मुंबई – करोनाचा धोका अद्याप टळला नसला तरीही आता सगळ्यांनाच ही परिस्थिती लवकर सकारात्मक व्हावी व सर्वकाही सुरळीत व्हावे अशी आस निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याने आपण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. हा दौरा ज्या क्षणी निश्चित होईल त्यावेळी माझे समाधान होईल असेही रोहित म्हणाला.
यंदाच्या वर्षी येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तिथेच थांबणार असून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी तसेच एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
ऑस्ट्रेलियात कसोटी किंवा एकदिवसीय सामने खेळायला आनंद वाटतो. मी जेव्हा जेव्हा तेथे दौरा केला त्यात माझ्या प्रत्येक खेळीचे कौतुक झाले. गेल्या वेळी झालेल्या मालिकेत आम्ही त्यांना त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे आता हा दौरा लवकरात लवकर निश्चित व्हावा. करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या असल्या तरीही या मालिकेबाबत काहीतरी सकारात्मक घडावे हीच माझी इच्छा आहे, असेही रोहितने सांगितले.
करोनामुळे ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन असल्याने विश्वकरंडक स्पर्धा जरी संकटात आली असली तरीही भारताविरुद्धची मालिका मात्र निश्चितच होणार असल्याची ग्वाही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिली आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ही मालिका होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ त्यांचेच खेळाडू नव्हे तर भारतीय संघातील खेळाडू देखील या मालिकेच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.
धवनला काढले चिमटे….
रोहित व ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांनी यावेळी सोशल चॅटवर विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. त्यात रोहितने आपला सहकारी व सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला गंमतीने चिमटेही काढले. धवनच्या लहरी स्वभावाचेही रोहितने वर्णन केले. संघाची बैठक सुरु असताना धवनचे त्याकडे लक्षच नसते व बैठक संपल्यावर तो काय ठरले असे विचारतो. त्याला नक्की कोणत्या गोष्टीत रस आहे हेच समजत नाही. फलंदाजीला अल्यावर डावाची सुरवात करताना तो कधीच पहिला चेंडू खेळत नाही. नेहमी त्याच्या सहकारी फलंदाजालाच डावाची सुरुवात करावी लागते. एखाद्या सामन्यात संघाची स्थिती बिकट असते अशावेळीही तो खूप विचित्र प्रश्न विचारतो. त्याचे तुमच्या बोलण्याकडे लक्षच नसते. काहीवेळा त्याच्या बोलण्यावर हसु फुटते तर कधी रागही येतो, असेही रोहितने सांगितले.