पौडच्या पोलीस निरीक्षकांचे आवाहन ः पोलीस ठाण्यात शांतता बैठक
पिरंगुट-मुळशी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पौड पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तालुक्यातील हिंदू – मुस्लीम बांधव, पोलीस पाटील उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमी तसेच बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर पुढील काही दिवसांत अंतिम न्याय निवाडा होण्याची शक्यता आहे. तसेच रविवारी (दि. 10) ईद-ए-मिलाद हा सण सुद्धा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात कोणत्याही धर्माच्या भावना दुखविल्या जातील तसेच चुकीच्या प्रतिक्रिया व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून कोणीही करू नये. न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करून न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये, अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवळे, तुकाराम टेमघरे, संजय पिंगळे, पोपट दुडे, काशिनाथ शिंदे, शब्बीर आत्तार, दस्तगीर आत्तार, शहनाज शेख, पोलीस नाईक संजय सुपे तसेच नागरिक उपस्थित होते.
- रामजन्म भूमी तसेच बाबरी मशीदचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या न्यायनिवाड्यावर पुढील काही दिवसांत निर्णय येईल. यानंतर सामाजिक सलोखा बिघडून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर, सोशल मिडीयावर चुकीचा मेसेज टाकणारावर तसेच कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक पौड