अलीकडील काळात दरवर्षी व्हॅलेंटाइन डे मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो. ते पाहून नेहमी हा प्रश्न पडतो की प्रेम व्यक्त करण्यासाठी असा एकच दिवस का असावा? प्रेम सर्वंकष असतं! गुरूदेव टागोर म्हणतात त्याप्रमाणे प्रेम सूर्यप्रकाशासारखे असते. चहूबाजूंनी वेढणारे, संरक्षण देणारे… आणि तरीही जाचक न वाटणारे… असे प्रेम! जे खरोखरीच भाग्यवंतांना लाभते. त्यामुळे प्रेम व्यक्त करायला याच दिवसाची वाट पाहण्याची गरज काय? व्यापक दृष्टीने या दिवसाकडे पाहायला हवं. खासकरून तरुणाईनं. आनंदाने जो निर्णय तुमच्या तिच्याकडून किंवा त्याच्याकडून घेतला जाईल त्याचे स्वागत करा! जीवनसाथी नाही बनू शकलात तरी एकमेकांचे व्हॅलेंटाइन्स बना!
१४ फेब्रुवारी हा समस्त तरुणाईसाठी परवलीचा दिवस! कित्येक जणांच्या जीवन-मरणाचा प्रश्न! मोठी मजा असते. या महत्त्वाच्या “सणाच्या’ अगोदर 15 ते 20 दिवस बाजारपेठा गजबजलेल्या असतात. सर्वत्र चहलपहल असते. वातावरणात एक उन्माद असतो. आकाशसुद्धा स्वच्छ, निळगुलाबी असतं! सर्वत्र “पोषक’ असं वातावरण असतं! खरं तर हा आपला सण किंवा दिवस नाही! पण यामागील कथा फार सुंदर आणि मनाला भिडणारी आहे. संत व्हॅलेंटाइन यांचा जन्मदिवस म्हणून व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जातो. अतिशय दयाळू, लोकांची काळजी घेणारे ते एक संत महात्मा होते. पण आज हा दिवस फक्त “तो’ आणि “ती’ च्या प्रेमाचा प्रकट दिवस म्हणून साजरा केला जातो. वाईट काहीच नाही, पण त्याचा विपर्यास होता कामा नये.
प्रेम व्यक्त करायला याच दिवसाची वाट पाहावी का लागते? तो काय मुहूर्त असतो? प्रेम व्यक्त करण्याचा! पण आजकाल प्रत्येक दिवसाला अतोनात महत्त्व प्राप्त झालेले आहे. असे दिवस उत्साहाचे आणि आनंदाचे वाटतात.
प्रेम हे फक्त तरुणवयातच होते, असे नाही; तर कोणत्याही वयात प्रेम होऊ शकते. प्रेम हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे कोणी विद्वान सांगून गेले आहेत अणि खरंय ते असं आज म्हणावसं वाटतं! फक्त शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नाही, तर मानसिक ओढ असावी, विचारांमध्ये समन्वयात असावी. प्रेमाच्या अनेक अजरामर कथांनी प्रत्येक भाषेतील साहित्य समृद्ध केलेले आहे. कथा, काव्य, कविता, शायऱ्या यासाठी प्रेम हा विषय कायमच जवळचा जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. कुसुमाग्रजांचे “पृथ्वीचे प्रेमगीत’ अजरामर. कवी ग्रेस ती आम्हाला शिकवायचे! मराठीचे सकाळचे तास असतं! सकाळच्या कोवळ्या थंडीच्या दिवसातील ते प्रेमकवितांचे दिवस आजही आठवतात. केवढं भव्य दिव्य प्रेम. आज व्हॅलेंटाइन डेच्या दिवसात ही कविता प्रत्येकानंच आठवून पाहावी. अशा अनेक प्रेमकविता आहेत ज्यांची उजळणी करायला हवी. या प्रेमदिवसाच्या निमित्तानं त्यांचा आस्वाद घ्यायला हवा. म्हणजे आज जे एकतर्फी प्रेमाचे अपघात होतात त्यांना प्रेमाचं महत्त्व कळेल!
“प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं’ असं कविवर्य मंगेश पाडगावकर सांगून गेले. त्याची खोली आर्तता समजून घेतली तर खूपच छान!
