जयंत जाधव
सिंहगडरस्ता – पुणे शहरामध्ये दोन दिवस समाज माध्यमावर एकच विषय होता, हरवलेली ओवी कधी सापडणार? त्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. पुणे शहराचे पोलीस आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते ओवीला शोधत होते अखेर त्या रात्री दहाच्या सुमारास ओवी रांजणगावला सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु, या घटनेतून पौगंडावस्थेतील मुला, मुलींची मानसिकता जाणून घेणे गरजेची असल्याचीही बाब पुन्हा समोर आली.
समुपदेशिका शर्मिला पुराणिक यांनी या घटनेनंतर प्रभातशी बोलताना सांगितले की, पौगंडावस्थेतील मुला, मुलींच्या जगात काय चालले आहे हे पालकांनी जाणून घ्यायलाच हवे. या वयांमध्ये मुला, मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक असे बरचसे बदल होत असतात. त्या सर्व बदलांना कसे सामोरे जायचे, हे त्यांना कळत नसते. लहानही नाही आणि मोठेही नाही. या वयात त्यांना बरेचसे प्रश्न पडतात त्यांच्या प्रश्नाची त्यांना उत्तरे मिळाली पाहिजेत.
यात पालकांची फार मोठी जबाबदारी असते. कारण माणूस घडण्याचे हे वय असते. त्यामुळे आपल्या पाल्यांशी सकारात्मक संवाद पालकांनी साधला पाहिजे. मुलांचे मालक न बनता पालक बनले पाहिजे सध्याच्या पिढीवर इंटरनेट, मोबाइल यातून सोशल मीडियाचा मोठा पगडा आहे. त्यामुळे या पिढीला सल्ल्यांपेक्षा समजावून सांगितलेले आवडते. मुलांचे कौतुक इतरांसमोर केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो तसेच मुलांनी केलेल्या चुका त्यांना एकांतात समजावून सांगितल्या पाहिजेत, असेही पुराणिक यांनी सांगितले.
“सकारात्मक पालकत्व ही संकल्पना प्रथम पालकांनी समजावून घेतली पाहिजे. मुलांची इतरांशी तुलना अजिबात करता कामा नये. मुलांच्या अवास्तव मागण्या मान्य करताना पालकांनी विशेष काळजी घ्यावी. गरजेच्या गोष्टी आहे त्याच मुलांना दिल्या पाहिजे. मुलांसमोर आदर्श घडवण्यासाठी स्वतः आदर्श आचरण केले पाहिजे. मोबाइल, लॅपटॉपचा अतिवापर होत नाही ना, यावर पालकांचे लक्ष असले पाहिजे. आपण आदर्श पालक बनवे तरच पुढची पिढी आपोआपच चांगली घडेल.” – विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सन सिटी पोलीस स्टेशन