सकाळची हवा सारीकडे सारखीच… उत्साह आणि नवचैतन्य देणारी… जगात कुठेही गेलात तरी त्या नवचैतन्यात कमतरता भासणार नाही. हे असंच चैतन्य साठवण्यासाठी, थकवा-मरगळ झटकून नवा तजेला परिधान करण्यासाठी सकाळची एक रपेट पुरेशी असते. चालत चालत अगदी घराभोवती एक चक्कर टाकली तरी मनाला कसं तरतरीत वाटतं.
जगाच्या प्रत्येक कोपऱ्याला नव्यानं आलेली जाग पाहण्यासाठी मीही जाते सकाळी-सकाळी फेरफटका मारायला! त्याही दिवशी मी तशीच बाहेर पडले. सकाळचे साडेआठ-नऊ वाजले असावेत. रविवार होता. त्यात भुरभुरणारा पाऊस… त्यामुळे सारी घरंदारं-रस्ते विश्रांतीच्या अपेक्षेत होते. कुठेकुठे चहाच्या टपऱ्यांवरून अमृततुल्य चहाचा सुगंध दरवळत होता… चहावाल्यांच्या स्टोव्हची फरफर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला चहाचं आमंत्रण देत होती! भुरभुरणाऱ्या पावसाच्या शिंतोड्यांनी हवेत आलेला हलकासा गारवा. तो गारवा गवताच्या पात्यांवर चढलेला आणि त्यामुळे वातावरणात पसरलेला हिरवा वास मनाला आल्हाद देत होता.
इतक्यात एक जोराची सर आली… अगदी क्षणात जोराचा पाऊस चालू झाला आणि मी झटकन पलीकडच्या झाडाखाली आडोसा म्हणून उभी राहिले. झाडाच्या थोडं पुढे पाच-सहा लहान मुलं खेळत होती. रविवारी सकाळी मुलांच्या शिकवण्यांना सुट्ट्या असतात ना म्हणून खेळायची संधी मिळाली असावी त्यांना बहुतेक. त्या जोराच्या पावसाने ती लहान मुलं आनंदून गेली होती. तसंही लहानपणी सर्दी-खोकला-तापाची भीती असल्या क्षुल्लक गोष्टी खिजगणतीत पण नसतात! मुलांच्या खेळात यत्किंचितही खंड पडला नाही. त्यांच्या त्या खेळात हरपलेल्या भानापुढे पाऊस हरला म्हणा ना! कुडकुडणारी ती मुलं तशीच झिम्मड घालू लागली.
तिथे उभी राहून मीही कधी माझ्या बालपणात शिरले ते मलाही समजलं नाही. इतक्यात कुणीतरी एक स्त्री जिन्यावरून धावतच खाली आली. झपाझप त्या मुलांच्या घोळक्यात शिरली. तिने आपल्या मुलाला पटकन त्या घोळक्यातून बाहेर ओढलं आणि त्याचक्षणी ती पुन्हा जिन्यावरून दिसेनाशी झाली. ते पोर म्हणजे तिचा मुलगा असावा हे ती गेल्यानंतर एक-दोन क्षणांनी लक्षात आलं. इतकं हे सारं वेगात घडलं!
पाऊसच इतका जोराचा होता की त्या आईला तिच्या मुलाची काळजी वाटणं अगदी साहजिक होतं! हळूहळू तिथे असलेल्या प्रत्येक मुलाची आई तिथे येऊन आपापल्या मुलाला घेऊन गेली. कुणी गच्चीतून हाका मारू लागल्या. मुलांचा जमाव पांगला पण माझ्या डोक्यातली विचारांची गर्दी काही केल्या संपेना! विचारांची गर्दी तशीच ठेवून कोसळणाऱ्या पावसाच्या भीतीने मी त्या झाडाखालचा माझा मोहरा हलवला आणि शेजारच्या चहाच्या टपरीत जाऊन आडोसा धरला.
मुसळधार पावसात स्टोव्हची उष्णता मनस्वी आनंद देत होती. मी एक कप चहा मागवला आणि त्या कोसळणाऱ्या पावसाकडे पाहात राहिले. चहाचा प्रत्येक घोट मला माझ्या लहानपणात, लहानपणीच्या पावसात घेऊन जात होता.
लहानपणी आमच्या त्या छोट्याशा खेड्यात आम्हाला कुठल्या घराची आणि भिंतींची सीमा नव्हती. आजूबाजूचं प्रत्येक घर आम्हाला आमचंच वाटायचं आणि त्या घराला आम्ही! एका घरी दुपारी जेवायला गेलो की दुसरीकडे रात्री. असं करत आमचं लहानपण बहरत गेलं. खरंतर खूप कष्टाने दोनवेळचं पुरेसं अन्न मिळवणारा शेजार होता आम्हाला. पण त्याही परिस्थितीत आमच्या माणसांनी आम्हाला विन्मुख पाठवलं नाही. असेल ती भाकरी-भाजी, कधी शेतातली कोवळी काकडी, कधी ओल्या तुरीच्या शेंगा आणि तेही नसेल तर ठेवणीतल्या डब्यातली चमचाभर साखर, शेजारपाजाऱ्यांच्या घरच्या किमान या गोष्टींवर तरी आमचा हक्क होता. प्रत्येक घराचं अंगण आमचं होतं मग ते अंगण अगदी इवलंसं का असेना.
