नवी दिल्ली: कॉंग्रेसने आणलेली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजना ही कॉंग्रेसच्या गेल्या 60 वर्षांतील राज्य कारभाराच्या अपयशाचे प्रतिक असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी संसदेत केली होती, पण आता करोनाच्या भीषण काळात ग्रामीण भागातील रोजगारासाठी सरकारला याच योजनेचा आधार घ्यावा लागला आहे, असे सूचित करीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या योजनेतील भूमिकेवर मोदींनी यू टर्न घेतला असल्याची टीका केली आहे.
तथापि, या योजनेचे महत्त्व त्यांना आता कळाले असून त्यांनी या योजनेसाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे त्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. मनरेगा योजनेमागची दूरदृष्टी मोदींच्या लक्षात आली आणि त्यांनी या योजनेविषयीची आपली आधीची भूमिका बदलून आता त्यासाठी वाढीव निधीला अनुमती दिली. या योजनेला विरोध करण्याऐवजी त्याचा मोदींनी आता पुरस्कारच केला आहे, त्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवर मोदींनी मनरेगा योजनेवर संसदेत सन 2014 साली केलेल्या भाषणाची व्हिडीओ क्लीपही टाकली आहे.