पळसदेव (वार्ताहर) – पुणे. सोलापूर, आहिल्यानगर, लातूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या यशवंत सागर अर्थात उजनी धरण पहिल्यांदाच उणे 70 टक्के जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी पुरवठा करणार्या पाणी योजना, बाष्पीभवन, विविध पाणी पुरवठा योजनांसाठी करण्यात येणार उपसा या कारणामुळे दर 8 दिवसाला अंदाजे 1 टीएमसी पाणी संपत आहे. या कारणामुळे प्रथमच यशवंत सागर म्हणजे उजनी धरण उणे 70 टक्के जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सन 2015-16 साली दुष्काळात उजनी धरणात उणे 60 टक्के पाणी साठा झाला होता. त्यावर उपाय म्हणून बँक वॉटरच्या पाण्याच्या उपशावर निर्बंध लावण्याच्या हालचाली झाल्या होत्या. यंदा मात्र लोकसभा निवडणुकीमुळे सरकार हे धाडस करणार नाही. आणि हे धाडस करून शेतकर्याचा अधिकच रोष ओढवून घेणे सरकारला परवडणारे नाही.
धरण परिसरातील इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत, जामखेड, कुर्डूवाडीसह इतर शहराच्या व मोठ्या गावाच्या पाणी योजना या बॅकवॉटरवर आहेत. शिवाय सोलापूर शहरासाठी पिण्यासाठी 1 आवर्तन, वाढत्या उन्हामुळे वाढते बाष्पीभवन यामुळे यावर्षी सर्वाधिक कमी म्हणजे उणे 70टक्के पर्यंत पाणी साठा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत आणखी उपायोजना व नियोजन होणे आवश्यक आहे.
उजनी उन्हाळ्यापूर्वीच मायनसमध्ये गेलं आहे. सद्य स्थितीत उजनी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. मागे तेजो कंपनीने केलेल्या सर्वेनुसार धरणात पाणी असताना देखील आधुनिक यंत्रांच्या साह्याने धरणातील गौणखनिज काढता येऊ शकते असा अहवाल यापूर्वीच सरकारला देण्यात आला होता. सध्या तर धरण मायन्समध्ये आहे.
2017 साली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने धरणातील गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली होती; मात्र त्याचे पुढे काही झाले नाही. मागील काळात सरकारने कमी किमतीत वाळू देण्याची योजना आणली होती ती देखील फेल झाली आहे. आज पर्यंत स्वस्तातील वाळूची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.
गाळ काढल्यास 40 टीएमसी पाणी वाढेल
जलतज्ञाच्या मते उजनीत 42 टीएमसी गाळ आहे. पावसाळ्यात धरण भरले तरी धरणाची पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी आहे; मात्र त्यात गाळ व गौण खजिना 40 ते 42 टक्के एवढा असल्याने तेवढा पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील एवढे वर्ष साठलेला गाळ उच्च प्रतीचा आहे. हा गाळ बळीराजाला काढण्यास परवानगी दिल्यास अथवा त्यास सरकारने काही मदत जाहीर केल्यास शेतकर्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
शिवाय सरकार देखील कोट्यवधी रुपयाचा महसूल मिळण्यास मदत होईल. दर वर्षी पाण्याची मागणी वाढत आहे. हा गाळ काढल्यास किमान 40 टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बाबत सरकारने मन मोठं करून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं मत उजनी काठावरील शेतकरी व्यक्त करत आहेत.