कोणत्याही भाषिक प्रदेशाची आणि तेथील जनसामान्यांची ओळख म्हणजे साहित्य व संस्कृती होय. महाराष्ट्रपुरता विचार करायचा झाला, तर महाराष्ट्राला जसा थोर ऐतिहासिक वारसा आहे तसाच भाषिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. कला आणि संस्कृतीचा विचार म्हणजे केवळ उथळ मनोरंजनाचा विचार नव्हे. कला आणि संस्कृती आपल्याला सहिष्णुता शिकविते. आपले जीवन प्रगल्भ करते. म्हणूनच साहित्य आणि संस्कृती केवळ अभिजनांचा व्यवहार ठरू नये. तिच्यात विकेंद्रीकरणाची क्षमता आणि उर्मी असणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांची “व्यक्ती’ भावना आणि जनतेची “समूह’ भावना यांच्या “भीमा भामा’ संगमातून महाराष्ट्र राज्याची साहित्य-संस्कृती समृद्ध व्हावी अशी आशा बाळगूया.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हीरक महोत्सवी वर्ष पार केलेल्या महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृती क्षेत्राच्या स्थिती-गतीचे चिंतन करणे आवश्यक वाटते. “चाऊंड राजे करावीयले’ अशी मराठीची पहिली ताम्रपटातील ओळख. चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र, संत ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, मुकुंदराजाचे साहित्य अशा प्रारंभातून मराठी घडत गेली. “अमृताते पैजा जिंकी’ अशीही मराठी आज अभिजात दर्जासाठी केंद्राकडे डोळे लावून बसली आहे. राज्यातील बारा कोटी जनतेच्या आशा अभिजात मराठीसाठी लागलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याने सन 2010 मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित केले. या धोरणात भाषाविषयक, कलाविषयक, क्रीडाविषयक अनेक महत्त्वाच्या योजना अधोरेखित करण्यात आल्या. त्यातील काही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झालेल्या असल्या, तरी अनेक योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार बदलले की सरकारचे अग्रक्रम बदलतात आणि आधीच्या सरकारने घेतलेले निर्णयही बदलले जातात. प्रत्येक सरकारला आणि राज्यकर्त्यांना काही तरी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याची हौस असते. त्यात आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयापेक्षा आपला निर्णय कसा नावीन्यपूर्ण आहे, अशी अहमहमिकाच असते. यामुळे आधीच्या सरकारचे निर्णय अर्धवट राहतात. मुख्य म्हणजे या निर्णयापोटी केलेला खर्चही पाण्यात जातो आणि राज्याच्या तिजोरीवर भार पडतो. महाराष्ट्र राज्याचा हीरकमहोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग आलेला असताना करोनामुळे सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर राज्य शासनाच्या अनेक योजनांना मर्यादा पडल्या.
मुख्य म्हणजे “आजादी का अमृतमहोत्सव’साठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शे-सव्वाशे मान्यवरांची जम्बो सल्लागार समिती स्थापन केली. त्यात चित्रपट क्षेत्र, नाट्यक्षेत्र, लोककला क्षेत्र, साहित्य क्षेत्र, ललित कला क्षेत्र, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, कृषीक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील महाराष्ट्रातील मान्यवरांचा सहभाग त्या समितीत होता किंवा आहे, पण आश्चर्य म्हणजे या समितीची एकही बैठक अद्याप आयोजित झालेली नाही. सांस्कृतिक कार्य विभागाने परस्पर निर्णय घेऊन वर्षभरासाठी आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत आपले कार्यक्रम ठरविले आहेत.
