कोलकाता – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या नावावर विविध विक्रमांची नोंद केली आहे. त्याने माजी कर्णधार विराट कोहली याची कामगिरी मागे टाकून सर्वाधिक 14 टी-20 सामने जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार बनला आहे.
भारताने टी-20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजवर 3-0 असा विजय मिळवला व त्याचवेळी रोहितच्या नावावर ही कामगिरी जमा झाली. कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. घरच्या मैदानावर कोहलीने 13 टी-20 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 10 सामने जिंकले होते.
रोहितला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला आता केवळ दोन सामने जिंकावे लागणार आहेत. मायदेशात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याची कामगिरी इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या नावावर आहे. या दोघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत.
भारताला आता श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका जिंकली तर रोहित विश्वविक्रम आपल्या नावावर करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होणार आहे. तर उर्वरित 2 टी-20 सामने धर्मशाला येथे खेळवले जातील. ही टी-20 मालिका 27 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे या मालिकेतले दोन सामने जरी भारताने जिंकले तरी जागतिक विक्रम रोहितच्या नावावर जमा होईल.