आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणारा संघ अशी ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या स्पर्धेत मात्र, पहिल्या विजयासाठी झगडावे लागत आहे. सलग सहा सामने गमावल्यावर त्यांचा यंदाच्या प्लेऑफमधील प्रवेशही अधांतरी आहे. याला कारण जे काही खेळाडू असतील पण मुख्य कारण आहे ते म्हणजे रोहित शर्माची सुमार वैयक्तिक कामगिरी व नेतृत्वात नसलेली चमक. ज्या पद्धतीने नेतृत्वाचा ताण येत असल्याने विराट कोहली व महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व सोडले तेच आता रोहितनेही करावे असे वाटते.
जर तो धुर्त नेतृत्व करून संघाला विजय मिळवून देत नसेल तसेच धावांत सातत्यपूर्ण कामगिरी करत नसेल तर त्याने योग्य वेळी संघाचे कर्णधारपद अन्य खेळाडूकडे सोपवावे. आज मुंबईचा संघ पाहिला तर संघात असे अनेक खेळाडू आहेत की जे जास्त चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात. रोहितने संघाला विजेतेपदाच्या मार्गावर नेले हे मान्य पण आता ती जादू कुठेतरी हरवल्याचे स्पष्ट दिसत आहे.
रोहितच्या फलंदाजीतच नव्हे तर मैदानावरील वावरातही त्याची नकारात्मक देहबोली दिसून येते. आयपीएल ही काही प्रयोगशाळा नव्हे की जिथे तुम्हाला वारंवार संघ मालक संधी देतील. अखेर क्रिकेट हा एक व्यापार बनला आहे व संपूर्णतः व्यावसायिक वृत्तीने स्पर्धेतील सर्व संघांचे मालक या स्पर्धेकडे पाहात असतात. मात्र, त्यातही रोहितने यापूर्वी केलेल्या कामगिरीची पुण्याई आहे म्हणूनच त्याला अद्याप संघ मालकांनी कर्णधारपदी कायम राखले आहे. मात्र, त्याचा कधी डेव्हीड वॉर्नर किंवा कोहली करतील हे सांगता येत नाही.
भारतीय संघाचे कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 संघांचे नेतृत्व आता रोहितकडे आले आहे. त्यामुळे त्या व्यासपीठावर त्याला अद्याप स्वतःला सिद्ध करायचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करुन आपली गुणवत्ता व दर्जा दोन्ही सिद्ध करायचे आहे. मग हा आयपीएलचा अतिरिक्त भार कशासाठी. 2017 सालापासून रोहितची बॅट आयपीएल स्पर्धेत तशी शांतच आहे. यंदाही हेच चित्र आहे; पण प्रश्न हा आहे की यंदाच्या स्पर्धेतील मुंबईचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे.
मग रोहितने तरी या अपयशाचे धनी का व्हावे. हीच वेळ आहे की नेतृत्व सोडून केवळ एक खेळाडू म्हणून या स्पर्धेत खेळावे, मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करावा व आपला संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी राखून ठेवावा. दरम्यान धोनीप्रमाणे एक असा खेळाडू तयार करावा की जो पुढील किमान तीन वर्षे मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व करेल.