माझी आजी सांगायची त्याप्रमाणे एकदा सकाळी आंघोळ आणि तीट-पावडर झाली की गावातला कोणीही घरी सांगून आम्हा लहान मुलांना उचलून कडेवर घेऊन जाई. कधी तासभर-कधी दोनेक तास तर कधीकधी आम्ही संध्याकाळीच परत येत असू. अर्थात, त्या काळात चार-पाचदा या घरातून त्या घरात निरोपानिरोपी व्हायची. पण माणसांचा एकमेकांवर विश्वास होता ही गोष्ट महत्त्वाची!
माणूस केवळ आपल्या कुटुंबापुरता बांधलेला नव्हताच. घरची लग्नकार्य, घरचे सणवार, उन्हाळ्यातलं वाळवण, हिवाळ्यातल्या शेकोट्या, पावसाळ्यातली पेरणी अगदी सगळंसगळं शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत- त्यांच्या साक्षीने होत असे.
गोडाधोडाच्या, नवलाईच्या पदार्थांच्या वाट्या अलगद या घरातून त्या घरात शिरत… अलिखित नियम असल्यासारख्या! पौर्णिमेच्या रात्री चांदणी भोजनाचे बेतरंगत! पत्त्यांचे डाव संपता संपत नसत! कोजागिरीचं दूध शेजाऱ्यांच्या साक्षीनं आणखीच गोड होऊन जाई! एकमेकांच्या घरचं संक्रांतीचं वाण, चैत्रातलं हळदीकुंकू हे सामूहिक कार्यक्रम असत आणि लहान मुलं-म्हातारी माणसंच काय अगदी गुरं-ढोरं-कोंबड्या-बकऱ्या ही जणू सामूहिक जबाबदारी. या साऱ्यांवर साऱ्यांची नजर असे.
जगासाठी खरंतर घारीची नजर प्रचंड तीक्ष्ण, पण त्या तिथल्या माणसांची नजर मात्र त्या घारीपेक्षाही तिखट. मायेचा गोडवा वाढला की नजरेत घार जन्म घेतेच म्हणा. त्या घारींवरून आठवलं. भर दुपारी जेवणखाण आटोपून आजूबाजूचं जग जरा सैलावू लागलं की दबा धरून एखादी घार आभाळात वावटळ घालायला लागे. तिलाही भूक चुकत नाहीतर! ती भक्ष्य शोधायला बाहेर पडे आणि आभाळाच्या तुकड्यात भराऱ्या मारी. एखादं कोंबडीचं पिल्लू दिसतं का ते शोधक नजरेनं शोधत राहणं हे त्या घारीचं काम. पण तशा त्या सुस्त दुपारीही एखाद्या आई-काकूला तिची कुणकुण लागेच.
आपल्या कोंबड्यांच्या चिमुकल्या पिलांवर त्या घारीने झडप घालू नये म्हणून ती बाई लगबगीने बाहेर येई, पण त्यावेळी तिच्या मनात केवळ आपल्या कोंबड्यांच्या पिलांविषयी प्रेम नसे तर आजूबाजूच्या साऱ्याच घरांमधली कोंबड्यांची गोंडस पिल्लं तिच्या नजरेसमोर कुक्कूचकू करू लागत. मग ती बाई सुस्तावलेल्या शेजाऱ्यांना सावध करायला असेल नसेल तेवढी शक्ती वापरून आपल्या गावबोलीत जोरजोरात आरोळी ठोके. “घार आली घार… पिल्ली झाका… पिल्ली झाका…’
आपल्या कोंबड्या आणि त्यांच्या पिलांना खुराड्यात घालता-घालता ती बाई या आरोळीची चार-पाच आवर्तनं करी आणि मग त्या आरोळीने मुलांबाळात रमलेल्या-स्वयंपाकघरात गुंतलेल्या इतर आयाबाया लगबगीने बाहेर येऊन आपापल्या कोंबड्यांना सुरक्षितपणे खुराड्यात घालत. आणखी एखादी मग त्या पहिलीमागून आरोळी देई. सारा परिसर सावध केला जायचा पण घारीचं वावटळ संपेपर्यंत ही मोहीम संपत नसे!
इतरांची गाई-गुरं आपली समजून त्यांना सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांनी दुसऱ्या घरच्या माणसांना किती जपलं असेल याचा केवळ विचारही पुरेसा आहे! लग्नकार्यातल्या आहेराच्या किमतीवरून माणसाची किंमत ठरत नव्हतीच तेव्हा. म्हणूनच माणुसकी भरभरून होती. आजही माणुसकी संपली नाहीये. झोपली आहे फक्त. तिला जागवायला हवं, प्रत्येकानं आपल्या मनात. मग इतरांवरच्या प्रेमापोटी नजरेत अतितीक्ष्ण घार जन्माला येईलच. दृष्ट प्रवृत्तीरूपी घारींवर नजर ठेवायला. माणूस आपल्या मुलांसोबत इतरांच्या मुलांवर, इतर माणसांवर, गाईगुरांवर प्रेम करेल. अगदी भरभरून आणि मनापासून!
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी