महाड – महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारीक गार्डन ही पाच मजली इमारत काल सायंकाळी सहाच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून एनडीआरएफतर्फे ढिगारे उपसण्याची काम सुरु आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, या इमारतीमध्ये आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या मुस्तफा चाफेकर इमारत कोसळण्याच्या अवघ्या काही सेकंदांआधी बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. मुस्तफा यांनी या दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा थरार सांगितला आहे.
मुस्तफा सांगतात, “मी काल सायंकाळी घरीच होतो. अचानक हादरे जाणवू लागल्याने मी तात्काळ गच्चीमध्ये येऊन नक्की काय होतंय असं इतरांना विचारलं. काही लोकांनी मला इमारत कोसळण्याची शक्यता असल्याचं सांगत तात्काळ खाली या असं सांगितलं.”
“मी आणि माझे कुटुंबीय तात्काळ बाहेर पडलो. बाहेर पडताना मी शेजाऱ्यांची दारं ठोठावून त्यांनाही बाहेर पडण्यास सांगितलं.”
“मी आणि माझे कुटुंबीय इमारतीच्या गेटपाशी पोहचतोच तेवढ्यात मागून कर्कश्य आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर इमारतीच्या तळमजल्यावर असलेले खांब (पिलर्स) अक्षरशः मोडून पडत होते. तो आवाज धडकी भरवणारा होता.” मुस्तफा सांगतात.
बांधकाम व्यावसायिकाचे दुर्लक्ष
यावेळी बोलताना मुस्तफा चाफेकर यांनी, इमारतीचे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकाने वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात, “मी या इमारतीमध्ये २०१४ पासून वास्तव्यास आहे. सुरुवातीपासूनच इमारतीच्या बांधकाम दर्जाबाबत तक्रारी होत्या. मात्र २-३ वर्षानंतर त्याची तीव्रता वाढली.”
“इमारतीमधील रहिवासीयांनी या तक्रारी बांधकाम व्यावसायिकाच्या कानावर घातल्या. मात्र त्यांनी, ‘मी तुम्हाला इमारत बांधून दिली आहे, आता पुढं काय करायचं हे तुम्ही ठरवा.’ असं सांगत हात झटकले.” अशी माहिती दिली.