चंडीगढ – पंजाबमधील 22 शेतकरी संघटनांनी शनिवारी संयुक्त समाज मोर्चा या राजकीय आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली. तो मोर्चा पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. नव्या मोर्चाची स्थापना करणाऱ्या शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी राजकारणात उडी घेण्याला मोठे महत्व आहे.
पंजाबमध्ये राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात लढा देऊन आम्ही वर्षभराने दिल्लीच्या सीमांवरून परतलो. पंजाबमध्ये आमचे जोरदार स्वागत झाले. जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कृषी कायद्यांविरोधातील लढा तुम्ही जिंकू शकता. मग, पंजाबच्या भल्यासाठीही तुम्ही काहीतरी करू शकता अशा भावना जनता आम्हाला बोलून दाखवत आहे.
राजकारणात सक्रिय होण्याचा आग्रह शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही धरला. त्यामुळे नवा मोर्चा स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेत्यांनी नमूद केले. संयुक्त समाज मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल करणार आहेत.