भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा सल्ला
मुंबई : भाजपने संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणे किंवा शपथविधी पार पाडणे धोक्याचे ठरु शकते. विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपला विश्वासमत ठराव मांडण्यात पराभवाची नामुष्की येवू शकते, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने हक्क सांगितला आहे. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपला 105, तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या 161 जागा आहेत. याचाच अर्थ जनेतेने त्यांनाच कौल दिला आहे. अशात शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले आहे. मात्र अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असा काहीही ठराव झाला नव्हता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी घरी आलेल्या पत्रकारांना अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधली चर्चा थांबली. आता सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशात सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपने अल्पमतातले सरकार स्थापन करु नये, असा सल्ला दिला आहे.