अजरामर प्रेमकथा जगात सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यावरील नाटकं, कथा चित्रपटांनी गेला बाजारच नव्हे, तर आजही त्याचे रिमेक लोकप्रिय आहेत. आपल्याकडील बाजीराव-मस्तानी ही जोडी दोन विरुद्ध धर्माची असूनही जात, धर्म, देश ओलाडूंन एकमेकांची झाली. त्यांना प्रेमासाठी संघर्ष करावा लागला नाही तर एकत्र येऊन विवाह करूनही सोबत राहण्यासाठीचा संघर्ष करावा लागला. जवळच्या आप्तस्वकियांचे रोष पत्करावे लागले. बाजीरावांनी मस्तानीला व्हॅलेंटाइन डे ला प्रपोज केले नव्हते. पण मनोमनी त्यांनी एकमेकांना आपले मानले होते. ते एकमेकांसाठी एकमेकांचे व्हॅलेंटाइन होते. एखाद्याचे व्हॅलेंटाइन होणे म्हणजे नेहमीसाठी त्याची काळजी घेणे, त्याला सर्वंकष संरक्षण देणे. कोणत्याही कठीण प्रसंगी पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे अपेक्षित आहे. केवळ तो आणि ती यांचे प्रेम अपेक्षित नाही. किंवा तिने-त्याने मला नाकारले म्हणून मी स्वत:चा जीव घेईन किंवा तिचा घेईन असा आत्मघातकी विचार नसावा. ती माझी नाही झाली तरी मी मात्र तिचाच आहे. कोणत्याही प्रसंगात मी उभा आहे, हा विश्वास या दिवशी द्यावा, असं वाटतं.
खरं तर आज नवीन पिढीत खूप मोकळेपणा आहे. एखादा मित्र, एखादी मैत्रिण असणं ही बाब पूर्वीसारखी आश्चर्याची राहिलेली नाही. आजची शिक्षणपद्धती जीवनपद्धती वेगळी आहे. शिक्षणासाठी दूर राहणे ही गरज ठरू पाहतेय. त्यामुळे पालक आपल्या मुलांसोबत फार राहू शकत नाहीत. अशा वेळेस सोबत एखादा मित्र किंवा मैत्रिण असणं हा आधार असतो. पुष्कळदा मुली आपल्या मैत्रिणीपेक्षा पुरुष मित्राशी अधिक मोकळ्या मनाने बोलू शकतात. त्यात गैर काहीच नाही. पुढे विचार जुळले तर विवाहबंधनातही जवळ येऊ शकतात. काही कारणाने जर नाही घडले असे तर आजन्म मी तुझ्यासोबत असेन, असे वचन देऊन व्हॅलेंटाइन्स डे साजरा करू शकतात. प्रेम आहे पण बंधनरहित, अपेक्षारहित सर्वसमावेशक असावे. नुसता असा विचार जरी मनात आला तर स्वत:ला खूप मोठं समजा!
अमृता प्रितम आणि इमरोज. वयाच्या, समाजाच्या सर्व तथाकथित नियमांच्या पल्याड त्यांचे प्रेमसहजीवन होते. आपले प्रेम व्यक्त करायला त्यांना या दिवसाची गरज भासली नाही. असं म्हणतात, एकदा अमृता इमरोजच्या पाठीवर काहीतरी गिरवत होत्या. इमरोजने विचारल्यावर त्या म्हणाल्या मी साहिलचे नाव गिरवित आहे. आणि त्या इमरोजकडे पाहू लागल्या, त्यावर हसत इमरोज म्हणाले, मी भाग्यवान आहे. त्यांचे नाव का असेना, माझ्या पाठीला तुझा स्पर्श होतोय. विचार करा किती जुना काळ! पण आजही जवळचा वाटतो.
होतेच ते एकमेकांचे व्हॅलेंटाइन! अर्थ समजून घेऊया. नवीन विचारांनी नव्या नजरेने. व्यापक दृष्टीने या दिवसाकडे पाहा! आनंदाने जो निर्णय तुमच्या तिच्याकडून किंवा त्याच्याकडून घेतला जाईल त्याचे स्वागत करा! जीवनसाथी नाही बनू शकलात तरी एकमेकांचे व्हॅलेंटाइन्स बना!
– अरुणा सरनाईक