पुणे – अंध व्यक्तीशी लग्न लावल्यानंतर नवरी आणी मध्यस्थांनी नवऱ्यामुलाची तब्बल नऊ लाखाची फसवणूक केली. सात महिणे संसार केल्यानंतर नवरीनेही घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद केसाराम चौधरी(30,रा. रेशमा रिव्हेरा सोसायटी, विमाननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार कैलासकुमार सिंघवी, सारिका बंब , नंदलाल बंब, कमलाबार्स बंब आणि राजु कोठारी यांच्यावर फसवणूक व इतर कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विनोद चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. ते रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करतात. अंध असल्याने त्यांचा विवाह जमत नव्हता. दरम्यान त्यांच्या समाजातील मध्यस्थ कैलासकुमार सिंघवी यांच्या मार्फत त्यांना सारिका बंबचे स्थळ आले. मध्यस्थाने विवाहासाठी मुलीच्या कुटूंबास पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानूसार त्यांना वेळोवेळी 8 लाख 73 हजार रुपये देण्यात आले.
दरम्यान नवरीने संसार करत असताना कपाटातील 33 हजार रुपयांचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. विनोद यांनी तीच्याशी वारंवार फोनवर संपर्क साधला असता, तीने परत येण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर तीने फोन बंद करुन ठेवला. तीचे आधारकार्ड तपासले असता तेही बनावट निघाले. जानेवारी 2021 ते जुलै 2021 दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे करत आहेत