विनय खरे
बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांच्या दिल्लीस्थित राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “प्रज्ञासूर्य’ नि भारतीय संविधानाचे निर्माते अशी जगभर ख्याती मिळाली आहे. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, चौफेर व्यासंग, बुद्धीची प्रगल्भता यामुळे विविध विषयांवर शेकडो ग्रंथांची निर्मिती, हजारो वृत्तपत्र लेख, समाजोद्धारासाठी झोकून दिलेले आयुष्य यामुळे त्यांनी भारतीय इतिहासावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचे महापरिनिर्वाण ज्या स्थानी झाले त्या संपूर्ण परिसराला भारत सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी 2012 सालानंतर त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीला प्रारंभ केला.
बाबासाहेबांचे महानिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीस्थित अलीपूर रोडवरील एका बंगल्यात झाले. तिथून त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईतील दादर येथील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. नंतर दादर चौपाटी येथे अंतिम संस्कार केले. या जागेला “चैत्यभूमी’ म्हणून ओळखले जाते. दिल्लीच्या या जागेवर स्मारक उभारण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती.
त्या समितीने 14 जून 2012 रोजी सरकारला दिलेल्या अहवालानुसार आसपासच्या जागेचे अधिग्रहण करून स्मारक काम सुरू झाले.
वास्तविक, बाबासाहेब ज्या अलीपूर रोड येथील बंगल्यात राहात होते तो 7374 चौ.मी. जागेचा बंगला राजस्थान सिरोहीच्या राजाने बाबासाहेबांना भेट दिला होता. कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर 27 डिसेंबर 1951 पासून ते इथेच वास्तव्यास होते. त्यामुळे अनुयायांची ही पवित्र भेटीची जागा आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी भारत सरकारने 99 कोटी 64 लाख रुपये उपलब्ध करून दिले. पुढे हे काम पूर्ण झाले. या राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिल 2018 रोजी होऊन राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
हे स्मारक स्थापत्य कलेचे अनोखे उदाहरण म्हणूनही पाहता येईल. मुख्य इमारतीची रचना एखाद्या उघड्या पुस्तकासारखी आहे. बाह्य आकार पुस्तक उघडून ठेवल्यावर जसे दिसेल तसा दिसतो. देशात अशी कलाकृती रचना आपल्याला कुठेही पाहण्यास मिळत नाही. यात इतरही अनेक बाबी पाहण्यास मिळतात, सोयी सुविधाही दिल्या आहेत. येथे सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चून तयार केलेला डॉ. बाबासाहेबांचा जिवंत वाटणारा “अनिमेट्रोनिक्स पुतळा’ जो एक रोबोट आहे, सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. संविधान सभेच्या बैठकीत बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी केलेल्या भाषणाचा एक भाग या यंत्रमानवाच्या तोंडून ऐकण्यास मिळतो. हे पाहता-ऐकता असं वाटतच नाही की, पुतळ्याच्या मार्फत आपण हे भाषण ऐकत आहोत. याच्या पुढ्यात उभं राहताच हा पुतळा बिलकुल सामान्य माणसासारखा हात, ओठ नि मान हलवत सेन्सरच्याद्वारे भाषण देणे सुरू करतो. त्यामुळे आपण हुबेहूब बाबासाहेबांना खरंखुरं भाषण देताना पाहात असल्याचे वाटते.
संग्रहालयात दृकश्राव्य भाग असून इथे बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक कंगोऱ्यावर एलईडीच्या माध्यमातून लघुचित्रपट पाहता येतात. यातील संवाद ऐकण्यासाठी हिंदी-इंग्रजी भाषेचा वापर करता येतो. इतकेच नव्हे तर स्मार्टफोन असणाऱ्यांसाठी एक ऑडिओ मोबाइल ऍप असून मोफत वायफायद्वारे ते डाउनलोड देखील करता येते. एका भागात सजीव वाटतील असे पुतळे असून आंबेडकर काळातील महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक क्षण जसे भारतीय संविधानावर सही करतानाचे क्षण पाहण्यास मिळतात. संग्रहालयात एकूण 27 भाग असून जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन कार्यासह त्यांचे नित्य वापराचे साहित्य, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आणतात.
