बॅंकॉक – म्यानमारमधील सैन्याने एका गावावर केलेल्या हल्ल्यात महिला आणि मुलेही ठार झाली आहेत. ठार झालेल्या या सर्वांचे मृतदेह सैन्याने पेटवून दिले असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. म्यानमारमधील कयाह प्रांतातील कोई नागान गावाजवळच्या मो सो गावात ही घटना घडली आहे, असे काही साक्षीदारांनी म्हटले आहे.
म्यानमारच्या सैन्याच्या हल्ल्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही शरणार्थ्यांनी या गावात आश्रय घेल्याच्या वृत्तानंतर सैन्याने या गावावरच हल्ला केला होता. या हल्ल्यात एकूण 30 महिला आणि मुलेही मारली गेली. नाताळच्या पूर्व संध्येला या अत्यंत संतापजनक घटनेचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरील या फोटोंमुळे जगभरात संताप उसळला आहे. या घटनेत एकूण किती जणांचा मृत्यू झाला हे त्रयस्थपणे तपासून बघितले जाऊ शकले नाही.
सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर अनेक गावकऱ्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला. त्यातील अनेक जणांना सैन्याने पकडून अटक केली. त्यांना मो सो गावच्या पश्चिमेकडील शरणार्थी छावण्यांकडे नेले जात असतानाच गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
या क्रूर हत्याकांडाबद्दल म्यानमारमधील लष्करी शासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. म्यानमारमधील केरेनी नॅशनल प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि लष्करी शासनाला विरोध करणाऱ्या गटांनी काही वाहनांमधून सुरक्षा दलांवर हल्ला चढवला. त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. त्यात बंडखोरांची 7 वाहने जळून खाक झाली, असे सरकारी माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. या वृत्तात देखील मृतांचा आकडा देण्यात आलेला नाही.
सैन्याच्या वाहनाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 11 जणांची हत्या सैनिकांकडून करण्यात आली होती. या महिन्याच्या प्रारंभी 7 डिसेंबरला या सर्वांचे मृतदेह जळालेल्या झोपडीत सापडले होते. म्यानमारच्या सैन्याच्या वाढत्या मुजोरीला कंटाळून हजारो जण शेजारील थायलंडमध्ये पळून गेले आहेत. म्यानमारमधील मानवी हक्कांच्या क्रूर उल्लंघनाबदद्दल अमेरिकेसह बहुतेक पाश्चात्य देशांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
मध्यस्थांचीही हत्या…
सैन्याने सर्व मृतदेह जाळून टाकले. त्यामुळे कोणत्याही मृतदेहाची ओळख पटवली जाऊ शकली नाही. या ठिकाणी महिला आणि मुलांचे कपडेही सापडले आहेत. त्यावरून हे हत्याकांड किती क्रूर असावे याचा अंदाज केला जाऊ शकतो. मृतांमध्ये मो सो गावच्या रहिवाशांचाही समावेश होता. त्यांना शुक्रवारीच अटक करण्यात आली होती. या सर्वांच्या सुटकेसाठी स्थानिक निमलष्करी दलाच्या गार्डचे चार सदस्य मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचीही हत्या झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले.