कोलकाता – वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा गोलंदाज दीपक चहर याला दुखापत झाली. त्याला नंतर गोलंदाजी करता आली नाही. मात्र, त्याला जरी दुखापत झाली असली तरी आता वेदना मात्र चेन्नई सुपर किंगजला (सीएसके) होत आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सीएसकेने त्याला तब्बल 14 कोटी रुपये देत आपल्या संघात घेतले आहे. आता तो या स्पर्धेसाठीही उपलब्ध होणार का यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, दीपकच्या दुखापतीमुळे सीएसकेची चिंता वाढली आहे.
दीपक चहरने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दोन गडी बाद करत थाटात प्रारंभ केला होता. मात्र, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकत असताना त्याच्या पायाचा स्नायू दुखावला आणि त्याला मैदान सोडावे लागले. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने त्याची दुखापत किती गंभीर आहे याची पहाणी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
जर त्याची दुखापत बरी होण्यास वेळ लागणार असेल तर त्याला आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने देखील खेळात येणार नाहीत. सध्या तरी चहर येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.