यात त्यांच्याशी निगडित दस्तऐवज, नाना चित्र, लेखन करतानाचे त्यांचे भाव, त्याचबरोबर जन्मस्थान, शाळा, महाविद्यालय, आंदोलने यावर प्रकाशझोत टाकतात. बौद्ध धर्मातील भिक्खू ध्यान किंवा अनुष्ठान काळात मनातील विशिष्ट विचारांना आवाहन करण्यासाठी ज्या हस्त मुद्रांचा उपयोग करतात, त्या जलपान कक्षाच्या भिंतीवर पाहण्यास मिळतात. या 12 हस्त मुद्रांचा उल्लेख तथागत बुद्धांच्या जीवनात पाहण्यास मिळतात. बौद्ध धम्मात या मुद्रा अत्यंत पवित्र आहेत.
भित्तिचित्रे फायबर ग्लास अशा पासून बनवली असून ती त्रिमितीय प्रकारात आहेत, जी मन, विचार, भावना, विश्वास, परंपरा आदीसह भिंतीचे नि स्मारकाचे सौंदर्य वाढवते. इथे बाबासाहेबांच्या जीवनातील पंचतीर्थ समजल्या जाणाऱ्या चित्रांचेही दर्शन होते. संविधानाचे निर्माते स्वतः बाबासाहेब असल्याने त्याबाबत इथे माहिती उपलब्ध असणे क्रमप्राप्त होते. यासाठी नव्या तंत्राचे इंटर ऍक्टिव्ह टेबल इथे दिले आहे. याला स्पर्श करताच ही माहिती मिळते. सांची स्तुपाच्या पूर्वेकडील तोरण द्वाराची प्रतिकृती संग्रहालयाच्या दर्शनी भागात आहे.
यात प्रतीकात्मक रूपात बुद्ध दर्शन होत असते. ध्यानकक्ष स्मारकाच्या एका विशेष भागात घुमटाखाली वर्तुळाकार विभाग आहे, त्यात तथागत बुद्धांची एक मोठी सुंदरशी व्हिएतनामी पांढऱ्या संगमरावरची मूर्ती आहे. ही प्रतिमा समाधिस्त मुद्रेत असून ही मुद्रा योगी वर्गाच्या ध्यान नि एकाग्रता पद्धतीने अध्यात्मिक पूर्णत्वाच्या प्राप्तीचा मार्ग दर्शवते. स्मारकाची प्रेक्षणीयता वाढवण्यासाठी नि वातावरण सुखद बनवण्यासाठी संगीतमय फवारे असून त्याला देखील विसरता येणं शक्य नाही.
स्मारक परिसराच्या पूर्वोत्तर कोपऱ्यात एक पवित्र बोधी वृक्ष लावला आहे. तसेच उजव्या बाजूच्या रस्त्याच्या कडेने विविध फुलझाडांची बाग शोभा वाढवत आहे. राष्ट्रीय प्रतीकाच्या स्वरूपात अशोक स्तंभाला 1950 साली मान्यता देण्यात आली. त्याची स्थापना मुख्य प्रवेशद्वारी केली असून अकरा मीटर उंचीच्या स्तंभाच्या दर्शनाने स्मारकाची सुरुवात होते. या अशोक स्तंभाच्या उभारणीने डॉ. आंबेडकरांनी भारताच्या एकता नि अखंडतेच्या रक्षणासाठी 24 तास काम करण्याची प्रतिबद्धता सूचित करतो. दिल्लीतील या स्मारकात मार्गदर्शक (गाईड) नि:शुल्क आहे, हे विशेष. या महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.