, व्यसने टाळले पाहिजेत. व्यसने मेंदूवर परिणाम करीत असल्याने ती टाळलेलीच बरी. झोप व्यवस्थित झाली पाहिजे. ज्यामुळे मेंदूलाही पुरेशी विश्रांती मिळेल, ताजा तवाना होईल.
रोज व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने शरीरात जे बदल घडतात त्यामुळे मन व शरीर दोन्ही उत्साही राहतो. रोज प्राणायाम केले पाहिजे. आपण आपल्या फुफ्फुसात जेवढी हवा घेतो, त्या हवेतील जेवढा ऑक्सिजन शरीरात शोषला जातो त्यातील 20 टक्के ऑक्सिजन हा एकटा मेंदू वापरत असतो. प्राणायाम करून आपण मेंदूला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो त्यामुळे मेंदू हा अधिक चांगल्या प्रकारे सक्रिय राहतो. ज्यामुळे आपण अचूक निर्णय घेण्यासाठी मेंदूचीही तयारी करून ठेवत असतो.
एखाद्या समस्येवर आपण विचार करत असताना असे होते की, खूप विचार करूनसुद्धा त्या समस्येचे उत्तरच आपल्याला सापडत नाही. अशा वेळी तो विचार तेथे थांबवून दुसरे एखादे थोडे हलके फुलके काम सुरू करावे. बारीक आवाजात कर्णमधूर संगीत ऐकावे, थंड पाणी प्यावे. अशा वेळी आपल्यावरील मानसिक ताण कमी झाला की, तर्कसुसंगत विचार करून योग्य ते उत्तर आपण विचार करत असलेल्या प्रश्नावर आपला मेंदू उत्तर देतो.
व्यायाम करत असताना, आंघोळ करत असताना, वाहन चालवत असताना आपण एकटे असू तर आपला मेंदू जास्त सक्रिय होऊन काम करत असतो. त्याच वेळी आपल्या डोक्यात नवीन कल्पना येत असतात, नवीन विचार येत असतात, समस्यांवरची उत्तरे मिळत असतात म्हणून दिवसातील यावेळाही जास्त महत्त्वाच्या असतात फक्त आपण त्या वेळेचा जास्तीत जास्त चांगला वापर करून घेतला पाहिजे.
मेंदूचेही काही व्यायाम आपण करू शकतो. आपण बुद्धीबळ खेळू शकतो. कोडी सोडवू शकतो.
गणिताचा अभ्यास करू शकतो. आपण उजव्या हाताचे असू तर डाव्या हाताचा वापर जास्त करावयाचा. जसे कुलूप उडघणे वगैरे कामे डाव्या हाताने करावयाची. दिवसातील सुमारे अर्धा तास घरामध्ये डोळे बंद करून बसावे आणि नंतर आपले व्यवहार पूर्ण करावयाचे. आणखी एक व्यायाम करावा तो म्हणजे डोळे बंद करून दोन पायांत थोडे अंतर ठेवून उभे राहावे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत वर न्यावेत. हाताच्या मुठी आवळाव्यात. नंतर दोन्ही हातांची तर्जनी सरळ बाहेर काढावी व 90 अंशात वाकवावी.
आता दोन्ही हात कोपऱ्यात न वाकवता जवळ आणून अशा प्रकारे बाहेर काढलेली ही दोन बोटे एकमेकांना चिटकवावीत. सुरुवातीला बोटे खाली वर जातील पण चिटकणार नाहीत. नंतर सरावाने व्यवस्थतीत जमेल. असा डोळे बंद करून व्यायाम का करावयाचा तर सामान्यतः आपण जे आपल्याला दिसते त्यावर आपण विचार करतो. जी थेट माहिती आपल्याला मिळते त्यावर आपण विचार करतो, पण जे दिसत नाही, जी थेट माहिती आपल्याला मिळत नाही, त्यावर आपण विचार करीत नाही.
जे दिसत नाही ते विचार चक्षूंनी पाहता आले पाहिजे.जे आहे त्या पलीकडे जाऊन विचार करता आला पाहिजे. आपल्याकडील माहितीचा वापर करण्याची, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्याची मेंदूला सवय लावण्यासाठी डोळे बंद करून मेंदूचा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.
आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात आपला वावर सतत असलाच पाहिजे. दिवसभरात विचार करायला थोडा वेळ राखून ठेवलाच पाहिजे. आपल्या मनोदेवतेला आपल्या विचारांचे जेवढे जास्त पुष्प अर्पण करू तेवढा चांगला प्रसाद आपल्याला मनोदेवतेकडून मिळणार आहे.
अनिकेत भालेराव