कात्रज – गोकुळनगर, महादेवनगर, कोंढवाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याची कचराकुंडी झाली असून प्राण्यांचा वावर वाढला आहे.
उरुळीदेवाची येथील डेपोत कचरा टाकायला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे शहर तसेच उपनगरातील कचऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. यावर पर्याय म्हणून रामटेकडी येथील कचरा डेपोत शहरातील कचरा टाकला जात आहे. परंतु, उपनगरांतील कचरा उचलण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने अप्पर येथील बस डेपो शेजारील रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत.
या जवळपास 200 ते 300 मीटरपर्यंत या रस्त्याला एका बाजूने कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. करोना संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी स्वच्छता महत्त्वाची असताना अशा उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टॉयफाइड असे संसर्गजन्य आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे परिसरातील कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.