थेऊर (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे रोगाचा प्रसार सुरू असल्याने यांची सर्वाधिक झळ दैनंदिन रोजंदारी करणा-यांना बसत आहे. यामध्ये नागरिकांसाठी चोवीस तास पोलीस, आरोग्य विभाग, आशा वर्कर यासोबतही महसूल विभाग सर्तक असल्याचा प्रत्यय येत आहे. हवेलीतील महसूल अधिका-यांच्या मदतीने तात्काळ महिलेच्या पत्राशेडच्या झोपडीत अन्नधान्य पोहोचले असून पाच वर्षाच्या चिमुरडीचा वाढदिवसही अधिका-यांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने केल्याने मोलमजुरी करणा-या कुटुंबियांनी महसूल विभागाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हवेली महसूलच्यावतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीमुळे कष्ट करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबियांची उपासमार टळली आहे. बहुतांशी वेळा टिकेचा धनी समजला जाणारा महसूल विभाग लॉकडाऊनच्या आपत्तीजन्य परिस्थितीत गोरगरिबांच्या घरात अन्नधान्य पोहोचवत असल्याचे चित्र दिसत आहे.
हडपसर मंडलाधिकारी कार्यक्षेतात्र एका भागातील वस्तीमध्ये मोलमजुरी करणा-यांना वाढत्या लॉकडाऊनमुळे ‘भागात काम नाही अन हातात दाम नाही’ अशा परिस्थितीत उपासमारीची वेळ सुरू झाली. पिंपरी चिंचवड भागातील अजित संचेती यांचेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ही माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर व तहसीलदार सुनील कोळी यांनी हवेलीतील महसूल टिमला दिली. त्याभागात खरोखरच मोलमजुरी करणा-यांना दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असल्याच्या माहितीची खातरजमा झाली. त्यामुळे तात्काळ गरजवंताना अन्नधान्याची मदत करणेकामी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, तलाठी शिवाजी देशमुख, राजेश दिवटे, गणेश सुतार सामाजिक कार्यकर्ते सतिश पांचाळ हे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसह त्याभागात पोचले व त्यांनी गरजूंना मदत केली.
याचठिकाणी रोजंदारीवर आपले पोट भरणारी सारिका भंडारी ही महिला तिच्या तीन लहान मुलींसह राहत आहे. मात्र मोलमजुरी बंद झाल्याने त्यांचेवर उपासमारीचे संकट ओढवले होते. त्यातच योग्यवेळी महसूलच्यावतीने अन्नधान्य पोहोच झाल्याने त्यांना चांगलाच आधार मिळाला व जेवणाची सोय झाल्याने त्यांना अंत्यानंद झाला.
मात्र यावेळी एका लहान चिमुरडीच्या रडण्याने मंडलाधिकारी चिरुमुल्ला यांचे लक्ष वेधले. त्यांना मुलीच्या रडण्याचे कारण समजलेनंतर त्यांनी ताबोडतोब केक व चिमुरडीसाठी नवीन ड्रेस मागवून घेतला. लॉकडाऊनच्या काळात दिवसभरात अन्नधान्य नसल्याने दोन वेळेसचे जेवण मिळेल का या प्रश्नाने सारिका भंडारी हिचे कुटुंब हवालदिल झाले होते. मात्र महसूलच्यावतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू घरपोच आल्याने त्या भारावून गेल्या. त्यातच लहानगीचा वाढदिवस मंडलाधिकारी, तलाठी यांनी त्यांचे उपस्थित केल्याने संबंधित महिलेनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली व महसूल विभागाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.