करोना काळात शासनाने करोना जाणीव जागृती अभियान सुरू करून त्यामार्फत प्रत्येक लोककलावंतांना किमान 5 हजार रुपये आर्थिक मदत होईल, असा निर्णय घेतला. त्याशिवाय तमाशा, संगीतबारी, शाहिरी, दशावतार, खडीगंमत या कलाप्रकारांना करोना पॅकेज जाहीर केले. गाव जत्रा सुरू झाल्या आणि तमाशा दशावताराचे खेळ रंगू लागले. ज्यांचे पोट केवळ लोककलांवर आहे, असा समाज महाराष्ट्रात लाखाच्यावर आहे. त्यांना काहीसा दिलासा देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केले. असे असले तरी हे प्रयत्न 100 टक्के पूर्णत्वास गेले असे म्हणता येत नाही.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनातर्फे लातूरला राज्यस्तरीय लावणी महोत्सव झाला, कोकणात दशावतार महोत्सव झाला, शाहिरी महोत्सव झाला, मात्र दसरा असल्याने या काळात ढोलकी फळाचा तमाशा महोत्सव झाला नाही. शासनाची प्रशिक्षण शिबिरेही झाली, तसेच आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत शाहिरी कार्यक्रम देखील सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केला. हे सर्व उपक्रम केवळ मुंबई पुण्यात न होता महाराष्ट्राच्या सहा महसुली जिल्ह्यांमध्ये आयोजित झाले आणि सांस्कृतिक विकेंद्रीकरणाला साधना मिळाली. आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत एकूण 36 कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ठरविण्यात आले आहेत. हे कार्यक्रम प्रातिनिधिक असतील आणि कंत्राटी स्वरूपाचे नसतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविताना अकृषी विद्यापीठांमध्ये असलेले प्रयोगात्म कलांचे विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता आणि या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही दाखविण्यात आली होती; पण प्रत्यक्षात राज्यातील अकृषी विद्यापीठे अशा भरीव अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासी कला आणि बोलींचे दस्तावेजीकरण कल्चरल मॅपिंग सहा महसूल विभागात सांस्कृतिक कार्य विभागाची उपकेंद्रे सक्षम करणे लोककलांच्या सर्वेक्षणाला पुढे अधिक गती देणे या व अशा अनेक योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत.
गिरगाव चौपाटीवरील एका जागेत नाटकाचे भव्य कलादालन उभारले जाणार आहे, ही अतिशय आश्वासक अशी गोष्ट आहे. गिरगाव चौपाटी जवळील बालभवनच्या जागेत भव्य भाषा भवन उभारले जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा अलीकडेच पार पडला. नवी मुंबई येथे देखील मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र होणार आहे. चौपाटी जवळील भव्य भाषा भवनामध्ये साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विकास परिषद अशा संस्था एकत्र काम करणार आहेत एका छत्राखाली नांदणार आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संगीत महाविद्यालय उभे राहणार आहे, हीदेखील सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.
विविध कलांचे निर्वहन एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुरू-शिष्य परंपरेमधून होते. हाच धागा पकडून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू केरळ यांसारख्या दाक्षिणात्य राज्यांमध्ये गुरू शिष्य परंपरा शासनातर्फे अतिशय प्रभावीपणे राबविली जाते. कर्नाटकात यक्षगान, दोड्डाटा, बायलाटा अशा लोकपरंपरांची गुरू शिष्य परंपरेमार्फत अतिशय उत्तम साखळी शालेय पातळीवर गुरूकुल पद्धतीने निर्माण केली गेली आहे. लोककलांची वस्तू संग्रहालये, लोककलांचे विद्यापीठ, लोककलांचे कोश, अशा अनेक योजना या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबविल्या गेल्या आहेत.
केरळमध्ये थय्यम कडियाटृम यांची राज्य सरकारच्या पातळीवर आणि खासगी पातळीवर गुरूकुले आहेत. राजस्थानसारख्या राज्याने तेथील लोककलांचा वापर पर्यटन संस्कृती समृद्ध करण्यासाठी अतिशय खुबीने केला आहे. या धर्तीवर आपल्याकडील गडकिल्ल्यांच्या ठिकाणी शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम का बरे आयोजित केले जात नाहीत? राजस्थानात चोखीधाणी नावाचा प्रकार विकसित झाला आहे. त्यातून या राज्याची खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती आणि पर्यटन संस्कृती असा त्रिवेणी संगम साधला जात आहे. आपल्याकडे अशा प्रकारची सांस्कृतिक धोरणांची दूरदृष्टी का नाही? ज्याच्यातून पर्यटन आणि संस्कृती विकसित होता होता कलावंतांनाही अर्थार्जनाचे साधन प्राप्त होईल. गुरूकुल व्यवस्था विकसित झाली, तर त्या क्षेत्रातील वार्धक्याकडे झुकलेल्या कलातपस्वी तरुण पिढीला कलेचा वारसा देऊ शकतील आणि त्यांनाही सन्मानपूर्वक मानधन प्राप्त होईल.
-प्रा. डॉ. प्रकाश खांडगे