– आरती मोने
गणपती विसर्जन करून घरी आलो, पण रिकामा पाट रित्या मखरात ठेवताना गळ्याशी आवंढाच आला. चार दिवसांची सारी धामधूम संपली असे वाटले. बाप्पाच्या येण्याने सारं चैतन्य खेळत असतं. आनंदाचं उधाण असतं, सळसळता उत्साह असतो. त्याच्या येण्याआधीपासून स्वच्छतेची घाई उडते, सजावटीची धामधूम असते, पदार्थांची तयारी असते, फुलांची आरास असते, पेढे आणि पांढऱ्या शुभ्र मोदकांचा नैवेद्य असतो,
चांदीच्या भांड्याना झिलई चढते, ठेवणीतल्या साड्या, दागिने बाहेर येतात, कुडते, पायजम्यांना हवा लागते, टोपी शोधून ठेवली जाते, टाळ्यांचा गजर असतो, झांजेची साथ असते, आरतीचा ठेका असतो, अथर्वशीर्षाचा घनगंभीर आवाज आसमंत भारून टाकतो,
नातेवाईक, मित्रमंडळींनी घरे गजबजून जातात आणि मखरात ठेवा, पाटावर ठेवा, नाहीतर देव्हाऱ्यात ठेवा, चांदी सोन्याचे दागिने घाला-नका घालू, कलाकुसर करा किंवा नुसती रांगोळी रेखा, तो प्रसन्न चित्त, सुखकर्ता, विघ्नहर्ता ऐटीत बसून सारे नुसते पाहात असतो.
तो येतो… मग त्याच्या मागून गौरीही येते त्याला भेटायला. तिची ही तीच रित… माहेरी म्हणून येते आणि सारे घरदार उजळून टाकते. कुठे खड्याच्या रूपात, कुठे तांब्यावर, कुठे तेरड्याच्या स्वरूपात तर कुठे उभी राहते येऊन एकटी किंवा ज्येष्ठा कनिष्ठा म्हणून.
बाळांसहित. मग साड्या दागिने, फळफळावळ, मिठाई, लाडू करंज्या, पुरणपोळी साऱ्याची लयलूट सुरू होते. आनंदाला, उत्साहाला नव्याने उधाण येते. आग्रहाची तूप सोडलेली मऊसुत पुरणपोळी आई लेकीला, कधी भावजय नणंदेला, कधी मोठी जाऊ धाकट्या जावेला तर कधी लाडक्या सुनेला हसतखेळत आग्रहाने वाढली जाते.
यातूनच तर व्यक्त होत असतं प्रेम, माया आणि आपुलकी. यासाठीच तर असतात हे सण समारंभ. हे सारं अनुभवण्यासाठी. घरादाराला उजळपण येते. मग विसर्जनाचा दिवस येतो. दोघेही निघतात आपल्याला मागे ठेवून. मनात आवंढा गिळत आणि त्या आनंदाच्या सरी मनात आठवत आपण निरोप देतो आणि हळूच कानात सांगतो… पुनरागमनायच.
तो निघाला की चैन पडत नाही म्हणून विसर्जित होईपर्यंत मूर्ती न्याहाळत राहतो आपण आणि हट्टच धरतो… पुढच्या वर्षी लवकर या! त्याच्या विसर्जनाबरोबर साऱ्या कटू आठवणी, रूसवे फुगवे, नात्यातील पीळ, ताणतणाव सारेच अमंगलाचे विसर्जन झाले तर हा सोहळा अधिकाधिक सौख्याचा, आनंदाचा आणि प्रेमाची पखरण करणारा होईल आणि बाप्पाचा वरदहस्त सतत आपल्यावर राहील.