सविंदणे – कांद्याच्या पैशावर बँकांची कर्ज नवी जुनी करता येतील, मुलांची शाळेची राहिलेली फी भरत येईल, लग्न, समारंभात खर्च करता येईल. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन काहीतरी घेता येईल, शेतकऱ्यांच्या या आणि अशा अनेक स्वप्नांचे इमले शासानाच्या निर्यात बंदीच्या एका धोरणामुळे कोसळले आहेत.
ऐन मार्चअखेर असतानाच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्याने कांद्याचे बाजारभाव पडले असून वाढण्याची चिन्हे अस्पष्ट झाली आहेत. त्यामुळे काढलेला आणि काढणीस आलेला कांदा साठवणूक करणे किंवा आहे. त्या भावात विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आजच्या बाजारभावात खर्च आणि मजुरी सुद्धा निघणे कठीण आहे, परंतु कांद्याच्या हवाल्यावर ज्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यासाठी शेतकरी मिळेल तितकीच रक्कम पदरात पाडून घेत आहेत.
शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामातील कांद्यासाठी हवामान पोषक असल्यामुळे साडेचार महिन्यात कांद्याचे उत्पादन चांगले येते. एकेकाळी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात चासकमान, मीना शाखा, डिंबा, घोड या चार कालव्यामुळे क्षेत्र ओलिताखाली आले असून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कांदयांच्या उत्पादनासाठी कांदा बियाणे, नांगरट, मशागत, रासायनिक खते ,वीज बिल तसेच मजुरीचे दर या सर्व उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे.
बाजारभाव आणि मार्चअखेरचे संकट
यावर्षी चालू हंगामात अनेकवेळा खराब हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले आहे. त्यामुळे हा कांदा साठवला तर जास्त दिवस टिकेल की ना नाही याबद्दल मात्र शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. पडलेले बाजारभाव आणि मार्चअखेर या दुहेरी संकटात सापडल्याने निवडणुकांच्या तोंडावरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पहावयास मिळत आहे.