शेवगाव – समाजा-समाजात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली भडकाविण्यासाठी काही समाजविघातक शक्ती कार्यान्वित झाल्या असून, शेवगावची दंगल ही पूर्वनियोजित असल्याचा संशय असून, त्यासाठी गेल्या चार-सहा महिन्यांत शहरात घडलेल्या विविध घटनांचा सखोल तपास करून या दंगली मागील मास्टर माइंड शोधून काढून शहरात बोकाळलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होतील.
तसेच समाजकंटकांना मिळणारी आर्थिक रसद बंद होईल या पद्धतीची ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. शहरात रविवारी (दि. 14) रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते दानवे यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शनिवारी येथे भेट दिली. या वेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, माजी आ. चंद्रशेखर घुले, सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, तालुकाप्रमुख अविनाश मगरे, अरुण पाटील लांडे, अशोक गायकवाड, भारत लोहकरे, कॉ.सुभाष पाटील लांडे, संजय कोळगे आदींसह प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार छगन वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, मुख्याधिकारी सचिन राऊत यांची उपस्थिती होती.
शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व अभिवादन करून त्यांनी ज्या परिसरात किंवा दुकानावर, तसेच घरावर दगडफेक झाली, त्या दुकानदारांची, तसेच नागरिकांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर बालाजी मंदिरात झालेल्या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधून येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सर्व विभागाच्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी उपस्थितांनी अवैध धंद्यांच्या सूळसुळाटाबाबत तक्रारी केल्या. शहरातील शिवाजी चौकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याचे, तसेच विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक पुजारी यांनी याबाबत दाखल विविध गुन्ह्यांची माहिती देऊन आत्तापर्यंत 44 संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरित फरारी आरोपींची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती दिली.
स्वसंरक्षणासाठी मजबूत राहा
प्रत्येक वेळी पोलिसांवर अवलंबून न राहता स्वसंरक्षणासाठी मजबूत राहा. प्रसंगानुरूप आपणही तयारीत राहावे. अशा गर्भित सूचना करून शिवाजी चौकातील कत्तलखान्यास कुलूप लावावे. त्यात दिरंगाई होत असेल, तर बैठक संपल्यानंतर मीच कुलूप ठोकतो, अशी तंबी प्रशासनाला दिली. बैठक संपल्यानंतरही त्यांचा तिकडे जाण्याचा इरादा होता; तेव्हा ही कारवाई अगोदरच झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.