शाळा, महाविद्यालये दि.15 जुलैपर्यंत बंदच
पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या पाहता सध्या लागू असलेलेच निर्बंध पुढील आठवड्यापर्यंत कायम राहणार आहेत. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये दि.15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
विधानभवन येथे झालेल्या करोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “पुणे शहरात-4.6 टक्के आहे. पिंपरी-चिंचवड-5.1 टक्के आणि ग्रामीण भागात 7.6 टक्के करोना संसर्ग दर आहे.
सवलती दिल्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. पुढील काळात करोनाबाधितांची संख्या वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सध्या देण्यात आलेल्या सवलती कायम राहणार आहे.
चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यासंदर्भात विचारले असता वळसे पाटील म्हणाले की, “मी याबाबत जास्त काही बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करीत आहे. ही न्यायालयीन बाब आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहे. सध्या करोनाचे संकट आहे. त्यामुळे करोनावर लक्ष पाहिजे. कोणी काही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआयला चौकशीसाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल.’