नीरा – गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील, तसेच गावठाण हद्दीत झालेले सर्व अतिक्रमण मासिक सभेत चर्चा करून ग्रामपंचायत अधिनियम 1958 प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेश पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गुळुंचेच्या ग्रामसेवकांना दिले आहेत. तसे पत्र ग्रामसेवकांना देण्यात आले असून, त्यामुळे मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण पंचायतीला काढावे लागणार आहे.
गुळुंचे येथे केवळ सरकारी जागेवरच नव्हे तर गावठाण हद्दीतही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. मंदिराच्या रस्त्याच्या कडेला लोकांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणावर घटली असून, या रस्त्याने चारचाकी वाहन जाणेही मुश्किल झाले आहे. याबरोबरच दुचाकी वाहनेही रस्त्यांच्या बाजूने लावली जात असल्याने या बाबतची पार्किंगची समस्याही या भागात मोठी आहे.
रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे अपघातही वाढले आहेत. काटेबारस यात्रेदरम्यान सर्व कार्यक्रम आणि देवाच्या काठीची मिरवणूक याच रस्त्याने जाते. यावेळी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा आणि अरुंद रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने या सर्व गोष्टींची दखल घेतली असून, अतिक्रमणांच्या कार्यवहीचा अहवाल देण्याबाबत ग्रामसेवकांना कळविले आहे.
समान न्याय असावा
गावातील सरकारी गायरान जागा गट 2 मध्ये महसूल विभागाच्या नोंदीप्रमाणे 101, तर पंचायतीच्या नोंदीप्रमाणे 152 अतिक्रमणे आहेत. यात जवळपास 30 ते 40 उकिरडे आहेत. पंचायतीने राजकीय हेतूने केवळ चार जणांना उकिरडे काढण्याची नोटीस दिल्याने पंचायतीने दुजाभाव करू नये, अन्यथा वाड्या-वस्त्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी, अशी मागणी येथील लोक करू लागले आहेत.
काटेबारस यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना
काटे बारस यात्रेला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. या रस्त्यानेच देवाची मनाची काठी नेली जाते. दरम्यान, रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत असल्याने या रस्त्याने जाणे येणे मुश्किल होत असून यात्रा काळात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय निगडे यांनी ग्रामसेवकांना अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिले होते. त्यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी गटविकास अधिकारी व पुरंदरच्या तहसीलदारांकडे दाद मागितली होती.