टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा : नियोजनाचा फज्जा
पुणे – दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने पर्यटनासाठी नागरिक व गावी गेलेल्या चाकरमान्यांची पावले शहराच्या दिशेने वळली आहेत. त्यामुळे रविवारी (दि.3) शहरात येणारे सर्व रस्ते “हाऊसफुल’ झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी मुख्य मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
शिक्षणासाठी पुण्यात येणारे विद्यार्थी आणि नोकरवर्ग दिवाळीदरम्यान गावी गेले होते. पुण्यातील स्थानिक रहिवासी पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान, सोमवारपासून (दि.4) शाळा सुरू होणार असल्याने शहरात परतणाऱ्या नागरिकांची संख्या शनिवार आणि रविवारी वाढली. त्यामुळे, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, खेड-शिवापूर टोलनाका, आनेवाडी टोलनाका, मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाका, नगर रस्ता, नाशिक रस्ता, सोलापूर रस्ता आदी मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, सुट्ट्या संपत असताना महामार्गांवर नेहमीच कोंडी होते. त्यावर महामार्ग पोलिसांनी नियोजन केले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
उड्डाणपूल रखडल्याने वाहतूक कोंडी
पुणे ते शिरवळदरम्यान पाच ते सहा उड्डाणपुलांची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यात या मार्गावर अवजड वाहने बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे.
पुणे-सातारादरम्यान कासवगती
मुंबई, पुणे शहरांतून कोकणात जाणारी बहुतांश वाहने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन शहरात येतात. मात्र, कात्रज घाट ते शिरवळदरम्यान मोठे खड्डे पडल्याने वाहने आदळत आहेत. त्यामुळे नारायणपूर फाटा, शिंदेवाडी या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चालक दक्षता घेत असून वाहने अतिशत संथ गतीने जात आहेत. परिणामी, रविवारी वाहनांच्या रांगा लागल्या.