जलसंपदा विभागाचे उन्हाळी नियोजन ः दि.15 जुलैपर्यंत तुटवडा भासणार नाही
पुणे – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये सध्या 12.87 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यापैकी
15 जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 1.67 घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी असला, तरी पावसाळ्यापर्यंत तुटवडा जाणवणार नाही, असे जलसंपदा विभागागतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उन्हाळा सुरू होत असतानाच वेगाने बाष्पीभवन आणि पाण्याची वाढती मागणी, पाणीगळती तसेच चोरी अशा विविध कारणांमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे.
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत मिळून 12.87 टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या धरण साखळीत सध्या 44 टक्के पाणीसाठा आहे. शहर आणि ग्रामीण भागासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले असून शहराकरिता 15 जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आल्याने शहरात पाणी तुटवडा सहसा जाणवणार नाही.
ग्रामीण भागासाठीही नियोजन
पुण्यासोबत दौंड नगरपालिका, ग्रामीण भागासाठी देखील पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. सुमारे 60 हजार हेक्टर्स शेतीला उन्हाळी आवर्तन यासाठी सध्या पाणी वापरले जात असून, कालव्याद्वारे विसर्ग सुरू आहे. सध्या टेमघर-12%, वरसगाव-47.37%, पानशेत-51.58%, खडकवासला-42% याप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे.