प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश, चढ-उतार, सुख-दुःख हे येतच असते. अशा या ऊन-सावलीच्या खेळात माणूस सावलीने सुखावतो. परंतु उन्हाने मात्र पुरता गर्भगळीत होतो. आत्मविश्वास हरवून बसतो. अशावेळी त्या व्यक्तीला गरज असते ती सुयोग्य मार्गदर्शनाची. किंबहुना एका डोळस अनुभवी दिशादर्शकाची. योग्य मार्गदर्शकामुळे जीवनाचा खडतर प्रवासही अगदी सहजसोपा बनतो. निराशेला आशेचा अंकुर फुटतो. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे या भावनेतूनच अनेक कठीण क्षण आपण लीलया पार करतो.
आयुष्यात मार्गदर्शकाचे मोल खूप मोठे आहे. मग ते आपण इतरांकडून घेतलेले असो किंवा आपण इतरांना दिलेले असो. परंतु हल्ली बदलत्या जमान्यात माणसाची मानसिकतादेखील बदलत चालल्याचे दिसते. स्वार्थ, संकुचित वृत्ती आणि लालसा याने बरबटलेल्या व्यक्तींना केवळ स्वतःचाच विचार कळतो. इतरांच्या आयुष्यात मार्गदर्शक बनून सल्ला देण्यापेक्षा दर्शक बनून त्याची असहायता पाहण्यातच कमालीचा असुरी आनंद मिळतो. म्हणूनच समाजाला आज चांगल्या मार्गदर्शकांची गरज आहे. एक उत्तम मार्गदर्शक हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा आहे.
आपण एखाद्या संकटाचा, आव्हानाचा सामना करीत असतो तेव्हा आपली मजा पाहणारे भरपूर असतात. दयेचा आव आणून सांत्वन करणारे रंगबदलूही भेटतात. जे केवळ वरवर दिखावा करीत असतात. हेच ते “दर्शक’ जे एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्या जीवनातील कटू प्रसंगाचा आस्वाद घेत असतात. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही व्यक्तिमत्त्वे अशीही असतात जी आपल्याला दिशा दाखवितात.
आपल्या चुका समजावून सांगून त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा सल्ला देतात. आपल्याला प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात हेच ते मार्गदर्शक. जे इतरांच्या आयुष्यात आनंद खुलविण्याचा मनापासून प्रयत्न करतात. अशावेळी आपल्याला सद्सद्विवेक बुद्धीने व्यक्तींची पारख करता आली पाहिजे. आपल्यावर हसणाऱ्या अनेक दर्शकांतून चांगल्या भावनेचे मार्गदर्शक जाणता आले पाहिजेत.
साधारणतः तीन-चार महिन्यांपूर्वीचा प्रसंग असावा. आमच्या जवळच्या एक काकू अतिशय अस्वस्थ असल्याचे समजले. त्यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता समजले की, त्यांना काहीतरी आजार आहे. मी काकूंना भेटायला गेलो. अंथरुणाला खिळून पडलेल्या, अशक्त झालेल्या काकू माझ्याकडे पाहून हसल्या. नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि काकू माझ्याशी बोलू लागल्या. थोड्या वेळाने मी काकूंना त्यांच्या प्रकृतीबाबत विचारले. त्या सांगू लागल्या की, गेल्या महिन्यात वारंवार सर्दी होते आणि नाक दुखते म्हणून मी डॉकटरांकडे गेले आणि त्यांनी माझ्या नाकाला आतून सूज आल्याचे सांगितले. तसेच नाकाची सूज उतरण्यासाठी काही औषधे दिली.
मी विचारले, मग औषधांनी काही फरक पडला का? त्या म्हणाल्या, पहिले दोन चार दिवस चांगला फरक पडला होता. मात्र, नंतर अचानक त्रास वाढला आणि आता दोनतीन दिवसांपासून तर डोकेदुखीसुद्धा वाढली आहे.
औषधांनी पहिले दोन तीन दिवस फरक पडतो आणि मग अचानक त्रास कसा काय वाढू शकतो? मला प्रश्न पडल्याने मी त्यांना सर्वकाही विस्ताराने विचारले. त्यांच्या बोलण्यातून जे ऐकायला मिळाले त्यातून मलाही धक्का बसला. त्यांना निदान झाल्यानंतर औषधांनी चांगला फरक पडला होता. परंतु दोन चार दिवसांनी आजूबाजूचे, नातेवाईक तब्येतीची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागले आणि त्यांच्या प्रकृतीबाबत नाना शंका निर्माण करू लागले.
नाकाचे हाड वाढले असेल, आता ऑपरेशन करावे लागेल, सायनस तर नाही ना?, अस्थमाही असू शकतो, वेळीच पाहा नाहीतर जिवाशी येईल असे अनेक फुकटचे सल्ले त्यांना मिळाले. त्याच गोष्टी मनावर घेतल्याने चिंतेने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. मी तत्काळ माझ्या विशेषतज्ज्ञ डॉक्टर मित्राशी त्यांचा संपर्क करून दिला. त्यांनी सर्वकाही नॉर्मल असून हा त्रास किरकोळ असल्याचे सांगितले. त्या दिवसापासून आजपर्यंत काकू अगदी ठणठणीत आणि आनंदी आहेत. काकूंना केवळ चांगला मार्गदर्शक न मिळता बिनकामाचे “दर्शक’ मिळाल्याने त्या अधिकच खचल्या होत्या.
आपल्या आयुष्यातही असे अनेक दर्शक येतात. जे आपल्या अपयशाच्या, संकटाच्या, वादविवादाच्या आणि नैराश्येच्या काळात आपल्याला अधिक घाबरवतात. फुकटच्या सल्ल्याने आपला आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वेळीच अशी माणसे ओळखून सावध राहायला हवे. ऐकावे जणांचे करावे मनाचे, या उक्तीप्रमाणे सोडून द्यायला पाहिजे आणि आपल्याला दिशा देणाऱ्या दिशादर्शकाला, मार्गदर्शकाला मात्र अचूक ओळखून त्याचा सल्ला अमलात आणला पाहिजे.
आपणही दर्शक आणि मार्गदर्शक यातला फरक ओळखायला शिकले पाहिजे आणि हो, आपणही इतरांच्या जीवनात दर्शक म्हणून न जाता मार्गदर्शक म्हणून जाऊन आनंद वाटला पाहिजे. मग बघा जीवन नक्कीच सुकर आणि सुलभ होईल.
सागर ननावरे