नवी दिल्ली – रेल्वेद्वारे पश्चिम भारतातील मालवाहतूकसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राजस्थान आणि हरियाणा राज्यादरम्यान नव्याने तयार करण्यात आलेल्या 306 किलोमीटर लांबीच्या, न्यू मदार ते न्यू रेवाडी रेल्वे कॉरिडोरचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोट कंट्रोलद्वारे केले. यानंतर न्यू आटेली मधून निघणाऱ्या या नव्या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला.
वेस्टर्न देडीकेटेड फ्रेट कॉरिडोर या 306 किलोमीटर लांबीचा हा महत्वाकांक्षी रेल्वे मालवाहतूक प्रकल्प करोना काळात पूर्ण केला आहे, याचा अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. प्रकल्पातील सर्व इंजिनियर, टेक्निशियन आणि श्रमिकांचे त्यांनी आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या. हा मालवाहतूक कॉरिडोर आत्मनिर्भर भारताने टाकलेले पुढचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
हरियाणातील न्यू आटेली ते राजस्थानातील न्यू किशनगड स्थानकांदारम्यान असलेल्या या कॉरिडोर निर्मितीसाठी 5 हजार 800 कोटी रुपये खर्च आला. दीड किलोमीटर लांबीची ही मालगाडी जगातील पहिली विद्युत मालगाडी आहे. दुमजली आणि जास्त क्षमता असलेली ही गाडी तिप्पट वेगाने वेगाने जाऊ शकणार आहे, ही अभिमानाची बाब आहे. सलग 5 ते 6 वर्षांच्या मेहनतीमुळे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच हरियाणा, दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनाही याचा फायदा होणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
या कॉरिडोरमुळे शेतकरी, उद्योगधंदे अशा सर्वानाच लाभ मिळेल. हा कॉरिडोर महणजे देशाच्या वेगवान प्रगतीचा कॉरिडोर ठरेल असे मोदी म्हणाले. यामुळे मोठी गुंतवणूक होईल, रोजगार निर्मिती होईल, विशाल आधुनिक व्यवस्था निर्माण होतील. या सगळ्याचा फायदा छोट्या मोठ्या सर्वच उद्योगांना गती मिळण्यासाठी होईल. वैयक्तिक विकास आणि देशाचा विकास या 2 रुळांवर आपण विविध योजना राबवत समांतर विकास करत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी जपानने केलेल्या तांत्रिक सहकाराबद्दल जपानचे राजदूत सतोषी सुझुकी यांचे मोदी यांनी आभार मानले.