तज्ज्ञांचा इशारा; दिवाळीत प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान
पुणे – करोनामुक्त झालेल्या पण फुफ्फुसांच्या विकार असणाऱ्यांसाठी फटाक्यांचा धूर अधिक धोकादायक ठरेल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याच कारणातून दिवाळीत शहरात फटाक्यातून होणारे प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान महानगरपालिका प्रशासनासमोर असणार आहे.
राज्य शासनाकडून करोनाच्या पार्श्वभुमीवर दिवाळीबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनामुळेच काही राज्यांत फटका विक्रींवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात अद्याप तरी असा काही आदेश नसल्याने दिवाळीत फटक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे धोका करोना रुग्णांसाठी असणार आहे.
याबाबत शहरातील काही तज्ज्ञांशी संवाद साधला असता, फटाक्यांच्या माध्यमातून आकाशात उडवली जाणारी शोभेची दारू आणि धुरामुळे फुफ्फुसाबरोबरच “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी), अस्थमा, डोळ्यांचे आजार, कानाच्या पडद्याला इजा, फ्लू, न्युमोनिया, “व्हायरल इन्फेक्शन’ अन्य आजारांनाही निमंत्रण मिळू शकते. तसेच, फटाके उडवताना दगडाचे, मातीचे कण डोळ्यांत जाऊन बुबुळाला इजा होण्याची किंवा कायमस्वरूपी डोळा गमावण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
शोभेची दारू जळताना धुरामुळे डोळ्यांचा दाह होणे, डोळे लाल होणे, फटाक्यांच्या तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांसमोर अंधारी येण्याचे प्रकार घडू शकतात. याशिवाय फटक्यांच्या आवाजाने लहान मुलांच्या कानांनाही इजा होऊ शकते. करोनाची स्थिती लक्षात घेता यावर्षी तरी मोठ्या आवाजाचे, धूर होणारे फटाके फोडू नका, अशा सूचना नेत्रतज्ज्ञांनी दिल्या.
फटाक्यांच्या धुराने काय होऊ शकते…
करोनामुळे फुफ्फुसे बाधित झालेल्या आणि उपचारादरम्यान वारंवार ऑक्सिजन लावावा लागलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे, अशा प्रकारचे रुग्ण करोनामुक्त झाल्यानंतरही त्यांच्या फुफ्फुसांत वारंवार संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.
फटाक्यांच्या धुरातून फुफ्फुसाची दाहकता वाढविणारे “सीओपीडी’सारखे आजार, फुफ्फुसांत जाळी पडणे (फायब्रोसिस), जुना दमा अशा प्रकारचे फुफ्फुसांचे विकार बळावू शकतात. करोना आजारात रुग्णाच्या फुफ्फुस कमपुवत झालेले असते यातून फटाक्यांचा किंवा अन्य कोणताही धूर अशा रुग्णांच्या फुफ्फुसांत गेल्यावर सूज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाके न वाजविणे हाच यावर प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. यामुळे यावर्षीची दिवाळी फटाके मुक्त करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे असणार आहे.