Rohit Pawar : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. मागच्या पाच दिवसापासून जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे मराठा समाजासह त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी विनंती केली आहे.
मनोज जरांगे यांच्याविषयी चिंता व्यक्त करत रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी, “समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय? सरकारला थोडीजरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या…”असे म्हटले आहे.
तसेच “दुर्दैवाने मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती,” असेही रोहित पवार म्हणाले.
दुसरीकडे, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते, कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत सरकारला जरांगेच्या तब्बेतीची काळजी आहे असे म्हणत नोंदी झालेल्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा केली.